ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर
- भारताचे माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा हंगामी लोकसभेचे माजी अध्यक्ष व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत दिग्गज नेते ना.माणिकराव गावित यांचे नुकतेच निधन झाले.
अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले आहे. ते ८८ वर्षांचे होते.
माणिकराव गावित या नावाभोवती एक वलय होतं, ते विक्रमी खासदार होते. सबंध भारतात तब्बल ९ वेळा आणि ते ही सलग पणे खासदार म्हणून जनतेतुन निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. नंदुरबार जिल्ह्यातील ते एक दिग्गज नेते व लोकप्रिय खासदार होते.तर गांधी घराणे व काँग्रेस पक्षाशी त्यांची अविचल निष्ठा होती.
गावित यांच्या पार्थिवावर नवापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर नाशिकधील खासगी रुग्णाल्यात उपचार सुरू होते. आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या निधनाची माहिती डॉक्टरांनी दिली.
गावित यांचा जनसंपर्क दांडगा होता. ते दादासाहेब या नावाने प्रसिद्ध होते.
१९६५ साली ग्रामपंचायती पासुन राजकारणाला त्यांनी सुरुवात केली होती.
१९८१ साली पहिल्यांदा गावित खासदार झाले होते. त्यांनी स्व. श्रीमती इंदिरा गांधी, स्व.राजीव गांधी, श्रीमती सोनिया गांधी व राहुल गांधी अशा चार पिढयाबरोबर निष्ठेने पक्षाचे शेवटच्या श्वासापर्यंत काम केले.
त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रीमंडळात केंद्रीय गृहराज्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री आदी पदांची जबाबदारी संभाळली होती.
ते लोकसभेचे हंगामी अध्यक्षही बनले होते.
माणिकराव गावित यांचा राजकीय वारसा त्यांच्या मुला मुलीनीं पुढे चालवला.
त्यांची कन्या सौ.निर्मला रमेश गावित यांनी नाशिक महानगरपालिकेत सलग तीनदा नगरसेवक म्हणून तर ईगतपुरी-त्रंबकेश्वर मतदारसंघाच्या सलग दोनदा आमदार म्हणून काम पाहिले आहे.
त्यांचे चिरंजीव भरत गावित हे नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विदयमान जिल्हा परिषद सदस्य ही आहेत. दोन्ही ही मुले त्यांचा राजकीय वारसा समर्थ पणे सांभाळत आहेत.
माणिकरावांनी १९६५ मध्ये ग्रामपंचायतीपासून राजकारणाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर केंद्रीय गृह राज्यमंत्री, सामाजिक न्याय राज्यमंत्री अशी पदं न मागताच मिळाली.
संसदेतील सर्वात ज्येष्ठ खासदार म्हणून त्यांनी लोकसभेचे हंगामी अध्यक्षपदही भूषवले होते. १९८१ मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभा लढवली व विजयीही झाले. त्यानंतर त्यांनी सलग नऊ वेळा विजयी टिळा मिरवला.
*माणिकराव गावित यांची राजकीय वाटचाल*
नवापूर तालुक्यातील धुळीपाडा येथे २९ ऑक्टोबर १९३४ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण जुन्या काळातील मॅट्रिकपर्यंत झाले.
१९६५ साली ते नवापूर ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले. तत्कालीन धुळे जिल्हा परिषदेत नवापूर गटातून ते सदस्य म्हणून निवडून आलेत.१९७१ ते १९७८ साली धुळे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती म्हणून निवडून आले.१९८० साली नवापूरचे आमदार झाले.
माणिकराव गावित हे १९८१ साली प्रथमच खासदार झाले, त्यावेळी त्यांचे ४७ वय होते. तेव्हापासून ते आतापर्यंत तब्बल ९ वेळा लोकसभेवर प्रचंड म्हणजे लाखाच्या मताधिक्याने निवडून आले आहेत.
१९९९ साली झालेल्या तेराव्या लोकसभेत त्यांना १.३०७७१ इतके प्रचंड मताधिक्य लाभले. देशातील प्रचंड मताधिक्य मिळवणाऱ्या आघाडी च्या खासदारांमधील एक म्हणून संबंध देशाला ते परिचित झाले.
१९८१ ते२००९ हा माणिकराव गावित यांच्या खासदारकीचा रौप्य महोत्सवी काळ आहे. या काळात त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणून काम केले.
१९८१-८२ मध्ये ते समाज कल्याण समितीचे अध्यक्ष होते. १९८० ते १९८४ या काळात ते महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास महामंडळाचे अध्यक्ष होते.
१९९० ते १९९६ ,१९९८- ९९ तसेच २००० या काळात पेट्रोलियम आणि केमिकल व नैसर्गिक वायू या मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले आहे. १९९१ ते ९३ आणि १९९० ते २००० या काळात त्यांनी रेल्वे मंत्रालयाशी संबंधित सल्लागार समितीवर सदस्य म्हणून कार्य केले आहे.
१९९८-९९ या काळात लेबर अॅण्ड वेल्फेअर मंत्रालयाच्या समितीचे सदस्य म्हणूनही कार्य केले आहे. १९९९ ते २००१ या काळात अनु. जाती व अनु.जमाती कल्याण समितीचेही सदस्य होते. १९९०-९१ आणि १९९९- २००० या काळात लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांच्या अनुपस्थिती संदर्भातील समितीचे ही ते सदस्य होते.सोनिया गांधी यांनी त्यांना २२ मे २००४ रोजी डॉ. मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय गृह राज्यमंत्री म्हणून स्थान मिळवून दिले.
माणिकराव गावित यांच्या निधनाबद्दल अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आदी विविध क्षेत्रातील दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे.