पंढरपूर प्रतिनिधी
दैनंदिन जीवनात आपण अनेक गोष्टींची खरेदी करत असतो. परंतु आपल्याला ग्राहक म्हणून आपले अधिकार माहित असतात का ? ग्राहकांना त्यांचे प्रत्येक अधिकार माहिती नसल्यामुळे त्यांची अनेकदा फसवणूक होते. अशा प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी प्रत्येकाने आपले हक्क व अधिकारी जाणून घ्यावेत असे सह. दिवाणी न्यायाधीश श्रीमती आर.जी.कुंभार यांनी सांगितले.तहसील कार्यालय, पंढरपूर, तालुका विधी सेवा समिती, पंढरपूर व आखिल भारतीय ग्राहक पंचायत, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक परीसंवाद व ग्राहक मेळावा या कार्यक्रमाचे पंचायत समिती, शेतकी भवन, पंढरपूर येथे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास तहसीलदार सुशील बेल्हेकर, अप्पर तहसीलदार समाधान घुटुकडे, पुरवठा निरिक्षण अधिकारी एस.ए.कन्हेरे,बार असोसिएशनचे तालुका अध्यक्ष ॲड.भगवान मुळे, पुरवठा निरिक्षक सदानंद नाईक, आखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांता कोषाध्यक्ष विनोद भरते, जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास उपस्थित होते.
यावेळी न्यायाधीश कुंभार म्हणाल्या, आजच्या काळात आपण सर्वजण मोठ्या प्रमाणात ऑनलाईन वस्तू खरेदी करतो. ऑनलाइन विक्रेत्यांकडूनही ग्राहकांची फसवणूक होते. अशा वेळेस ग्राहकाला कायदेशीर कोणते अधिकार आणि हक्क प्राप्त झालेले आहेत. हे ग्राहकाला माहिती असणं खूप आवश्यक आहे. ग्राहक म्हणून मिळालेले हक्क तुम्हाला माहिती असल्यास आपली फसवणूक होणार नाही. असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच नागरिकांना महिलांविषयी, बालकांविषयी, कौटुंबिक हिंसाचार यासह अन्य कायद्याची माहिती व्हावी यासाठी विधी सेवा समितीच्यावतीने विविध ठिकाणी कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात येते.
त्यामुळे नागरिकांना या शिबिरातून कायदेविषयक माहिती मिळण्यास मदत झाली असल्याचे न्यायाधीश श्रीमती कुंभार यांनी सांगितले.ग्राहक हितासाठी असणा-या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर सर्वच शासन यंत्रणांनी भर दिला आहे. ग्राहकास त्याचे हक्क व कर्तव्य याची जाणीव करुन देण्यासाठी ग्राहक संरक्षण कक्ष, ग्राहक पंचायत तसेच ग्राहक व व्यापारी संघटनाही कार्यरत आहेत. तरी पण ग्राहकाची अडवणूक व फसवणूक होणार नाही यासाठी ग्राहकाबरोबरच समाजातील प्रत्येकांनी पुढे येणे गरजचे आहे. ग्राहक पंचायत संघटना ग्राहकांना जागृत करण्याचे काम करतात असे तहसिलदार बेल्हेकर यांनी यावेळी सांगितले.
ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत कटिबद्ध असून, ग्राहकांनी जागरूकपणे होणाऱ्या शोषणाविरुद्ध संघर्ष करावा. ग्राहक संरक्षण कायद्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या कायद्याची अंमलबजावणी प्रभावी होण्यासाठी शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था व युवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन ग्राहक पंचायतीच्या वतीने करण्यात आले.
यावेळी आखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांता कोषाध्यक्ष विनोद भरते, जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास, दिपक इरकल तसेच बार असोसिएशनचे तालुका अध्यक्ष ॲड.भगवान मुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पुरवठा निरिक्षक सदानंद नाईक यांनी केले.
यावेळी आखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी, विविध विभागाचे अधिकारी तसेच रेशन दुकानदार व नागरिक मोठया उपस्थित होते.