पंढरपूर - मंगळवेढा प्रतिनिधी तेज न्यूज
भीमा व निरा नद्यांमधून वाहून जाणारे पाणी कॅनॉल मार्गे सोडून मतदारसंघातील नाले ओढे,तलाव भरून देण्यात यावेत अशी मागणी आ समाधान आवताडे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्याकडे मागणी केली आहे.
पावसाळा सुरु होऊन दीड महिन्याचा काळ लोटला असून अद्याप पंढरपूर मंगळवेढा तालुके दुष्काळ ग्रस्त आहेत या भागाला पावसाने दडी मारल्याने येथील खरीप हंगाम यंदा वाया गेल्यात जमा आहे काही भागात पिण्याच्या पाण्यासाठीही कसरत करावी लागत आहे अशा परिस्थितीत उजनीचे पाणी कॅनॉल ला सोडण्यात आले आहे त्यामुळे या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
एनआरबीसी म्हणजेच निरा-भाटघर अंतर्गत नीरा नदी पूर्णपणे पाण्याने भरली असून एनआरबीसी तून रांझणी तलावापासून ते मतदार संघातील सर्व कासेगाव तलाव, कोर्टी तलाव, गादेगाव तलाव, बोहाळी तलाव, ७ नं फाटा या भागासह सर्व तालुक्यातील साठवण तलाव, पाझर तलाव छोटे-मोठे नाले व तिसंगी येथील साठवण तलाव भरून एनआरबीसी तून देण्यात यावेत.
उजनीतून येणाऱ्या पाण्यातून भीमा नदीला ही पाणी सोडले असून कॅनॉल ला ही पाणी सुरु आहे मात्र ते पाणी कमी दाबाने सुरु असून हें पाणी पूर्ण दाबाने सोडून मंगळवेढा तालुक्यातील नंदूर, बोराळे, कर्जाळ, कात्राळ, हुलजंती टेल भागासह या संपूर्ण मतदारसंघातील ओढे, नाले तसेच विविध पाझर तलाव तसेच पंढरपूर तालुक्यातील वाखरी, गादेगांव पर्यंत ओढे नाले साठवण तलाव, पाझर तलाव भरून देण्यासंदर्भात आपल्या विभागाला सूचित करावे अशी मागणी आ आवताडे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेकडे केली आहे.

