हलगीचा निनाद ; विद्यार्थी लेझीम खेळण्यात रमले ; ग्रामस्थांनी केले जलपूजन
सोलापूर प्रतिनिधी
‘चला जाणूया नदीला' उपक्रमांतर्गत नदी संवाद यात्रेचा आजचा दुसरा दिवस. राष्ट्रीय जल पुरस्कार विजेत्या कासाळगंगा प्रकल्पांतर्गतच्या महिम, खिलारवाडी आणि गायगव्हाणमध्ये आज पर्यावरणाचा जागर करण्यात आला.
हलगीवादन हे महिमच्या कलावंतांचे वैशिष्ट्य. हलगीवर टिपरु पडताच, पाय थिरकायला लावतात, इतके जबरदस्त कौशल्य कलावंतांनी अवगत केले आहे. एवढेच नव्हे, तर दुष्काळाशी झुंजत असताना बाहेरुन वैरण विकत आणून महिमकरांनी दुग्धोत्पादन केले. कासाळगंगाच्या पुनर्जीवनातून इथे वैरणीचे उत्पादन शेतकरी करु लागले असून दुग्धोत्पादनात जवळपास तिप्पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे नदी संवाद यात्रेच्यानिमित्ताने महिमकरांच्या उत्साहाचे दर्शन घडले.
महिमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली. त्यात सरपंच अर्चना नारनवर, ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब खटकाळे, कासाळगंगा प्रकल्पाचे समन्वयक बाळासाहेब ढाळे, उपसरपंच नानासाहेब बंडगर, ग्रामपंचायत सदस्य वसंत रुपनगर, डॉ. पद्मसिंह पाटील माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप चौगुले, पोस्ट मास्तर ज्ञानेश्वर हेगडे, पोलिस पाटील अभयकुमार रुपनर आदि उपस्थित होते. प्रभात फेरी कासाळगंगाच्या काठावर गेल्यावर कलश आणि जलपूजन करण्यात आले.
खिलारवाडीमधील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या लेझीम खेळण्यातून वातावरण भारावून गेले होते. कासाळगंगा समन्वयक बाळासाहेब ढाळे यांनी नदी संवाद यात्रेत सहभागी झालेल्या पहिलीतील कनक बागल हिचा जलकन्या म्हणून सन्मान केला. यात्रेंतर्गत गावातून फेरी काढण्यात आली. त्यामध्ये सरपंचा शांताबाई हिप्परकर, उपसरपंच विनायक बागल, ग्रामपंचायत सदस्य द्रौपदी खांडेकर, अमर कोळी, शरद हिप्परकर, ग्रामसेविका सुवर्णा साळुंखे आदि सहभागी झाले होते.
गायगव्हाणमधील नदी संवाद यात्रेने दुसऱ्या दिवसाच्या उपक्रमाची सांगता झाली. गायगव्हाणच्या सरपंचा अनिता कांबळे, ग्रामविकास अधिकारी खानसाहब मुलाणी, तलाठी एम. आर. गायकवाड, पोलिस पाटील विद्या कांबळे, शिक्षक ए. एच. बोराडे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ पाटील, लता साळुंखे, ज्योती साळुंखे आदिंचा नदी संवाद यात्रेतील फेरीमध्ये सहभाग होता.
कासाळगंगा प्रकल्पांतर्गतच्या नदी संवाद यात्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी अविनाश खांडेकर, जलसंपदा विभागाचे अभियंता एस. के. कुंभार, कृषि पर्यवेक्षक मधुकर चव्हाण, मंडलाधिकारी जयवंत सोंडगे, लघु पाटबंधारे विभागाचे डी. जे. कुलकर्णी, जलसंपदा विभागाचे डी. जे. कारंडे, टी. एस. सरगर, एस. एस. सरगर, बांधकाम विभागाचे सुनील पाठक, ए. ए. शिंदे यांचा सहभाग राहिला. तसेच शाळांमधून निबंध, चित्रकला, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. नदी संवाद यात्रेतंर्गत उद्या बुधवारी (ता. २८) सकाळी दहाला गार्डी, दुपारी बाराला लोणारवाडी आणि दुपारी तीनला पळशी-सुपली येथे उपक्रम राबवण्यात येणार आहे.