एकच लक्ष प्रत्येक बीजातून फुलावा फळावा वृक्ष
पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
कार्तिक वद्य त्रयोदशीला संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. या वर्षी मंगळवार दिनांक २२ नोहेंबर २०२२ ला सोहळ्याचे ७२६ वे वर्ष होते. वारकरी संप्रदाय कीर्तन, प्रवचन, भारुड, पूजा-अर्चा, सेवाभावी उपक्रम अशा विविध सांस्कृतिक आणि पारंपारिक पद्धतीने हा सोहळा साजरा करत असतो. या अनोख्या सोहळ्याच्या निमित्त श्री क्षेत्र आळंदी येथे बायोस्फिअर्स संस्था आणि श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवाची यांच्या संयुक्त विद्यमाने “सुवर्ण पिंपळ बीज प्रसाद अभियान” राबविण्यात आले. सदर अभियानात संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून सुवर्ण पिंपळ बीज प्रसाद देशातील हिरवाई वाढावी, या वारसा वृक्षाचे जतन – संवर्धन व्हावं, जनमानसात सकारात्मक भाव यावा या उद्देशाने हे बीज माऊली हरित अभियाना अंतर्गत सर्वदूर केले गेले. सदर बीज हे आळंदी येथील मूळ सुवर्ण पिंपळाचे आहे. ते उपलब्धतेनुसार संकलित करून बीज प्रसाद म्हणून वाटत आहोत. जेणेकरून नागरिकांनी जास्तीत जास्त ठिकाणी या बीजापासून रोपांची निर्मिती करावी.
भगवान श्रीकृष्णांनी संसाराला अश्वत्थ वृक्षाची उपमा दिली तर भगवान बुद्धांना बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले होते. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी जवळ अजानवृक्ष आहे. आपल्या देशात तुळशीपासून तर वटवृक्षापर्यंत प्रत्येक झाडाला सांस्कृतिक महत्व आहे. वृक्षारोपण हे भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग असून वृक्षारोपण हे लोकसहभागातून होऊन त्याद्वारे पर्यावरण रक्षणाचे कार्य केले जावे असा उद्देश या अभियानाचा आहे. आपल्या देशात प्रत्येक झाडाचे सांस्कृतिक महत्व जाणून पूजा केली जात असे. यामागे शास्त्रशुद्ध चिंतन व दूरगामी विचार होता. परकीय आक्रमणाच्या काळात शास्त्रीय विचार मागे पडून केवळ रूढी उरल्या. त्यामुळे प्रत्येक झाडाचे शास्त्रीय महत्व समजून त्याचे वृक्षारोपण केले जावे अशी अपेक्षा या अभियानाची आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर, आळंदी येथे प्रवेश केल्यानंतर उजव्याबाजूला पुरातन काळापासून उभे असलेले पिंपळाचे (अश्वत्थ) झाड आहे त्याला “सुवर्ण पिंपळ” असे संबोधले जाते. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मातोश्री रुक्मिणी माता यांनी या प्राचीन पिंपळास सव्वा लक्ष प्रदक्षिणा घातल्या होत्या. सदर पिंपळाचे रोपण हे श्री कुबेराने केले आहे अशी एक जनमान्यता आहे. श्री ज्ञानोबाराय आणि या वृक्षाचे देखील एक अलौकिक नातं आहे. माऊलींच्या जन्मापासून ते संजीवन समाधी पर्यंतच्या प्रवासाचा हा वृक्ष साक्षीदार आहे. माऊलींनी समाधिस्त होण्याआधी सुवर्णपिंपळाच्या पायाशी मस्तक ठेवून नमन केले होते, त्याचा कृपाशीर्वाद घेतला होता. असा हा भारत राष्ट्राचा अध्यात्मिक वारसा असलेला वृक्ष त्याच्या अध्यात्मिक, पर्यावरणीय तसेच औषधी गुणधर्मांनी सुपरिचित आहे. या सिद्ध वृक्षाचे वर्णन आणि त्याची थोरवी आपल्या संतांनी सांगून ठेवली आहे. जसे की....
जयाचिये द्वारीं सोन्याचा पिंपळ ।
अंगीं ऐसें बळ रेडा बोले ॥
- संत तुकाराम
धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार । धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी ॥
- संत नामदेव
समाधिसमयीं सकळ समुदाय । घेउनी सुरवर आले श्रीपंढरीराय ।
द्वारीं अजानवृक्ष सुवर्ण पिंपळ असुमाय । जाणोनि महिमा निळा चरणातळीं राहे ॥
- संत निळोबाराय
पिंपळाचे पारीं बैसविल्या पंक्ती । पात्रें ते श्रीपती वाढूं लागे ॥
- संत नामदेव
सदर सुवर्णपिंपळ बीजाचे वाटप आळंदी मंदिर प्रांगणात, सुवर्णपिंपळ पाराजवळ मान्यवरांच्या आणि वारकरी संप्रदायाच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी श्री. श्रीकांत लवांडे; श्री. पुरषोत्तम जोशी; डॉ. सचिन अनिल पुणेकर; श्री. उमेश महाराज बागडे; श्री. बाळकृष्ण मोरे; श्री. सोमनाथ लवांडे; श्री. दत्तात्रय महाराज गायकवाड; श्री. पराग शिळीमकर; श्री. आनंद पेंडूरकर; श्री. बापू ननावरे; सौ. सुप्रिया शिळीमकर, मोठ्या संखेने स्थानिक ग्रामस्थ आणि वारकरी संप्रदाय उपस्थित होते. या प्रसंगी सुवर्ण पिंपळाविषयीच्या माहिती पत्रकाचे अनावरण देखील करण्यात आले. सदर उपक्रमाच्या यशस्वी नियोजनाकरिता डॉ. सचिन अनिल पुणेकर; श्री. दत्तात्रय महाराज गायकवाड; श्री. वल्लभ महाराज गपट; सौ. मंगल अनिल पुणेकर आणि मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली.
बायोस्फिअर्स संस्थेच्या माध्यमातून ‘माऊली हरित अभियान’ हाती घेतले आहे. या अभियानाचाच एक महत्वाचा पैलू म्हणजे श्री क्षेत्र आळंदी – सिद्धबेट येथील मूळ ज्ञानवृक्ष-अजानवृक्षाची रोपे आणि देववृक्ष सुवर्ण पिंपळाचे बीज सर्वदूर पोहचवणे होय. एकुणातच काय या अध्यात्मिक, औषधी आणि पर्यावरणीय दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या वृक्षांच्या संवर्धनासाठी तसेच आपल्या संस्कृती, परंपरेमधल्या महत्वाच्या वारसा वृक्षांबाबत जनमानसात-भाविकांत काही अंशी जाण वाढावी, त्यांच्यात योग्यती सकारात्मकता यावी या उद्देशाने हा उपक्रम. आजपर्यंत या हरित अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील, भारतातील अनेक तीर्थक्षेत्रे, गडकोट, मंदिरे, अध्यात्मिक-केंद्रे, संजीवन समाधी, विद्यापीठे, शैक्षणिक व संशोधन संस्था यांच्या आवारात याचे रोपण व संवर्धन करण्यात आले आहे.
हे अभियान म्हणजे जणू अध्यात्म आणि विज्ञान यांची सुरेख सांगडच...! ह्या सिद्ध वृक्षाचा महिमा जाणता या प्रसंगी संत तुकोबारायांचा “शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी” या अभंगाचे स्मरण आवर्जून होते.
)