पंढरपूर प्रतिनिधी
“रयत शिक्षण संस्था ही रयत सेवकांच्या कष्टातून नावारुपाला आलेली संस्था आहे. रयत शिक्षण संस्थेची निर्मिती ही बहुजन समाजातील मुलांना शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने झाली असल्याने बहुजन समाजातील अनेक दातृत्त्वाचे हात लागल्याने ही संस्था आकाराला आली. त्याग, निष्ठा,योगदान, श्रम यातूनच कोणत्याही संस्थेची निर्मिती आणि विकास होत असतो.
रयत शिक्षण संस्थेला त्यागाचा आणि निष्ठेचा वारसा फुले, शाहू आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचार आणि कार्यातून बहाल झालेला आहे.त्यामुळे रयतचा सेवक हे ब्रीद घेवून आयुष्यभर जगत असतो” असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे माजी सह सचिव प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयातील शास्त्र शाखेच्या उपप्राचार्य तथा अधिष्ठाता डॉ. लतिका बागल यांच्या सेवानिवृत्ती समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त माजी सचिव प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव हे होते. यावेळी मंचावर जनरल बॉडी सदस्य डॉ. राजेंद्र जाधव, जे. बी. भायगुडे सर,सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे , सेवानिवृत्त सचिव शिवाजीराव भोर, प्राचार्य डॉ. मधुसूदन बचुटे, प्राचार्य डी. बी. शिंदे,श्री व सौ. लतिका कांतीलाल बागल आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे पुढे म्हणाले की, “सौ.लतिका बागल यांचे संपूर्ण शिक्षण हे रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाळा आणि महाविद्यालया मध्ये झाले आहे. विवाहानंतर त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे. संशोधन क्षेत्रातील पीएच.डी. सारखी पदवी त्यांनी संपादन केली आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्व जिद्द आणि चिकाटी हे गुण महत्त्वाचे आहेत. एक विद्यार्थिनी, शिक्षिका, गृहिणी, माता,मुलगी, आई. आजी अशा विविध भूमिका त्यांनी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे निभावल्या आहेत. म्हणून त्यांचे जीवन आदर्श असे आहे.”
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव म्हणाले की, “शिक्षक हा विद्यार्थ्यांना आदर्श असतो. विद्यार्थी हे केवळ अध्ययनातून शिकतात असे नव्हे तर शिक्षकांचे ते सातत्याने निरीक्षण आणि अनुकरण ही करत असतात. शिक्षक हे अभ्यासू आणि व्यासंगी असतील तर त्यांचे विद्यार्थी देखील व्यासंगी बनतात. सुंदर विचार आणि राहणीमानाने आपणाला सुंदर व्यक्तीमत्त्व घडविता येते. त्यासाठी अधिकच वेळ देणे आणि तशी काळजी घेणे याबाबी महत्त्वाच्या असतात. शिक्षकांच्या दिसण्यापेक्षाही शिक्षकाचे असणे हे विद्यार्थी आणि समाजासाठी महत्त्वाचे असते. त्यामुळे शिक्षकांनी आदर्श जीवन प्रणाली आचरणात आणली पाहिजे.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी केले. प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांचा परिचय स्टाफ वेलफेअर समितीचे प्रमुख डॉ. सुशील शिंदे यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्री व सौ. लतिका बागल यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व स्मृतीचिन्ह देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास बागल यांचे नातेवाईक, आप्तेष्ट, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रा. डॉ. फैमिदा बिजापुरे, प्राचार्य शिवाजीराव भोर, प्राचार्य डी. बी. शिंदे, एड. यु.सी. बागल, भाग्यश्री कोल्हे –बागल यांनी मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, जयमाला गायकवाड, नागेश फटे, सी. पी. बागल , वसंतनाना देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. भारती सुडके यांनी केले.शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. पी. ए. घाडगे यांनी मानले.