ऊस शेतीमध्ये जैविक खतांचा वापर वाढवावा : डॉ. सुनील दळवी
भाळवणी प्रतिनिधी
रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी झाल्यामुळे उत्पादनात प्रचंड घट होऊ लागली आहे. त्यासाठी उत्पादन वाढीसाठी ऊस शेतीमध्ये वसंत ऋतू या जैव संजिवकांचा वापर करून इतर जैविक खतांचा वापर वाढवून विषमुक्त शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावा असे आवाहन शास्त्रज्ञ डॉ. सुनील दळवी केले.
भाळवणी (तालुका : पंढरपूर) येथे पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊस पीक परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ऊस पीक परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी पांडुरंग कारखान्याचे माजी चेअरमन दिनकरभाऊ मोरे व्हा. चेअरमन कैलास खुळे यांच्या शुभहस्ते पांडुरंग परिवाराचे कुटुंबप्रमुख स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी टिश्यू कल्चर विभाग व्ही.एस आय. पुणे येथील डॉ. सुनील गवळी (विषय : ऊस शेतीमध्ये जैव संजिवकाचा वापर) व उती संवर्धन विभगाचे संशोधन अधिकारी आर.बी. भोईटे (विषय : ऊस जाती - उत्पादन वाढीकरिताच्या उपाययोजना) यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी संचालक हरिष गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी पांडुरंग कारखान्याचे संचालक भगवान चौगुले, बाळासाहेब यलमार, तानाजी वाघमोडे, गंगामामा विभुते, विजय जाधव, सुदाम मोरे, शामराव साळुंखे, राणी पाटील, हणमंत कदम, हरिभाऊ शिंदे, ज्ञानेश्वर गवळी, सरपंच राजकुमार पाटील आदी भाळवणी गटातील सर्व ऊस सभासद व कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऊस विकास अधिकारी एस .पी. भालेराव यांनी केले तर सूत्रसंचलन ग्रामपंचायत सदस्य नितीन शिंदे यांनी केले.