मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र पर्यटन संचालनालय तसेच सामाजिक कार्यकर्ते, कलासंग्राहक परवेज दमानिया आणि रतन लुथ यांच्या संकल्पनेतून मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या पंढरीची वारी या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचा समारोप सोहळा आज संपन्न झाला.
आषाढी एकादशीला लाखो वारकरी पंढरपूरला विठुरायाचे दर्शन घेण्याकरिता चालत जातात. छायाचित्रकारांनी वारक-यांचे भाव आणि वारकरी बांधवांच्या वारी दरम्यानच्या प्रवासातील क्षणचित्रे टिपून संपूर्ण वारीचे दर्शन छायाचित्रांच्या माध्यमातून घडविले असल्याची भावना यासमयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
या प्रदर्शनात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळालेले छायाचित्रकार आणि पद्मश्री सुधारक ओलवे यांच्यासह छायाचित्रकार शांतनू दास, महेश लोणकर, पुबारून बसू, मुकुंद पारके, सौरभ भाटीकर, डॉ. सावन गांधी, प्रणव देव, राहुल गोडसे, ज्ञानेश्वर वैद्य, प्रा.नितीन जोशी, दीपक भोसले, शिवम हरमलकर यांच्या छायाचित्रांचाही समावेश करण्यात आला होता.
याप्रसंगी राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, विभागाचे सचिव सौरभ विजय, पर्यटन संचालनालयाचे संचालक बी.एन.पाटील, सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.