अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, यंग पृथ्वी फाउंडेशन व मा. आ. श्री. छगनरावजी भुजबळ युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन
एक उत्तम कलाप्रेमी, शिक्षण प्रेमी, गुणवंत, बुद्धिमान असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी कोटी कोटी प्रणाम
पुणे प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारले. तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. तसेच भारताचे मजूर मंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनर्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांमध्ये दिलेले योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार किंवा आधुनिक भारताचे निर्माते असेही संबोधले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएचडी पदवी मिळवली, तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारांमध्ये व चर्चांमध्ये सामील झाले व लोकांच्या अडचणी सोडवल्या. वृत्तपत्रे प्रकाशित केली. दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले.
अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये 1916 साली डॉ.ए.ए. गोल्डनव्हिझर यांनी मानववंशशास्त्र विषयक परिसंवादात भाग घेण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना बोलवले. त्यांनी भारतातील जाती त्यांचा उगम, विकास आणि वास्तविकता या विषयांवर व्याख्यान दिले. तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर हे केवळ 25 वर्षाचे होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या शोध पुस्तिकेत जातीसंस्था विषयक काही सिद्धांत मांडले. ते असे म्हणतात *"वर्ग आणि जात असे म्हणायचे झाले, तर निकटवर्ती होत. कालांतराने ते अलग होतात. बंदिस्त केलेली, गोठवलेला वर्ग म्हणजे 'जात'."
भारतातील वर्ग लढायला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे भरीव काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. जागतिक पातळीवर शोषणमुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रेरणादायी ठरलेले आहेत. जगाच्या इतिहासात असे योगदान करणाऱ्या अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तींमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्थान आहे.
1956 मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनी ६ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले. अशा या सर्वव्यापी सर्व गुणसंपन्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी त्यांनी डोळे मिटले तेव्हा करोडोंच्या डोळ्यात पाणी आले. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या महामानवास इ. स.1990 मध्ये त्यांना मरणोत्तर "भारतरत्न" हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरी केली जाते. इ. स. 2012 मध्ये *"द ग्रेटेस्ट इंडियन"* नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची सर्वश्रेष्ठ भारतीय म्हणून निवड करण्यात आली.
अशा या महामानवास, ज्ञानाच्या अथांग सागरास डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन सामाजिक युवा कार्यकर्त्या सपनाताई माळी शिवणकर, संध्या बेनकर व किरण बेनकर यांनी केले.
सपनाताई माळी शिवणकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रतीचे वाटप करून आगळ्यावेगळ्या प्रकारे अभिवादन करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व त्यांनी देशाला दिलेले संविधान हेच देशाला वाचवतील असेही सपनाताई माळी शिवणकर बोलत होत्या. त्यावेळी बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रताप मानकर, रुग्ण हक्क परिषदेचे उमेश चव्हाण, भवानीपेठ पुणेच्या नगरसेविका मनीषा लडकत, मनीषा शिंदे, संध्या बेनकर, किरण बेनकर यांना संविधान उद्देशिकेच्या प्रती देण्यात आल्या. किरण बेनकर व संध्या बेनकर यांचे विशेष सहकार्य लाभले.