नारायणगाव प्रतिनिधी
ग्रामोन्नती मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नारायणगाव येथे राष्ट्रीय छात्र सेना विभाग यांच्या वतीने कु. विवेक संजय वायकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये विक्रीकर निरीक्षक (STI) या पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. एस. एस. शेवाळे, उपप्राचार्य श्री. जी. बी. होले त्याचप्रमाणे कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, नारायणगाव चे प्राचार्य डॉ. मिलिंद भुजबळ त्याचप्रमाणे राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे प्रमुख ए. एन. ओ. कॅप्टन डॉ. दिलीप शिवणे, प्रा. सचिन काशिद, प्रा. आनंद कुलकर्णी, प्रा. आकाश कापले (कला शाखा समन्वयक व प्रमुख ), प्रा. शिवाजी टाकळकर ( वाणिज्य शाखा समन्वयक व प्रमुख ), प्रा. मेहेर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. दिलीप शिवणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविक करताना त्यांनी विवेक वायकर यांच्या जिद्द आणि चिकाटी याचे कौतुक केले. ते राष्ट्रीय छात्र सेनेचे माजी विद्यार्थी असल्याने त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा सांगितला. त्याचबरोबर त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन बाकी विद्यार्थ्यांनी जिद्दीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्यानंतर उपप्राचार्य जी. बी
होले, प्रा. सचिन काशिद, प्रा. मेहेर, प्रा. कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी विवेक वायकर च्या एन. सी. सी. कार्याचा आढावा देणारा व्हिडिओचे चित्रीकरण करण्यात आले.
महाविद्यालयातील एन. सी. सी. कॅडेट जे.यू.ओ. साक्षी शिंदे हिने एन. सी. सी. दिनानिमित्त माहिती सांगताना त्याची स्थापना 15 जुलै 1948 झाली असून त्याचे महानिदेशक लेफ्टनंट जनरल या उच्च पदावरील अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली, त्याचबरोबर ब्रीद वाक्य एकता और अनुशासन असून उद्देश राष्ट्रातील संघटित, प्रेरित आणि प्रशिक्षित युवकांचे संघटन करून त्यांना राष्ट्रनिर्माण तसेच संरक्षण कार्यात सहभागी करून घेणे आहे असे सांगितले. त्यानंतर त्याच्या व्यवस्थापनेत झालेले बदल, संघटनात्मक बांधणी याची माहिती दिली. त्याचबरोबर मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल व संविधानदिनाबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य श्री. एस. एस. शेवाळे यांनी भूषविले व अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी विवेक वायकर यांच्या कार्याचे उदाहरण देऊन उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी एन. सी. सी. चे 100 कॅडेट, एन. एस. एस. चे विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. यू. ओ. तेजल भोर हिने केले तर आभार सीनियर एस. यू. ओ. अंकित चासकर याने मानले.
शेवटी संविधानाचे वाचन प्राचार्य श्री. एस. एस. शेवाळे यांनी करून त्यापाठोपाठ विद्यार्थ्यानी व मान्यवर यांनी कथन करून कार्यक्रमाची सांगता झाली.
ग्रामोन्नती मंडळाच्या महाविद्यालयात 75 व्या अमृत महोत्सवी एन.सी.सी. दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
ग्रामोन्नती मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगाव, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय नारायणगाव, तसेच डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाऊंडेशन नारायणगाव व शिवनेरी ब्लड बँक मंचर त्याचबरोबर राष्ट्रीय छात्र सेना विभाग व 36 महाराष्ट्र बटालियन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी संपूर्ण देशभरात राष्ट्रीय छात्र सेना दिन साजरा करण्यात येतो त्या पाश्र्वभूमीवर दि. 26 नोव्हेंबर 2022 रोजी 75 वा अमृतमहोत्सवी राष्ट्रीय छात्र सेना दिन भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून साजरा करण्यात आला. सदर शिबिरात एकूण 61 रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यात राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागातील विद्यार्थ्यानी रक्तदान केले. त्याचबरोबर नारायणगाव परिसरातील ग्रामस्थ, राष्ट्रीय छात्र सेनेचे माजी विद्यार्थी, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचाही मोलाचा सहभाग लाभला.
याठिकाणी प्रत्येक रक्तदात्यास 32 GB पेन ड्राईव्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर प्रत्येक रक्तदात्यास अल्पोपाहार देखील देण्यात आला. सदर रक्तदानासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. शेवाळे एस. एस., उपप्राचार्य श्री. होले जी. बी., त्याचबरोबर राष्ट्रीय छात्र सेना विभाग प्रमुख ए. एन.ओ. कॅप्टन. डॉ. दिलीप शिवणे, प्रा. सचिन काशिद, प्रा. आनंद कुलकर्णी, प्रा. आकाश कापले ( कला शाखा समन्वयक व प्रमुख ), प्रा. शिवाजी टाकळकर ( वाणिज्य शाखा समन्वयक व प्रमुख ) प्रा. मेहेर आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर नुकताच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे ( MPSC ) घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये राज्य विक्रीकर निरीक्षक ( STI ) पदी निवड झालेल्या कु. विवेक संजय वायकर यांची देखील उपस्थिती होती.
यावेळी" रक्तदान करा, एक जीव वाचवा! एक थेंब रक्ताचा, फुलवेल अंकुर जीवनाचा! कधी आटत नाही रक्ताचा झरा, दर तीन महिन्यांनी रक्तदान करा! " हा मोलाचा संदेश राष्ट्रीय छात्र सेना विभाग, नारायणगाव तर्फे देण्यात आला. सदर रक्तदान शिबीर सकाळी 9.00 ते दुपारी 3.00 या वेळेत पार पडले.