पाणी आणि विचारांची कमतरतेमुळे नक्की गेल्या ३० वर्षात आपल्या देशात म्हणजेच गावांत नेमकं काय घडतंय पहा ?
नक्की वाचा.. लेख लिहिणारा माहित नाही पण त्याना सलाम ....खूप अभ्यास पूर्ण लेख, बंधूभगिनींनी कृपया वेळ काढून वाचा.तीस वर्षांतले बदल या लेखात सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणजे अनेकानेक घटनांचा परिपाक असतो, ती जशी सामाजीक बाब असते तशीच शास्त्रीय गोष्ट सुद्धा असते, त्याचं एकच कारण नसतं हे सांगण्याचा हा प्रयत्न.
दोन तिन दशकांआधी आपल्याकडे सोयाबीन, कापुस आलं. ज्वारी हळुहळू बाद होत गेली.ज्वारी गेल्याने कडबा (चारा) कमी झाला. कडब्याचा चारा नसल्याने गाई म्हशी कमी झाल्या.२०० बैलांचा गावातला पोळा ५० बैलांवर आला.“खांदे मळणी” सारखे शब्द काळाच्या उदरात गडप झाले. गोधन कमी झाल्याने गावच्या गायरानांचं महत्व कमी झालं. गायराण म्हणजे “वेस्ट लॅंड” असं नवीनच सुत्र चलनात यायला लागलं. मग गावाबाहेरील गायरानांवर अतिक्रमण झालं.सोयाबीनचा उपयोग स्थानिक ठिकाणी खाद्य म्हणून केल्या जात नाही त्यामुळे अन्न सुरक्षेचा मोठाच प्रश्न निर्माण झाला.
घरात चार पोते ज्वारी असली की कितीही भीषण दुष्काळात तरुनजाता यायचं. एक आधार असायचा. बिकट परिस्थितीत लोकं ज्वारीच्या “कण्या” खाऊन जगली. ज्वारीच्या जाण्याने आता तसा आधार गेला.सोयाबीन हे तेल बियानं, त्यामुळे जमीनीचा कस कमी झाला, नव नव्या बुरशी वाढायला लागल्या.त्यातच डि.ए.पी. सारख्या खताच्या माऱ्याने मातीची जैविक संरचना बिघडली. एकीकडे जमीन निकृष्ट होत जाणे, दुसरीकडे त्यात शेणखताची कमतरता यामुळे जमीनीची पाणी धारण क्षमता आणि जमीनीतपाणी मुरवण्याची क्षमता कमी झाली.
जमीनीत पाणी मुरत नाही म्हणून भूजल संपुष्टात यायला लागलं. (सोयाबीन, कापुससारखी) एकसुरी पीक पद्धती आल्याने शेतातलीजैवविविधता झपाट्याने घटली.एकसुरीपणाच्या शेतीने एकाच वेळी सगळं पीक वाया जाण्याचं प्रमाण वाढलं. एकाच वेळी सगळं पीक वाया गेल्याने शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या. अन्न सुरक्षा नष्ट झाल्याने देशातल्या कुठल्या तरी प्रांतातलं खराब धान्य कमी भावात ग्रामीण भागात रेशन दुकानात पुरवण्याची जबाबदारी सरकारने घेतली.त्यातुन लाचारीचा जन्म झाला.लाचारीतुन आत्मसन्मान गेला.आत्मविश्वास गेला.
छटाकभर गावात तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर रातोरात वाढदिवसांचे बॅनर लावून नेते बनलेल्या भुरट्या नेत्यांचं पीक आलं.ज्यांचे खायचे पण वांदे आहेत त्यांना सुध्दा नेता बनण्याचं दिवसा स्वप्न पडू लागली आणि मग शेतीच्या चरकातून फ्रेस्टेट झालेल्या युवांना कधी नव्हे ते महाराष्ट्र अस्मिता, परप्रांतीय वगैरे हेच खरे प्रश्न असल्याचा साक्षात्कार करुन देण्यात आला.गावागावात अमूक पक्ष तमुक मित्र मंडळांचे फलक झळकायला लागले. इलेक्शन आले अन दारुचा कधी नव्हे एवढा महापुर ग्रामीण भागातुनसुध्दा वाहायला लागला.आपल्याच डोळ्यांदेखत २५ - ३० वर्षांची किती तरी पोरं दारु पिऊनपटापट गेली?
