मोहोळ प्रतिनिधी
१ जानेवारी १८४८ साली महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा पुण्यातील भिडेवाडा येथे सुरू केली. या ऐतिहासिक वास्तूचे जतन व्हावे, म्हणून आठ वर्षापासून लढा सुरू असून यासाठी एक जानेवारी रोजी पुण्यामध्ये सन्मान रॅलीमध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे, आवाहन माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भाऊ ठाकरे यांनी मोहोळ येथे बोलताना व्यक्त केले.
दिनांक २८ डिसेंबर रोजी मोहोळ तालुकाध्यक्ष श्रीपाल वसेकर यांनी आयोजित केलेल्या मोहोळ येथील शासकीय विश्रामगृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे बोलत होते यावेळी माळी महासंघाचे किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव वाघमारे, जिल्हाध्यक्ष रंगनाथ नाळे, राष्ट्रीय सचिव भारत माळी, मोहोळ तालुका अध्यक्ष श्रीपाल वसेकर, वैद्यकीय आघाडी प्रदेशाध्यक्ष माळी महासंघ सोमनाथ बोराडे, महिला जिल्हाध्यक्ष विनिता भोजने, सोलापूर युवक जिल्हाध्यक्ष सुहास माळी, प्रसिद्ध प्रमुख सुधाकर जांभळे आदींसह अनेक माळी समाज बांधव उपस्थित होते.
या वेळेस अविनाश ठाकरे म्हणाले कि, भिडेवाडा येथील शाळेत सुरुवातीला सहा मुली शिकत होत्या, अशा या ऐतिहासिक भिडे वाड्याची अवस्था खूप दयनीय झाली असून, ते राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित व्हावे यासाठी २०१४ पासून माळी महासंघाच्या माध्यमातून आम्ही लढा देत आहोत, दरवर्षी एक जानेवारी रोजी पुणे येथे फुले दाम्पत्य सन्मान रॅली काढली जाते. यावर्षी ही रॅली काढण्यात येणार आहे. १७५ वर्षांपूर्वी पहिली मुलींची शाळा महात्मा फुलेंनी पुण्यात सुरू केले ही बाब देशाच्या राज्यातील ९९ टक्के मुलींना व मुलींच्या पालकांना अजूनही माहित नाही, हे शोकांतिका आहे अशा समाजात फुले जन्माला आले त्याच समाजाला अजून फुले समजले नाहीत, ही खेदाची बाब असल्याचेही त्यांनी यावेळी ठाकरे यांनी मत व्यक्त केले.
माळी समाजाच्या अस्मितेसाठी १ जानेवरी फुले दाम्पत्य सन्मानासाठी लाखाच्या संख्येने पुणे येथे उपस्थित राहून या ऐतिहासिक रॅलीचे साक्षीदार व्हावे असे मत अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी या बैठकीत बोलतना व्यक्त केले.