दिवाळी अंक समिक्षा
- समिक्षक- सावळीराम तिदमे, नाशिक
दिवाळी अंक वाचण्याचा छंद .
दरवर्षी झोपडीपासून राज प्रासादापर्यंत दिवाळीचा फराळ बनवून त्याचा आस्वाद घेण्याची परंपरा आहे. तशी दिवाळी अंक प्रकाशित करणारी परंपरा अद्याप टिकून आहे . दरवर्षी दिवाळी अंकांची संख्या कमी कमी होत आहे , ही चिंतेची बाब आहे . दिवाळी अंक विकत घेऊन वाचणं , समुह तयार करून विविध अंक विकत घेणे , वाचनालयाद्वारे विविध दिवाळी विशेषांकांचा आस्वाद घेणे या छंदाला ओहोटी लागली आहे . माऊली माय मराठी बद्दलचं प्रेम , जिव्हाळा , गोडवा , आत्मीयता , कृतज्ञता , अस्मिता यांचा दुष्काळ निर्माण झाल्यासारखं वातावरण आहे . मातृभाषा प्रेम माणसामाणसात , घराघरात शोधण्याची वेळ आलीय . शुध्द मराठी , गुणात्मक मराठी , दर्जेदार मराठीभाषा अशा आग्रहाचा विसर पडत चाललाय .आपली मातृभाषा मराठी आहे , मातृभाषेबद्दल आपलं काही कर्तव्य आहे , जबाबदारी आहे . मातृभाषेच्या गुणात्मक विकासासाठी आपण काही तरी करावं ही जाणीव लुप्त झालीय . भाषाविषयक ज्ञान , जान आणि भान विरळ बनत चाललंय . हे सर्व थांबविण्यासाठी व्यक्ति , कुटूंब , समाज , संस्था , सरकार अशा सर्व स्तरात जाणीवा निर्माण करायला हव्यात . आपल्या शिक्षण प्रणालीतून हा प्रयत्न दमदारपणे व्हायला हवा . मातृभाषाप्रेम जागृतीच्या मिशनची गरज निर्माण झाली , वाढत चालली . बालकापासून पालकापर्यंत सर्वांमध्ये मातृभाषा प्रेमाची मात्रा घटली . ही घसरण आपोआप थांबणार नाही . जाणीवपुर्वक , सुसंघटीत प्रयत्न केल्याशिवाय माऊली माय मराठीची भरभराट होईल कशी ? मराठी भाषा दिन , साहित्य संमेलन , भाषा सप्ताह असं प्रासंगिक , तूटक तूटक , तात्कालीक , क्षणिक प्रयत्नांनी फारसं काही होणार नाही . मराठी मन , बुध्दी व अंतःकरणात मातृभाषा प्रेमाची ज्योत पेटवावी लागेल .
नाशिक जिल्ह्यातील, ईगतपुरी तालुक्यातील आहुर्ली ता . इगतपुरी येथून दरवर्षी प्रकाशित होणारा साहित्य परिषद दिवाळी अंक. यंदाचे वर्ष ११ वे. यंदा तयार झालेला श्रीमान नवनाथ गायकर हे संपादक असलेला साहित्य परिषद २०२२ हा दिपावली विशेषांक वाचण्यात आला .
या अंकाच्या संपादकीयातच संपादक नवनाथ गायकरांनी वरीलप्रमाणे मराठी भाषेबद्दलचा विषय अत्यंत पोटतिडिकेने मांडला आहे . मराठी भाषेबद्दलची त्यांची तळमळ , धडपड त्यांनी अचूक मांडली आहे . दृढ निष्ठा व सतत कठोर परिश्रमाद्वारे आपण माऊली माय मराठीला गतवैभव प्राप्त करून देऊ शकतो , अशी मांडणी त्यांनी केली आहे .
वैज्ञानिक सेवा , सुविधा , साधने यामुळे माणसाच्या आवडी निवडी , छंद , जीवनशैली यात बदल झाला . त्यामुळे चांगला आणि वाईट असे दोन प्रकारचे बदल झाले .आपण चांगल्याचं संवर्धन व वाईटाचा त्याग असं पाऊल उचललं पाहिजे . पण तसं होत नाही . माणसं जगविण्यासाठी विविध स्तरावर योजनाबध्द प्रयत्न केले जातात तसं मातृभाषा जगविण्यासाठी आपण काय करतो ? आत्मपरीक्षण करायलाच हवं . त्यातून बोध घेऊन कृतिशील व्हायला हवं . नुसतं शासन प्रशासन काय करणारं ?
साहित्य परिषद दिवाळी अंक मी वाचतोय. खूप आनंद वाटला . विविध प्रकारच्या अक्षरधनातील ज्ञानशलाका अंतरंग खुलवतात , टवटवीत करतात . सुंदर सुंदर लेख , कथा , कविता , समीक्षा , गझल , बोधप्रवर्तक विचारांचा समावेश या विशेषांकात जाणीवपुर्वक व अचूक करण्यात आलेला आहे . किती किती विषय या अंकातून मांडलेत . रसिक तृप्त व्हावा , वाचकाचं मन प्रफुल्लीत व्हावं असं ज्ञानधन या अंकाने देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे .
भारत एक आर्थिक महासत्ता या लेखातुन देशाच्या आर्थिकदृष्टय़ा बलवत्तेचे सुदुर लेखन केले आहे.
मानवी विकासाच्या पायाभरणीसाठी बालसाहित्याची गरज या लेखात पायाभरणी वर जोर दिला असुन, सध्याच्या बालकांवरील संस्कारावर प्रश्नचिह्न उभे केले आहे.
खरी शिवसेना कोणाची ? या लेखातून राज्याच्या विदयमान घडामोडींची चिरफाड करण्यांत आली आहे.
मुत्सद्दी नानासाहेब फडणवीस , माझे बालपण , बोरमाळ , एक कूटनितीज्ञ , बैलगाडी , एक पाऊल टाकू मी माझा च्या पलीकडे , भूत पाहिलेला माणूस , राष्ट्र व धर्मनिष्ठ राजा हेमु. कवितांचे एकसे बढकर एक आविष्कार या अंकात समाविष्ट आहेत . त्यामुळे अंक आकर्षक व संग्राह्य बनला आहे .
हा सर्वागीण सुंदर दिवाळी अंक जरुर वाचकानीं वाचायलाच हवा.
जिज्ञासूंसाठी संपादकांचा भ्रमणध्वनी
श्री . नवनाथ गायकर 9881329709 , 9763827708 .
लेखन-सावळीराम तिदमे ,श्रीक्षेत्र नाशिक