मायणी/खटाव प्रतिनिधी
राज्यात सर्वदूर ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे वाहत आहे. १८ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, २० रोजी मतमोजणी होणार आहे. या रणधुमाळीत खटाव तालुक्यातील मरडवाक ग्रामपंचायत विशेष चर्चेत आली आहे. कारण, या ठिकाणी होणाऱ्या निवडणुकीत प्रस्थापित-धनदांडगे विरुद्ध सुशिक्षित तरुणाई अशी लढत होत आहे.
खटाव तालुका ,गावामध्ये चालत आलेल्या वर्षानुवर्षांच्या परंपरेला फाटा देत, तरुणाई गावचा कारभार चालवण्यासाठी पुढे सरसावली आहे. या मध्ये सूर्यकांत चव्हाण व ग्रामस्थ यांनी गावात विकासाच्या मुद्द्यावर एकजूट घडवून आणली असून तरुण आणि ज्येष्ठ माणसांना एकत्रित करत ग्रामदैवत श्री भैरवनाथ व हनुमान परिवर्तन ग्रामविकास पॅनल उभे केले आहे. यामध्ये ७ सदस्यपदाच्या जागा असून स्वतः सूर्यकांत चव्हाण थेट सरपंच पदाचे उमेदवार आहेत. श्री भैरवनाथ व ज्योतिर्लिंग ग्रामविकास पॅनल हे दुसरे पॅनल आहे.
थोडक्यात, मरडवाक सारख्या छोट्या गावातील तरुणांनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे. तरुणाई गावचा कारभार चालवण्यासाठी इच्छुक असून, विकासाच्या मुद्द्यावर प्रचार करताना दिसत आहे. त्यामुळे, तालुक्याचं लक्ष या गावातील ग्रामपंचायत निकालांकडे लागून राहिले आहे.