पंढरपूर प्रतिनिधी
ह.भ.प. तात्यासाहेब तथा आबा हे माझ्या वडिलांचे स्नेही होते, त्यामुळे त्यांच्या नावाने दिला जाणारा वारकरी पुरस्कार हा मला आशिर्वादच आहे. या पुरस्काराच मी विनम्रतेने स्विकार करतो. असे भावपूर्ण उद्,गार ह.भ.प. शंकरमहाराज बडवे यांनी काढले. या समारंभाचे अध्यक्ष स्थानी ह.भ.प. विठ्ठलमहाराज वासकर होते. तर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर आणि ह.भ.प. प्रभाकर महाराज बोधले यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
ज्ञानराज प्रतिष्ठान मुंबई, संत सेवा संघ सातारा आणि संत गोरोबाकाका व चैतन्य सद्गुरु तात्यासाहेब बाबासाहेब वासकर प्रतिष्ठान बाणेवाडी जि. उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी वारकरी सांप्रदायातील श्रेष्ठ वारकरी महाराजांना वारकरी पुरस्काराने सन्मानीत करुन त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान केला जातो. या पुरस्काराचे यंदाचे पंचवीसावे वर्ष. या अगोदर ह.भ.प. बाबामहाराज सातारकर, ह.भ.प. भानुदास महाराज देगलुरकर यांच्यासारख्या आपले आयुष्य वारकरी सांप्रदायासाठी वेचलेल्या चोवीस वारकर्यांचा सन्मान केला गेला. आणि हा पंचवीसावा पुरस्कार शंकर महाराजांना प्रदान करणेत आला. बडवे कुळात जन्मलेल्या शंकर महाराजांनी वयाच्या अठराव्या वर्षापासुन गळ्यात तुळशी माळ घालुन वारकरी झाले. आयुष्यभर किर्तन, प्रवचने देवून समाज जागृती केली. त्यांच्या घरी आळंदीचे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि श्री संत बाळूमामा यांचा वास असे, जणू या दोन थोर विभुतींनी शंकरमहाराजांना आशिर्वादच दिला आहे. तर त्यांनी शुध्द एकादशीला पंढरपूर ते आळंदी आणि वद्य एकादशीला आळंदी ते पंढरपूर चालत करण्याचा उपक्रम एक वर्षभर करुन आपली एकशष्ठी साजरी केली होती, यावेळी महाराजांना मानपत्र, हार, श्रीफळ, शाल आणि सेवाधन देवुन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराजांनी तात्यासाहेब वासकर महाराजांच्या अनेक आठवणी सांगीतल्या. तर हा पुरस्कार शंकर महाराजांसारख्या सत्शील व सज्जन वारकर्याला दिल्याबध्दल संतोष व्यक्त केला. तर कार्यक्रमाचे दुसरे अतिथी ह.भ.प. प्रभाकर महाराज बोधले यांनी आम्ही बडव्यांना प्रत्यक्ष पांडुरंगाचे प्रतिनीधी मानतो. या नात्याने आजचा पुरस्कार प्रत्यक्ष पांडुरंगाच्या चरणावरच गेला. असे सांगुन शंकरमहाराजांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना हिंदुमहासभेचे नेते अभयसिंह इचगावकर यांनी महाराजांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मंदिर समिती सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, भागवत महाराज चवरे, सोपानकाका टेंभुकर महाराज, यांनी गौरवपर भाषणे केली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचलन ह.भ.प. जगताप महाराज यांनी केले. प्रास्तावीक रेवणसिध्द लामतुरे यांनी केले. तर आकाश सुतार यांनी आपल्या पहाडी आवाजात ईशस्वन आणि अभंग गावून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या समारंभास वारकरी, महाराज मंडळी, गावातील प्रतिष्ठित नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.