मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
कोरोना काळामध्ये अनेक सामाजिक संस्था व व्यक्तींनी समाजभान जोपासत गरजूंसाठी सढळ हस्ते मदत केली. यात जिवनावश्यक वस्तुंपासून दररोजच्या जेवणापर्यंत सर्व प्रकारची मदत यथाशक्ती करण्याचा प्रयत्न समाजातील संवेदनशील घटकांनी केला. वास्ताविक स्वार्थ व वैयक्तिक हितासाठी झगडणाऱ्या आजच्या दुनियेत सामाजिक बांधिलकी व माणुसकी लोप पावत चालली आहे. प्रत्येक जण इथे फक्त स्वतःपुरताच विचार करतो. यामुळे गरीब श्रीमंत दरी समाजात वाढत चालली आहे. ही दरी कमी करायची असेल समाजातील गरीब, दुर्बल व वंचित घटकांचा विचार कुणीतरी करायला हवा. त्यांच्या अपेक्षा फार नसल्या तरी जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची मदत त्यांना मिळायला हवी.
यासाठी समाजातील धनाढ्य, उद्योगपती, मोठमोठ्या सामाजिक संस्था यांचेमार्फत जाणीवपूर्वक प्रयत्न होणे आवश्यक आहेच पण समाजभान जपणाऱ्या संवेदनशील नागरिकांचा सहभागदेखील मोठा बदल घडवू शकतो. कोरोनाने आपल्याला बरेच काही शिकवले आहे. पैसा, संपत्ती, मालमत्ता या बाबी क्षणभंगुर असुन या सर्वांपेक्षा व्यक्तीचे आरोग्य व इतरांना केलेली मदत आयुष्यात सर्वात उपयोगी पडते. याच जाणीवेतुन अनेक मोठमोठया संस्था, कंपन्या, उदयोग, धनाढयांनी कोरोना काळात लोकांच्या मदतीला धावून जात मोठी मदत उभी केली व त्यातून सामाजिक बांधिलकीचे एक अनोखे रुप पाहायला मिळाले...
अशाच प्रकारे सामाजिक बांधीलकीतून एकत्र आलेला "जॉय ऑफ गिव्हिंग" हा आमचा सोशल ग्रुप सातत्याने गरीब, गरजू लोकांसाठी विविध उपक्रम राबवत समाजभान जोपासण्याचे काम करत आहे. आधुनिक तंत्रज्ञान व एशोआरामाच्या दुनियेत हरवत चाललेल्या आजच्या तरुण पिढीला सामाजिक व्यवस्था व बांधिलकीचे फार भानच राहिलेले नाही. पैसा, पैसा व केवळ पैसा करत आपल्या आयुष्यातील महत्वाची वर्षे कोणत्याही सामाजिक जबाबदारीविणा घालवत असलेली आजची तरुण पिढी भविष्याच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे.
मात्र तरीदेखील समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो व समाजातील गरीब, गरजू, दुर्लक्षित घटकांसाठी आपल्या कमाईतील काही भाग किंवा काही वेळ देता यावा अनेक जण अक्षरशः धडपडत असतात. त्यातीलच एक हरहुन्नरी व्यक्ती म्हणजे जोगेश्वरीचे आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त सन्मा.गणेश हिरवे सर. पेशाने शिक्षक असलेल्या गणेश हिरवे यांना समाजकार्याची भारी हौस नव्हे तर व्यसनच लागले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हिरवे सरांनी करोना काळात पाच वेळा आणि आतापर्यंत एकूण ३५ वेळा रक्तदान केलय हे विशेष.विनामूल्य पुस्तकं भेट देण्याच्या छंदामुळे आतापर्यंत गणेश सरांनी १३ हजारांहून अधिक पुस्तक वितरण केली आहेत.मात्र या समाजसेवेला आपले सोबती व समाजातील सधन-गुणी व्यक्तींची साथ लाभावी या हेतूने त्यांनी "जॉय ऑफ गिव्हिंग" हा ग्रुप तयार केला.
