मारापुरचे लोकनियुक्त सरपंच विनायकराव यादव यांचा अभिष्टचिंतन सोहळया निमित्त तेज न्यूज चॅनल कडून हार्दिक शुभेच्छा व पुढील कार्यास ही शुभेच्छा
"पुत्र व्हावा ऐसा गुंडा। त्याचा तिही लोकी झेंडा। याप्रमाणे कार्यरत असणारे लोकप्रिय सरपंच विनायकराव यादव यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने लिहिलेला हा लेख
गावचा सरपंच कसा असावा? 'खेड्यांचा देश' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत देशात एकूण ६,४९,४८१ गावे आहेत आणि त्यातून महाराष्ट्रातील गावांची संख्या ६३,६३३ एवढी आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ६५.५३% लोकं गाव-खेड्यात राहतात. त्यामुळे, आजही बहुसंख्य नागरिक खेड्यातच राहतात. म्हणजे भारत हा खेड्यांचाच देश होता आणि आजही आहे. त्यामुळे खरा भारत हा खेड्यातच राहतो. स्वातंत्र्योत्तर काळात भारताने विज्ञान, शिक्षण, तंत्रज्ञान, औद्योगिकरण आणि इतर क्षेत्रात बरीच प्रगती केली. शहरांची झपाट्याने प्रगती झाली. आज स्वतंत्र मिळून 76 वर्षे उलटून गेली. मात्र, देशातील गाव-खेडी आजही ओस पडलेली, उदास, भकास, सोयी-सुविधांचा अभाव असलेली का दिसून येतात? हा खरचं मोठा प्रश्न आहे.
गाव-खेड्यांमधून अनेक लोकांचे शहराकडे स्थलांतर झाले आणि आजही होत आहे. लोकांना आपली जन्मभूमी सोडून शहरात जाणं अजिबात आवडत नाही. परंतु, पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना नाईलाजाने शहरात स्थानांतरित व्हावं लागतं. याचं मुख्य कारण म्हणजे गावातील रोजगार, शिक्षण आणि मूलभूत सुविधांचा अभाव. आपल्या गावचा सर्वांगणी विकास व्हावा, रोजगार उपलब्ध होऊन वीज, रस्ते, पाणी या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात असे प्रत्येकाला वाटत असते. जिद्द आणि चिकाटी असलेलं सक्षम नेतृत्व गावात असायला हवं. सद्यस्थितीत ग्रामपंचायतीला पहिल्यापेक्षा अधिक बळकटी मिळाली आहे. सरपंचाला एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्रीप्रमाणे अधिकार प्राप्त झाले आहेत. यात अजिबात अतिशोयक्ती नाही. पण सरपंचाला स्वतःच्या अधिकारांची माहिती नसते. काहींना ते अधिकार माहित असेल तरी त्यांना उपयोगात आणत नाहीत किंवा त्याची अंमलबजावणी करण्यात ते सक्षम नसतात.
सरपंचने ठरवलं तर आपल्या छोट्याश्या राज्याला (गावाला) नंदनवन बनवू शकतो. मात्र सर्वप्रथम त्याने तसे 'ठरवणे' महत्वाचे आहे. अर्थातच हे वाटतं तितकं सोप्पही नसतं. गावातील समाज, जात, वाडी, गावकी, भावकी आणि मानपान इत्यादी अनके कटकटी, अडचणी असतात. या सर्वांवर मात करून, ग्रामोउन्नतीचा ध्यास ठेवून वाटचाल केली तर नक्कीच मार्ग सापडतो. त्यासाठी सरपंचाला तलाठी, ग्रामसेवक किंवा एखाद्या शासकीय अधिकाऱ्यामागे हाजी हाजी करत बसायची गरज नाही. आपले अधिकार गाजवून तो गावासाठी खूप काही करू शकतो. राज्यात अशी अनके नंदनवनं फुलली आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने पाटोदा गाव, हिवरे बाजार व राळेगणसिद्धी अश्या आदर्श गावांचा उल्लेख करता येईल. त्या गावातील सरपंचानी अनके प्रश्न, अडचणीना सामोरे जात आपल्या गावाचं नाव लोकांसमोर 'आदर्श गाव' म्हणून ठेवलं. अश्या सरपंचाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपले गाव विकासपथावर नक्कीच आणता येईल.
आदर्श सरपंच कसा असावा?
• समाजसेवेची आवड असणारा असावा
• गावाचा विकास हेच ध्येय मानणारा असावा
• ग्रामसभेत बोलणारा आणि ऐकणारा असावा
• भाषा विनम्र आणि आदरपूर्वक असावी
• सर्व समाज समभाव मानणारा असावा
• कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाखाली नसावा
• विरोधकांना सामावून घेणारा असावा
• शासकीय योजना लोकार्पण करणारा असावा
• शासकीय विविध योजना गावात आणणारा असावा
• अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा असावा
• शासकीय कामांची ठेकेदारी न करता केलेल्या कामांचा
दर्जा राखणारा असावा
• पंचायती समिती, जिल्ह्या परिषद अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात असणारा असावा
• गावतील युवकांना व महिलांना संधी देणारा असावा
• गावातील गरीबांना अडचणीच्या काळात निस्वार्थी भावनेने मदत करणारा असावा
• गावातील सर्व लोकांना सोबत घेऊन काम करणारा असावा
• निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन लोकांच्या पाया पडणारा नसावा.
मित्रांनो, इथे एक गोष्ट आवर्जून नुमद करावीशी वाटते, सरपंचामध्ये कीतीही चांगले गुण असले तरीही त्याला गावकऱ्यांच्या सहभागा शिवाय काहीच करता येत नाही. आणि जर लोकांनी दुर्लक्षित केले तर सरपंच फक्त नावाचा बनून राहतो. आणि मग तो गावाच्या विकासापेक्षा तो स्वतःच्या आर्थिक विकासाकडे जास्त भर देतो. त्यामुळे गावातील लोकांनी त्याला प्रतिसाद देणं, प्रोत्साहीत करणंही तितकंच आवश्यक असतं. लोकांनी ग्रामपंचायतीच्या कारभारात व ग्रामसभेत आवर्जून सहभाग घेतला पाहिजे. गावाच्या विकासाचा भार एकट्या सरपंचावर देऊन गावे कधीच समृद्ध होऊ शकणार नाहीत. हे देखील तितकेच खरे..! त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारात लोकसहभाग हा महत्त्वाचा. श्री यादव यांनी नुकताच ग्रामपंचायत कारभार हाती घेतला असून संपूर्ण तरुणाई त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे त्यामुळे ते नक्कीच मारापुर ग्रामपंचायत यशाच्या शिखरावर पोहोचवतील यात शंका नाही.
लेखन - तानाजी इंगोले