पंढरपूर प्रतिनिधी
"भारतातील असंख्य विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जातात, यामागील कारणांचा शोध घेऊन तशा प्रकारचे शिक्षण भारतातच त्यांना मिळाले; तर परदेशात जाणारा वर्ग आपणास थोपविता येईल. त्याचबरोबर निम्म्या जगाला शिक्षण देण्याची भूमिका आपल्या देशाकडे आहे. या गोष्टीचा विचार नवीन शैक्षणिक धोरणात करण्यात आलेला आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरण हे शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे आहे." असे प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. विजय कुंभार यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात 'प्राध्यापक प्रबोधिनीचे' उद्घाटन करताना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे हे होते. 'ट्रान्सफॉर्मिंग हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन इन मल्टी डिसिप्लिनरी इन्स्टिट्यूशन' या विषयावर रुसा कंपोनंट आठ अंतर्गत त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रभारी कुलसचिव पदी नव नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
आपल्या व्याख्यानात ते म्हणाले की, "भारत हा तिसरी महासत्ता होण्यासंबंधी अनेकजण स्वप्न पाहत आहेत. देशाला महासत्ता बनवण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रच उपयोगी ठरू शकते. वाढती लोकसंख्या ही आपल्या समोरील एक महत्त्वाची समस्या आहे. त्याचा विधायक दृष्टीने विचार करता, मानवी संसाधन म्हणून देशाच्या विकासासाठी ही उपयुक्त ठरू शकते. मात्र वाढती बेरोजगारीची समस्या खरच गंभीर आहे. या देशातील जनतेच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याला सोडविण्याचा रस्ता हा उच्च शिक्षण आणि प्रशिक्षणातच दडलेला आहे. या समाजाला योग्य दिशा देण्याचे उत्तरदायित्व शिक्षकांकडेच आहे."
अध्यक्षीय भाषणात बोलताना प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे म्हणाले की, "प्राध्यापकांनी जबाबदारीने नवीन शैक्षणिक धोरण समजून घेतले पाहिजे. त्यामधील नवीन बदल आत्मसात केले पाहिजेत. नव्याचा ध्यास घेणे आणि त्यासाठी सातत्याने वाचन करणे. स्वतःला घडवणे ह्या गोष्टी शिक्षकांनी अधिक जबाबदारीने स्वीकारल्या पाहिजेत."
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय आणि स्वागत प्राध्यापक प्रबोधिनीचे चेअरमन डॉ. दत्ता डांगे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. भारती सुडके यांनी केले. या कार्यक्रमास कला विभागाचे अधिष्ठाता उपप्राचार्य डॉ. चांगदेव कांबळे, शास्त्र विभागाच्या अधिष्ठाता उपप्राचार्य डॉ. लतिका बागल, वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब शिंदे, सुपरवायझर युवराज अवताडे, सीनियर, ज्युनिअर विभागातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर सेवक बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी प्रा. सिताराम सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.