पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर येथे होळी ते रंगपंचमी या काळात शेकडो वर्षांची परंपरा असणारा बैठकीची लावणी, हा कार्यक्रम आज सोमवार दी ६ मार्च ते रविवार दि १२ मार्च या कालावधीत जुनी माळी गल्ली येथील श्री एकनाथ भवन येथे रात्री ८.३० ते १०.३० या कालावधीत संपन्न होणार आहे.
उत्पात समाजातील मनोहर उर्फ छबू काका उत्पात, श्याम उत्पात, अनिल उत्पात, प्रसाद उत्पात ही मंडळी बैठकीच्या लावण्या सादर करणार आहे. गेली अनेक वर्षे ज्ञानोबा उर्फ माऊली उत्पात या लावण्या सादर करीत असत. बुधवार दि ८ मार्च रोजी मोडनिंब येथील महिला कलावंत आपली कला सादर करणार आहेत.
लावणी म्हणजे मराठी शारदेच्या पायातील चाळ आहेत
मराठी शाहिरांनी डफावर थाप मारून मर्दानी पोवाडे रचले गाईले तसेच त्यांनी उत्तमोत्तम लावण्यांच्या रचना ही केल्या. त्या मधे परशूराम,सगन भाऊ,होनाजी बाळा,राम जोशी,अनंत फंदी या सारख्या अनेकांनी पूर्वी शाहिरी केली ती आज देखील चालू आहे. उत्तर पेशवाई मधे शाहिरी लावण्या जास्त प्रमाणात गाईल्या जात असत.महाराष्ट्रात तर सर्वदूर लावणी कार्यक्रम होत असत.आजही थोड्या फार प्रमाणात खेडोपाडी असे कार्यक्रम होतात परंतु त्याचे स्वरूप काहीसे बदलून वगनाट्य रूपात होताना दिसतात.
परंतुू जुन्या मराठी लावणी चे वेड पंढरपूरातील आम्हा उत्पात मंडळीना पूर्वी पासूनच आहे ते आजही टिकून आहे. माझे आजोबा वै.दादबा उत्पात,वै.ज्ञानेश्वर गोपाळ उत्पात पूर्वी लावणी गायन होळी पौर्णिमा ते रंगपंचमी पर्यंत ते बंदिस्त खोलीत स्वांतुखाय गात असत.सुरुवातीला डफाच्या साथीने लावणी गायन चालत असे परंतु पुढे मृदुंगाचार्य कै. शंकरअप्पा मंगळवेढेकर तबला साथ करू लागले आणि डफाच्या तालावरची लावणी खर्या अर्थाने खुलू लागली. त्यावेळी ऐकायला त्यांची मित्र मंडळी,गावातील प्रतिष्ठित लोक ही येत असत. माझ्या आजोबांचे संबंधीत पंढरपुरातील अनेक नामवंत महाराज मंडळींनीही उत्पातांची लावणी ऐकली आहे.त्यांचे नामोल्लेख करणे उचित होणार नाही.परंतु ते येत होते.ल.रा.पांगारकर,दत्तो वामन पोतदार,ग.दि.माडगूळकर या सारख्या दिग्गजांनी जून्या मंडळींचे लावणी गायन ऐकले. गोदावरी पूणेकर सारख्या लावणी कलावंतीणीला त्या काळी साभिनय लावणी गायन शिकवीत असत. ते गेले तेंव्हा नारदाश्रमात श्रद्धांजली सभा झाली होती. त्यावेळीअनेकांनी भाषणे केली त्यात पंढरपूरचे माजी आमदार कै.बाबुरावजी जोशी यांचे भाषण झाले होते ते म्हणाले, ``दादबा उत्पात यांचे गुणगौरव करणारे अनेकांनी भाषणे केली परंतु दादबा उत्पात उत्कृष्ट लावणी गायक होते हे कोणीच सांगितले नाही.``कालिदास सांगायचा आणि श्रृंगार विसरायचा'' हे कसे चालेल.आणि त्यापुढे त्यांनी अनुभव सांगितला,`` पौर्णिमेचं टिपूर चांदणं पडले आहे, चंद्रभातून नाव (होडी) विष्णूपदाकडे जात आहे. हातात डफ घेऊन दादा उत्पात ``पौर्णिमेची शुभ्र प्रभा पडली हो कशी'' ही लावणी गाताहेत. अशी आठवण सांगितली होती.
पूढे हाच वारसा कै.ज्ञानोबा उत्पात,वा.भ.उत्पात,बी.डी. उत्पात या मंडळी नी जोपासला व वाढविला.ज्ञानोबा उत्पात यांनी उत्पात गल्लीतील लावणी दिल्ली पर्यंत गाजवली. लावणी गायन पूरूषांनी करणे अनैसर्गिक आहे. लावण्यांच्या रचना श्रृंगारिक किंवा काहिशा भडक श्रृंगारिक आहेत. त्यामुळे घरंदाज गाइकांनी या कडे त्या वेळीच्या सामाजिक बंधनामूळे दूर्लक्ष केले.आज परिस्थिती तशी नाही. लावण्यांच्या रचना भडक श्रृंगारिक जरी असल्या तरी बिभत्स नाहीत. दर्जेदार आहेत. म्हणून पू.ल.देशपांडे,वसंतराव देशपांडे यांनी जेंव्हा या लावण्या ज्ञानोबा उत्पातांकडून ऐकल्यावर ते खूपच प्रभावीत झाले आणि उत्पात वाड्यातील लावणी खर्या अर्थाने बाहेर आणली.तो आमच्या लावणी मंडळाचा सूवर्णकाळ होता.दूर्गा भागवत,पं.भिमसेन जोशी, छोटागंधर्व, कुमारगंधर्व, जितेंद्र अभिषेकी, बाबूजी या सारख्या दिग्गजांनी ज्ञानोबा उत्पातांच्या लावणी गायनाला भरभरून दाद दिली. मी त्यांच्या साथीला असे. वादनाचार्य कै. तात्यासाहेब मंगळवेढेकर, संगीततज्ञ नृसिंह मंगळवेढेकर हार्मोनियमला असत व उत्पात मंडळी लावणी गात खूपच छान संच होता. होळी पौर्णिमा ते रंगपंचमी या काळात दिवसा मिष्टान्न भोजन व रात्रौ लावणी. आजही चालू आहे परंतु लोकांची अभिरूची काळानुरूप बदलली आहे.दूरदर्शन,चित्रपटांच्या जमान्यात अशा कार्यक्रमाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही.
भरत नाट्य मंदिरात छोटागंधर्व लावण्यांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. ते म्हणाले प्रकृती अस्वास्थ्याने मी थोडा वेळ बसेन,``ज्ञानोबा, क्षमा करा.परंतु ते संपूर्ण कार्यक्रमास थांबले.व कार्यक्रमानंतर ते म्हणाले,
उत्पात तूमची लावणी नाही
भूलावणी आहे
अशा या उत्पात लावणी चा वारसा पंढरपूरात आजही चालू आहे. जुन्या मराठी लावणीच्या रचना, चाली अवगत असणारी उत्पात मंडळी हा कार्यक्रम होळी ते रंगपंचमी पर्यंत करतात रसिक श्रोत्यांनी अवश्य लाभ घ्यावा.