मुंबई, महाराष्ट्रतील अनेक भागांत या ग्रुपचे सभासद आज पसरले असून यातील प्रत्येकजण उदार व उदात्त हेतूने प्रेरित आहे. प्रत्येकाच्या कार्याबहुल्यात अधिक वेळ त्यासाठी देता येत नसल्याने व्हाट्सअपच्या माध्यमातून या ग्रुपचे सर्व सदस्य जोडले गेले आहेत. जे या ग्रुपद्वारे दररोज एकमेकांच्या संपर्कात असतात. सर्वाना सोयीचा दिवस साधून या ग्रुपचे सदस्य सातत्याने विविध ग्रामीण व आदिवासी भागात दौरे करतात व तेथील गरजू लोकांना, वृद्धांना, अनाथांना, विद्यार्थ्यांना विविध गरजेच्या वस्तूंची मदत करतात. आजवर या ग्रुपने अनेक लोकोपयोगी उपक्रम विविध भागांत राबवलेले आहेत. सध्याच्या कोरोना काळात किराणा किट, आरोग्य किट व जीवनावश्यक वस्तू यांचे वाटप गरजुंना करण्यात आले.
लॉकडाऊन काळात आजवर जवळपास सुमारे पाच ते सहा हजार गोरगरीब, वंचित व गरजू कुटुंबाना किराणा किट देण्याच काम संस्थेतर्फे करण्यात आले व अजुनही हे काम नियमितपणे सुरू आहे. कोणताही स्वार्थ व प्रसिद्धीची अपेक्षा न बाळगता सोशल माध्यमावरील हया ग्रुपचे सदस्य सढळ हस्ते आर्थिक व वस्तूरुपी योगदान देऊन संस्थेचा प्रत्येक उपक्रम यशस्वी करत असतात. सन २०२१-२२ मध्ये जॉय ने लोकडाऊन काळात विविध स्पर्धांचे आयोजन केलं होत त्याचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच ५ जून २०२२ रोजी करण्यात आला.
यावेळी समाजात चांगले काम करणाऱ्या संस्थाना विशेष पुरस्कार आणि महिलांना नारीशक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सधन व दानशूर व्यक्तींनी दुर्बल घटकांना मदत केली तरच सामाजिक संतूलन राखले जाईल या उदात्त भावनेने जॉयचे सभासद आपला दिनक्रम सांभाळून समाजकार्यात व्यस्त असतात. समाजातील सर्व घटकांपर्यंत हा आनंद व समाधान पोहोचवायचा असेल तर तरुणाईने पुढाकार घेऊन जागोजागी अशा प्रकारचे सामाजिक बांधिलकी जोपासणारे सोशल ग्रुप तयार होणे गरजेचे असल्याचे संस्थेचे संस्थापक हिरवे सर सांगतात.
आताच अनेक गरजू शाळांना साधारण २५ पंखे आणि भांडुप येथील केणी विद्यालयातील वंचित २२५ विद्यार्थ्याना किराणा किट व शैक्षणिक साहित्य देऊन सहकार्य करण्यात आले.संस्थेच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन संस्थेला अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत.सांगली-कोल्हापूर पुर आणि महाड पुर येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी देखील जॉय चे कार्यकर्ते ट्रक भरून सामान घेऊन स्वतः गेले होते.
यंदाही दिवाळी निमित्त जोगेश्वरी पूर्व येथील लक्ष्मीबाई वळंजू शाळेतील १४० विद्यार्थ्याना किराणा किट, टॉवेल व मिठाई बॉक्स देऊन मदत करण्यात आली.सोशल माध्यमांचा वापर चांगल्या व समाजोपयोगी कामासाठी कशा प्रकारे करता येतो याचा उत्तम आदर्श जॉय ऑफ गिव्हिंगने समाजासमोर उभा केलेला आहे.