मुंबई - गणेश हिरवे
सरकारी नोकरीत राहून उच्च पदावर कार्यरत असताना कंपनीच्या व्यवस्थापनाबरोबरच कामगारांचे हित जपणारे, नोकरी सांभाळून समाज हितासाठी झटणाऱ्या युवकांना, सेवाभावी संस्थांना विविध स्तरावर पाठबळ देऊन प्रेरणा देणारे, कामगारांच्या हितासाठी प्रसंगी कंपनीचे नियम लवचिक बनवून प्रोत्साहन देणारे अशोक देशमुख यांच्यासारखे उच्च पदस्थ सरकारी अधिकारी विरळेच. आरसीएफ मध्ये काम करणारे सर्व कर्मचारीबांधव, त्यांचे कुटुंबीय आपले आहेत हा स्थायीभाव जपणारे अशोक देशमुख यांनी त्यांच्या कणखर वागण्यातून हे वेळोवेळी अधोरेखित केले. किंबहुना त्यांचे हे वागणे त्यांच्या आरसीएफ मधील सेवाकार्यकाळात झळाळी देणारेच ठरले. त्यांना वृद्धपकाळाने आलेला मृत्यू अटळ ठरला. सहाजिकच त्यांच्या जाण्याने समस्त आरसीएफ परिवार हळहळला. दुःखद वातावरण पसरले. आणि त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी त्या भावना उपस्थितांकडून व्यक्त झाल्या.
अशोक माधवराव देशमुख हे स्वातंत्र्यसैनिक माधवराव देशमुखांचे सुपुत्र. इलेक्ट्रिकल इंजिनियर ही पदवी घेतल्यानंतर राष्ट्रीय केमिकल्स एण्ड फर्टिलायझर्स लि. या भारत सरकारच्या खत उद्योगात अमोनिया सयंत्र च्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट मध्ये ते रुजू झाले. मुलत: खानदानी वारसा लाभलेले आणि बुद्धिमान व महत्त्वाकांक्षी असणारे अशोक देशमुख आपल्या कारकीर्दीत कंपनीच्या कार्यपालक संचालक पदापर्यंत पोहोचले.कामाचा दांडगा उरक आणि मेहनती स्वभाव असल्यामुळे कंपनीच्या व्यवस्थापन समितीत ते अग्रेसर होते. तसेच कामगार संघटना दोन-तीन असल्या तरी बहुतांशी कामगारांचे ते आवडते होते. कामगारांमध्ये परस्पर विश्वास त्यांनी अधिक दृढ केला. काही काळानंतर याच कारणामुळे ते मुख्य कार्मिक व्यवस्थापक झाले.
कंपनीतील स्थानिक लोका अधिकार समिती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज कल्याण मंडळ, गणेशोत्सव, नवरात्री व चेंबूर आणि नेरुळ येथील यूथकौन्सिल यांच्या कार्यक्रमांना, विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमांना ते सतत सक्रिय प्रोत्साहन देत असत. कंपनीच्या कार्यक्रमांमध्ये मनःपूर्वक सामील होत. आरसीएफ सतत नफ्यात ठेवण्यात ते मनापासून कार्यरत होते.
आरसीएफच्या थळ येथील खत प्रकल्पाची उभारणी होत असताना प्रकल्पबाधित गावातील तरुणांना शक्य तेवढ्या नोकऱ्या देऊन समाजसेवेचाही वारसा त्यांनी जपला. प्रकल्पासाठी आवश्यक ते मनुष्यबळ त्यांनी चेंबूर येथे उभे केले. त्यासाठी प्रशिक्षण केंद्र अधिक चांगल्या तऱ्हेने कार्यरत केले. तसेच त्यांच्या प्रवासासाठी नि:शुल्क बस व्यवस्थाही केली.असे महत्त्वपूर्ण योगदान देणारे आरसीएफचे अशोक देशमुख यांचे वयपरत्वे दिनांक १६.०९. २०२२ रोजी देहावसन झाले. आरसीएफ मधील बांधवांनी त्यांना यथोचित मानवंदना दिली.