मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
जयहिंद सैनिक संस्थेच्या शिष्टमंडळाने नुकतीच नवी दिल्लीत जाऊन अनेक केंद्रीय मंत्री आणि खासदारांची भेट घेतली आणि 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंती दिनी आयोजित जयहिंद सैनिक संस्थेच्या अधिवेशनासाठी आमंत्रित केले.
या शिष्टमंडळात मुंबईचे माजी उपमहापौर व सैनिक संस्थेचे संरक्षक बाबूभाई भवानजी, सैनिक संस्थेचे सरचिटणीस जनार्दन जंगले, संरक्षक बसंत कुलकर्णी, सहसचिव सुरेंद्र मिश्रा, राजेंद्र टांक आदींचा समावेश होता.शिष्टमंडळाने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री श्री रावसाहेब दानवे, वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री पीयूष गोयल, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री श्री रामदास आठवले, आरोग्य मंत्री श्री मनसुख भाई मांडविया, खासदार श्री राहुल शेवाळे आदींची भेट घेतली आणि त्यांना संमेलनात येण्याचे निमंत्रण दिले.या सर्व नेत्यांनी सैनिक संस्थेच्या कार्याचे कौतुक करत निमंत्रण स्वीकारले आहे.
या नेत्यांनी संस्थेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.सैनिक संस्था ही सैनिक, शिक्षक आणि देशभक्त नागरिकांची संघटना आहे, जी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांच्या प्रसारासाठी काम करते.सैनिक संस्थेने केंद्र सरकारला इंडिया गेटवर नेताजींचा पुतळा बसवण्याची विनंती केली होती, त्यानंतर सरकारने इंडिया गेटवर नेताजींचा पुतळा बसवला.
त्यानुसार जयहिंद सैनिक संस्थेने मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे सुद्धा नेताजींचा पुतळा बसवावा म्हणून पाठपुरावा सुरू ठेवला आहे, तसेच देशातील व राज्यातील विविध शालेय अभ्यासक्रमात नेताजींचे चरित्र आणि कार्ये समाविष्ट करण्याचाही जयहिंद सैनिक संस्था प्रयत्न करत आहे.दिनांक 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचेसह दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी असल्याने संयुक्तपणे जयंती साजरी करण्याचा निर्णय जयहिंद सैनिक संस्थेने घेतला आहे.