पंढरपूर प्रतिनिधी
वीज ग्राहकांनी आपल्या तक्रारी, अडचणी सोडविण्यासाठी तक्रार निवारण दिनाचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन महावितरण पंढरपूर विभागाचे कार्यकारी अभियंता संजय गवळी यांनी केले. महावितरणतर्फे विभागीय पातळीवर दर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी ग्राहक तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात येतो त्याप्रमाणे पंढरपूर विभागामध्ये ग्राहक तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला होता.
प्रारंभी मागील महिन्यातील तक्रारींचा आढावा घेण्यात आला व उपस्थितांचे स्वागत करुन अ.भा. ग्राहक पंचायतीतर्फे अधिकारी, कर्मचारी, ग्राहक यांना तिळगुळ वाटप करण्यात आले.त्यानंतर ग्राहकांनी आपल्या तक्रारी, समस्या मांडल्या. त्यामध्ये योग्य दाबाने विद्युत पुरवठा होत नाही, बील अवाजवी आले आहे, नावात बदल करून मिळावा, "महावितरण आपल्या दारी" या योजनेत समाविष्ट झालेल्या ग्राहकांचा रितसर वीज पुरवठा झाला नाही इ. स्वरुपातील तक्रारींचा समावेश होता. याबाबत कार्यकारी अभियंता संजय गवळी यांनी समाधानकारक उत्तरे देऊन तातडीने तक्रारी सोडविण्यात येतील अशी ग्वाही दिली. त्याचबरोबर ग्राहक पंचायतीने अनेक सार्वजनिक विषय मांडले त्यामध्ये ग्रामीण भागातील पथदिवे दिवसाही चालु असतात ते दिवसा बंद करण्याबाबत ग्रामपंचायतींना कळवुन उर्जेची बचत करावी अशी मागणी केली.
यावेळी महावितरण पंढरपूर शहरचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भिकाजी भोळे,पंढरपूर ग्रामीण २ चे प्रभारी उपकार्यकारी अभियंता रवींद्र भुतडा, उपकार्यकारी अभियंता सांगोला विभाग आनंद पवार,उपकार्यकारी अभियंता मंगळवेढा बाळु चोरमले, सहा.आनंद गायकवाड, सनगर, उघडे हे उपस्थित होते तर अ. भा.ग्राहक पंचायतीचे प्रांत सदस्य सुभाष सरदेशमुख सोलापूर जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास, जिल्हा कार्यकारणी सदस्य पांडुरंग अल्लापूरकर,पंढरपूर तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये, ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे मध्यस्थ मंडळ सदस्य संभाजीराव लंगोटे हे उपस्थित होते.