अबकी बार किसान सरकार
नांदेड प्रतिनिधी
जाती-धर्माच्या नावावर निवडणुका लढवून सत्ता मिळवली आणि जनतेच्या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष करण्याचे काम हे केंद्र सरकार करत असल्याचे टीकास्त्र तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नांदेड येथे झालेल्या विराट सभेमध्ये सोडले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर १३ महिने आंदोलन करण्यात आले, त्यात ७५० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, तरीही पंतप्रधान हे "मन की बात" करण्यात गुंतले होते. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी, मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी या सरकारला वेळ नसेल तर आता जागृत व्हा आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे सरकार या राज्यात आणि देशात आणण्यासाठी कटिबद्ध व्हा असे आवाहन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केले. अबकी बार किसान सरकार अशी घोषणा त्यांनी या सभेत केली. नांदेडच्या हिंगोली गेट मैदानात आयोजित विराट सभेत त्यांनी ही घोषणा केली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आजपर्यंत आलेल्या या सरकारमध्ये तळमळ नाही. शेतकऱ्यांच्या शेतात वीज मिळते का? पाणी मिळते का? बी-बियाणे मिळतात का? याचा गांभीर्याने विचार करण्याची क्षमता या सरकारमध्ये नसेल तर काय फायदा? असा सवाल त्यांनी केला.
४९००० टीएमसी पाणी समुद्रात वाहून जाते. देशात विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोळसा उपलब्ध आहे, मग शेतकऱ्यांना पूर्ण वेळ वीज का मिळत नाही? समुद्रात जाणाऱ्या पाण्याचे नियोजन करण्याची क्षमता या सरकारमध्ये नाही; नव्हे त्यांच्या मनामध्येही नाही. हजारो शेतकऱ्यांच्या रोज आत्महत्या गेल्या काही दिवसात वाढल्या आहेत, त्यांचे अश्रू पुसण्यासाठी सरकारला वेळ नाही, त्यामुळे आता संघर्ष करण्याची आणि शेतकऱ्यांचे सरकार आणण्याची संधी आली आहे असेही ते म्हणाले.