चिंचणी प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या वतीने वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना छत्रपती शिवाजी महाराज वनश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी संस्था संवर्ग मधून सुधारित गुणांकनानुसार पंढरपुर तालुक्यातील चिंचणी या गावाला राज्यांमधून तिसरा क्रमांक मिळाला आहे. तर पुणे विभागीय स्तरावर दुसरा क्रमांक मिळाला आहे. पुणे विभागीय स्तरावरील देण्यात येणारा पुरस्कार 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मा. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद दिलीप स्वामी यांच्या हस्ते पोलीस परेड ग्राउंड सोलापूर येथे देण्यात आला. चिंचणी गावातील महिला, ग्रामस्थ, तरुण यांनी गेल्या पंधरा-सोळा वर्षांपासून सातत्याने वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन यामध्ये लोकसहभाग व लोकवर्गणीमधून केलेल्या कामाची दखल घेत शासन निर्णयाद्वारे हा पुरस्कार देण्यात आला आहे.
या गावांमध्ये आज अखेर 08 हजार पेक्षा जास्त झाडे लावून जगवलेली आहेत. या मध्ये फळांची ,फुलांची, वनौषधी, शोभेची, जंगली झाडे सुद्धा आहेत. या ठिकाणी प्रत्येक ऋतूमध्ये येणाऱ्या फळांची झाडे आहेत.या गावाने 'झाडांचे गाव' व 'मिनी महाबळेश्वर' म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या ठिकाणी झाडांची संख्या जास्त असल्यामुळे पक्षांचा पण आदिवास जास्त आढळून येत आहे. वृक्ष संवर्धन करण्यात आलेल्या कोणत्याही झाडाला या ठिकाणी ट्री गार्ड लावण्यात आलेले नाही. लोकांनी स्वयंमपुर्तेतुन या झाडांचे संरक्षण व पाण्याची व्यवस्था करत ही संपूर्ण झाडे जगवलेली आहेत.
सोलापूर जिल्ह्यामध्ये संस्थासंवर्ग मधून वृक्ष लागवड व संवर्धनामध्ये ग्रामपंचायत स्तरावरील चिंचणी या गावाला पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या स्तरांमधून चिंचणीकरांचे अभिनंदन केले जात आहे .या मुळे सन 2024 ला राज्यात पहिला क्रमांक आणण्याचा निर्धार यावेळी चिंचणीकरांनी बोलून दाखवलेला आहे.
या पुरस्काराचे स्वरूप राज्यस्तरावरील 50 हजार रुपये व विभागीय स्तरावर 30 हजार रुपये व सन्मानपत्र आहे. राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण वनमंत्री महाराष्ट्र सरकार व मान्यवरांच्या उपस्थित मुंबई येथे होणार आहे. याचे वितरण अद्याप झालेले नाही.