(भाग-८)
जॉर्ज फर्नांडिस
३ जून १९३० रोजी मंगलूर येथे एका कॅथॉलिक कुटुंबात जन्मलेल्या जॉर्जने *जगण्यासाठी* मुंबई गाठली. मुंबईमध्ये कोणी ओळखीचे नाही, आधार देणारे नाही, नोकरी नाही, खाण्यापिण्याची सोय नाही, तरीही हजारो - लाखो लोकांप्रमाणे जॉर्जनेही मुंबई गाठली व जगण्यासाठी कसरत करायला सुरुवात केली. *रस्त्याच्या कडेला फूटपाटवर दिवस - दिवस कामाच्या शोधात बसून रहायचे, रात्र झाली की चौपाटीवरील वाळूमध्ये टाकलेल्या बाकांवर झोपायचे, मध्येच पोलिसांनी काठी मारून उठविले की दुसरीकडे निवारा शोधायचा* अशी वन-वन करत जॉर्ज अतिशय *चिकित्सक बुद्धीने* आजूबाजूचे वातावरण पहात होता. मुंबई हे *कामगारांच्या जीवावर* उभारलेले शहर, परंतु कामगारांची *दयनीय अवस्था* पाहून जॉर्जच्या मनात त्यांच्याबद्दल *आत्मियता* निर्माण होत होती.
भारतातील *सर्वात श्रीमंत व बलाढ्य राजकारणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री.स.का.पाटील यांचे मुंबईवर राज्य होते.* एके दिवशी श्री.स.का.पाटील यांची एका मैदानावर सभा सुरू होती. जॉर्जला ही सभा कोणाची आहे हे माहीत नव्हते, परंतु सभा ऐकण्यासाठी तोही गर्दीत मिसळला. प्रचंड *गर्दीमुळे तेथे चेंगराचेंगरी झाली व जॉर्जला देखील त्यामध्ये त्रास झाला.* याप्रसंगी जॉर्जच्या मनात विचार आला, *की कामगारांच्या जीवावर मोठे होणारे हे पुढारी कामगारांना न्याय देऊ शकत नाहीत. आजच्या सभेमध्ये मला त्रास ज्या माणसामुळे झाला, त्या माणसाला एक दिवस मी निवडणुकीत पराभूत करेन.* रस्त्यावर वन - वन भटकणाऱ्या अशा *निर्धन* जॉर्जने भारतातील सर्वात *श्रीमंत व बलाढ्य* राजकारण्याचा पराभव करण्याचा विचार करणे म्हणजे *मुंगेरीलाल के सुहाने सपने* असेच कोणीही म्हटले असते.
परंतु योगायोगाने त्याच वेळी जॉर्ज हे *समाजवादी नेते राम मनोहर लोहिया* यांच्या संपर्कात आले, त्यांच्या विचारांनी ते प्रभावित झाले व त्यांनी मुंबईतील कामगारांसाठी काम करण्याचे ठरवले व त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. अभ्यासूपणाने परिश्रम घेऊन जिद्दीने त्यांनी *कामगारांचे संघटन* केले. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलने उभारली. जॉर्ज यांच्या लढ्याला हळूहळू यश येऊ लागले. कामगार वर्गामध्ये जॉर्ज लोकप्रिय बनू लागले. *१९६७ची लोकसभा निवडणूक* आली, काही वर्षांपूर्वी जो निश्चय केला होता, त्याच्या पूर्ततेसाठी *दक्षिण मुंबई लोकसभा* मतदारसंघातून जॉर्ज निवडणुकीसाठी श्री.स.का.पाटील यांच्या विरोधात उभारले. ही लढाई *बलाढ्य राजकारणी विरुद्ध सामान्य कामगार नेता* अशीच होती. जॉर्ज निवडून येतील असे कोणीही म्हणू शकत नव्हते, परंतु सामान्य कामगारांच्या पाठिंब्याने जॉर्ज *निवडून आले व संपूर्ण देशभर जॉर्ज फर्नांडिस* ओळखले जाऊ लागले.
भारतातील रेल्वे कामगारांच्या *पहिल्या संपाचे १९७४ साली* जॉर्ज यांनी नेतृत्व केले. ऐतिहासिक संपामध्ये जॉर्ज यांनी स्वतःला झोकून दिले व रेल्वे कामगारांना न्याय मिळवून दिला, त्यामुळे *जॉर्ज यांचे नेतृत्व देशव्यापी* बनले. पुढच्या काळात तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी १९७५ साली आणीबाणी लादल्यानंतर त्या आणीबाणीच्या विरोधात *भूमिगत* राहून जॉर्ज यांनी कार्य केले. *श्रीमती इंदिरा गांधींचे सरकार उलथवून टाकणे, सरकारी कचेऱ्यांमध्ये कोणतीही जीवित हानी होणार नाही एवढ्या क्षमतेचे स्फोट घडवून आणणे, श्रीमती इंदिरा गांधींच्या सभा ज्या ठिकाणी असतील तेथील व्यासपीठ उडवून देणे* अशा अनेक योजना तडीस नेण्याचा जॉर्ज यांनी भूमिगत राहून प्रयत्न केला, परंतु त्यांना अखेर *अटक* झाली व तुरुंगवासही झाला.
पहिल्या बिगर काँग्रसी सरकारमध्ये ते *उद्योगमंत्री* बनले तर पुढच्या काळात *भारतीय जनता पक्षाबरोबर युती करून अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते संरक्षण मंत्री* बनले, सामान्यतल्या सामान्य व्यक्तीला कर्तुत्वाने पुढे जाता येऊ शकते हे आपल्या भारतीय लोकशाहीचे जे वैशिष्ट्य आहे याचाच एक आदर्श जॉर्ज यांनी निर्माण करून दिला आहे. अनेक मोठ्या लोकांच्या सभांमध्ये अनेकजण सामील होतात, *तेथील व्यवस्था अथवा गर्दीमुळे* अनेकदा त्रासही सहन करावा लागतो. त्या सभेतील पुढार्यांच्या भाषणांमुळे अनेकदा *चीडही* निर्माण होते, परंतु यातून बोध घेऊन किती कार्यकर्ते या विचारांच्या विरोधात बंड करतात? परंतु जॉर्ज फर्नांडिस यांनी श्री.स.का.पाटलांच्या सभेनंतर जो निश्चय करून *कामगारांच्या संघटनेसाठी स्वतःला वाहून घेतले* व देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात सामील होऊन या देशाची सेवा केली, हे पाहता म्हणावेसे वाटते, *जॉर्ज यांना जीवन कळले होते.*
- डॉ.श्री.सचिन लादे, पंढरपूर