पंढरपूर प्रतिनिधी
काल आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांनी "पंढरपूरात मैदान आमच्यामुळे भरले, ते मैदान स्व. बाळासाहेबांच्या सभेला देखील भरले नव्हते ते आम्ही सावंत बंधूंनी भरवुन दाखवले" असे धक्कादायक विधान सावंत यांनी केले होते.
यावर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेनेचे नेते रणजित बागल यांनी सांगितले," कालचे तानाजी सावंत यांचे वक्तव्य म्हणजे अहंकारातून व्यक्त केलेल्या भावना आहेत, हे वक्तव्य म्हणजे स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यक्षमता व कार्यकुशलतेवर अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा हा प्रकार आहे.सावंत यांनी असे वक्तव्य करत ज्या पक्षाने सावंत यांची तेवढी ताकद नसतानाही विधानपरिषद दिली, मंत्रीपद दिले, त्याच पक्षाविरोधात बोलणे त्यातल्या त्यात वंदनीय बाळासाहेबांबद्दल असे बोलणे म्हणजे "जिस थाली में खाए,ऊसी में छेद" करण्याचा हा प्रकार आहे. असे बागल म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकीकडे म्हणतात आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेवुन जात आहोत आणि दुसरीकडे आपल्याच मंत्रिमंडळातील एक मंत्री वंदनीय बाळासाहेबांबद्दल असे अवमानकारक वक्तव्य करतो, हा विरोधाभास कशासाठी, म्हणजे बाळासाहेबांचे नाव फक्त स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी घेता का..? असा सवाल देखील बागल यांनी उपस्थित करत शिंदेंनी हिंमत असेल तर सावंत यांचा राजिनामा घेवुन आपण बाळासाहेबांचे विचार पुढे घेवुन जात आहोत हे प्रत्यक्षात कृतीतुन दाखवावे. अन्यथा आगामी काळात शिवसेना त्यांना निश्चितपणे प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील बागल यांनी यावेळी बोलताना दिला.