पालकमंत्र्यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ
सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने ग्रामपंचायतीचे सक्षमीकरण करण्यासाठी सुरू केलेले अभियान खूप महत्वपूर्ण आहे. या अभियानामुळे गावांचा सर्वांगीण विकास होईल, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.
नियोजन भवन येथे आज जिल्ह्यात ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियानाचा शुभारंभ आणि अभियान माहिती पुस्तकाचे अनावरणप्रसंगी पालकमंत्री श्री. विखे पाटील बोलते होते. यावेळी आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, विजय देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे आदी उपस्थित होते.
श्री. विखे-पाटील यांनी सांगितले की, सीईओ दिलीप स्वामी यांची संकल्पना आदर्शवत असून या अभियानामध्ये सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी व्हावे. यासाठी बनविणेत आलेली माहिती पुस्तिका खूप उपयुक्त आहे.
श्री. स्वामी यांनी अभियानाची माहिती दिली. 2 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर 2022 या कालावधीत हे अभियान सुरू राहणार आहे. ग्रामपंचायत प्रशासनाचे सक्षमीकरण करणे, ग्रामपंचायतमार्फत देण्यात येणाऱ्या सुविधा व सेवा, ग्रामपंचायतीच्या योजना लोकाभिमुख करणे, ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविणे, ग्रामसेवक व कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन त्यांचे बळकटीकरण करणे, ग्रामस्थांना उत्तम प्रकारे संगणकीकृत सेवा पुरविणे, आपले सरकार सेवा केंद्र पारदर्शक व सक्षम बनविणे, ग्रामपंचायत इमारतीचे सौंदर्यीकरण करणे, ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण व बाग बगीचा करणे, ग्रामपंचायत कारभार जलद करणे, ग्रामपंचायतीचे अभिलेख वर्गीकरण करणे आदी उद्दिष्ट्ये या अभियानाची आहेत.
श्री. शेळकंदे यांनी सांगितले की, सक्षमीकरण, सुशासन, स्वावलंबन, सेवाहमी व सुशोभिकरण या प्रमुख मुद्यांवर जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबविणेत येणार आहे.