(भाग-३)
ज्योतिराव व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांचा संसार अत्यंत सुखात चाललेला होता. *बांधकाम व्यावसायिक* म्हणून छोटी-मोठी कामे करत सर्वसामान्यांप्रमाणे ज्योतिराव आपल्या पत्नीसोबतचा संसार नेटाने करत होते. आपला व्यवसाय, आपले मित्र मंडळ व आपलं कुटुंब यामध्ये ज्योतिराव मग्न होते. पण त्यांच्या आयुष्याला व कार्याला *कलाटणी देणारा प्रसंग घडला.* एके दिवशी ते आपल्या एका मित्राच्या लग्नाच्या वरातीमध्ये नाच गाण्यात मग्न होते, त्याचवेळी त्या मित्राच्या परिवारातील व्यक्तींनी ज्योतिरावांना बाजूला करून *अस्पृश्यांनी आमच्या वरातीत नाचू नये* असे म्हटले. जिवाभावाचा मित्र परंतु त्याच्या परिवारातील व्यक्तींमध्ये असणाऱ्या *जातीयतेच्या भावामुळे व आपल्याला मिळालेल्या अस्पृश्यतेच्या वागणुकीमुळे* ज्योतिराव अत्यंत निराश झाले व वरात पुढे निघून गेल्यानंतर रस्त्याच्या बाजूला बसून एकटेच रडत बसले. त्याचवेळी मजुरीवरुन परत आलेले एक *दलित दांपत्य* त्या ठिकाणी आले व त्यांनी ज्योतिरावांना रडण्याचे कारण विचारले. त्यावर ज्योतिरावांनी घडलेला प्रसंग सांगताच त्या ते *दांपत्य हसले* व पुढे निघाले. ज्योतिरावांना थोडासा राग आला व त्यांनी हसण्याचे कारण विचारताच ते दांपत्य म्हणाले, *आजपर्यंत आम्ही हे सारे भोगत आलो आहोत, त्यावेळी तुम्हाला याच्या वेदना कळत नव्हत्या. आज मात्र तुमच्यावर वेळ आल्यावर तुम्हाला त्याच्या वेदना अधिक तीव्र वाटायला लागल्या आहेत म्हणून हसू आले* असे म्हणून ते दांपत्य निघून गेले. पण या प्रसंगाने *ज्योतिराव खचले नाहीत तर उलट ते निश्चयाने व कणखरपणे अस्पृश्यतेच्या लढाईसाठी उभे टाकले.*
ज्योतिरावांचे व त्यांच्या पत्नीचे कार्य *सर्वपरिचित* आहे. अस्पृश्यतेच्या-जातीयतेच्या जोखडातून समाजाला मुक्त करण्यासाठी या दांपत्याने आपले सारे आयुष्य वेचले. विवेकवादाची व विज्ञानाची कास धरून शिक्षणाच्या प्रसारातूनच समाजाला या गर्तेतून बाहेर काढता येऊ शकते यावर ठाम विश्वास असणाऱ्या या पती-पत्नींनी समाजाला *शिक्षणाची द्वारे खुली करून दिली.* विशेषत: मुली व महिला यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणारे हे *भारतातील पहिले दांपत्य आहे.* बाल विधवा अथवा महिलांच्या दुःख-वेदना जाणून त्यांना आधार देण्याचे कार्य ज्योतिरावांनी व त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई यांनी केले.
अस्पृश्यतेच्या - जातीयतेच्या व्यवस्थेवर *ताशेरे* ओढतानाच दीन-दलित समाजाला,सावकारांच्या जाचातून त्रासलेल्या-गांजलेल्या शेतकऱ्यांना *न्याय देण्याचे कृतिशील कार्य* या दांपत्याने केले. समाजाला *स्वत्वाची जाणीव* करून देण्याचे कार्य ज्योतिराव-सावित्रीबाईंनी केले. अस्पृश्यतेच्या झळा *अनेक-अनेकांनी* सहन केल्या, ज्या काळात जातीयतेचा भाव अत्यंत शिगेला पोहोचलेला होता, त्या काळात तर अनेकांना *मरणयातना* सहन कराव्या लागल्या. परंतु अस्पृश्यतेची-जातीयतेची वागणूक मिळून देखील यातील *प्रत्येकाने या व्यवस्थेविरुद्ध रणशिंग फुंकण्याचे अथवा बंड करण्याचे धाडस केले नाही,* परंतु ज्योतिरावांनी ते धाडस केले व जातीयता-अस्पृश्यता याविरुद्धचा लढा सक्षमपणे पुढे नेला, म्हणूनच म्हणावेसे वाटते *ज्योतिरावांना खऱ्या अर्थाने जीवन कळले होते.*
-डॉ.श्री.सचिन लादे, पंढरपूर