शोषण विरहित समाजरचना हे बळीराजाचे खास वैशिष्ट्य होते - निलेश देशमुख
कुर्डूवाडी / माढा प्रतिनिधी
बळीप्रतिपदेनिमित्त कुर्डूवाडी ता. माढा येथे मराठा सेवा संघाच्या वतीने बळीराजा पूजन करण्यात आले. बळीराजा पूजन व जिजाऊ पुजन लऊळ ता.माढा येथील प्रगतशील शेतकरी नवनाथ बबन ढोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत मकर,मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटिल, तालुकाध्यक्ष निलेश देशमुख, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा नीता खटके-पाटील, माजी प्राचार्य एम.आर.पाटील,उद्योजक सतिश कन्हेरे, अरूण जाधव, दिलीप उकरंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा होता. आजही शेतकऱ्याला बळीराजा असे म्हटले जाते. ग्रामीण भागात दर दिवाळी-दसऱ्याला आमच्या माता-बहिणी “इडा पीडा जावो आणि बळीचे राज्य येवो !” असे म्हणून घरातील पुरुषांना ओवाळतात. चार हजार वर्षापूर्वी बळीराजाचं सुखी व संपन्न राज्य संपूर्ण आशिया खंडात होते. बळीराजाच्या काळात शेतकरी अतिशय सुखी व संपन्न होता. शेतकऱ्यांना शेती विषयक सर्व ज्ञान असल्याने त्यांची शेती समृद्ध होती. प्रजा सुखी, समाधानी व कर्तबगार होती. शोषण विरहित समाजरचना हे बळीराजाचे खास वैशिष्ट्य होते असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे माढा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख यांनी यावेळी बोलताना केले. पुढे बोलताना त्यांनी, बळीराजा हा प्राचीन भारतातील एक अत्यंत सद्गुणी, प्रजाहितदक्ष व सामर्थ्यशाली असा विख्यात राजा होता. आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला तिच्या कष्टाचे व हक्काचे फळ सम्यक रीतीने विभागून देणारा संविभागी शेतकऱ्यांचा राजा जो सात काळजाच्या आत जपून ठेवावा असा असल्याचे सांगितले.
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या कुर्डूवाडी शहराध्यक्षा अरूणा पाटील, शहर सचिव सारिका भांगे,मराठा सेवा संघाचे तालुका कार्याध्यक्ष शिवाजी गवळी, उपाध्यक्ष अरूण जगताप, कुर्डूवाडी शहराध्यक्ष सचिन महिंगडे, प्रताप गवळी, भगवान गावडे, महादेव कांबळे, राजेंद्र कदम एस.एम.मोहिते, माणिक गोरे व सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शिवमती रंजना श्रीकांत हासुरे लिखित "महासम्राट बळीराजा" पुस्तक उपस्थित सर्वांना भेट देण्यात आले. या पुस्तकातून 'बळीराजा' लोकांपर्यंत पोहोचेल असे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटिल यांनी सांगितले.