इलेक्शन आलं, छटाकभर आकाराचं गाव विभागलं, दुभंगलं.यातुन तहसील, कृषी विभाग, पंचायत समीतीकडे सबसीडीसाठी चकरा मारणाऱ्या लाचार शेतकऱ्यांची संख्या वाढायला लागली.दुध गेलं, तुर, मुग, उडीद गेले.तितर बाट्या गेल्या,कोंबड्या पाळण्यात कमतरता वाटायला लागली,
तणनाशकाच्या फवा-याने बांधावर तणासोबत येणाऱ्या जंगली भाज्या गेल्या नद्या नाल्यातले मासे, खेकडे, झिंगे गेले, गायराणातले ससे गेले;त्यामुळे प्रथिनांचा, पोषणाचा प्रश्न उभा राहिला.सकस अन्न नाही,किटकनाशकांच्या सतत संपर्कात, सतत मानसीक तणावात असल्याने ह्रदय रोग, कर्करोगाचं कधी नव्हे इतकं प्रमाण ग्रामीण भागात वाढलं. शेती म्हणजे घाट्याचा धंदा झाल्याने, तिच्या बांधबंदीस्तीकडेकमालीचं दुर्लक्ष झालं.
त्यातुन पावसाळ्यात शेतातली सुपीक माती नाल्यात वाहुन गेली. तलाव पुरातन डोह मातीने उथळ झाले. त्यातुन पाणी जमीनीत मुरवणाऱ्या केशवाहीण्या चोक झाल्या. नदी उथळ झाल्याने पावसाळ्यात शेतीला पुराचा पाणी वाहुन गेले . जमीनी खरवडून जाण्याचं प्रमाण वाढलं. नद्या नाले उथळ झाल्याने साठवण क्षमता घटली.
तंबू, कन्नाश्या, डोकडे, टेपऱ्या गेल्या अन तिलापीया, ग्रास कार्प, सिल्वरकार्प, आफ्रिकन मागुर परदेशातुन आपल्याकडे आल्या. यातुनच मासेमारांच्या रोजगाराचा भिषण प्रश्न उभा राहिला. त्यातच मग सिंचन प्रकल्प आले.
नेत्यांच्या, इंजीनीयरांच्या गब्बर पिढ्या सुखनैव नांदू लागल्या. बियाणे, किटकनाशके अन खतांसाठी बाहेरच्या व्यवस्थांवरचं अवलंबत्व कमालीचं वाढल्याने स्थानिक ठिकाणी पराधीनता वाढली.
त्यातुनच मग नवीन ज्ञान गावात न येणे (उदा. बि.टी. तंत्रज्ञानाचं ज्ञान!)अन पारंपरिक ज्ञानाचा ऱ्हास होणे अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली. जुनं निसटुन चाललं आणि नवीन येत नाही म्हणून ज्ञानाची पारंपरिक तिजोरी रिती व्हायला लागली.
अन दहावी पास कृषी सेवा केंद्र वाले आणि कृषी सहायक शेतकऱ्यांचे गुरुजी झाले. याच दरम्यान एक मध्यमवर्गीय सुखवस्तू नौकरदार वर्ग हळुहळू उदयास यायला लागला. या वर्गासाठी महागाईची व्याख्या होती, शेतमालाचे भाव वधारणे.
हा वर्ग बोलणारा, लिहणारा, “प्रतिक्रिया बहाद्दर” याला सरकार घाबरुन असणार, हा वर्ग कांद्याच्या भावासाठी सरकार पाडायला मागे पुढे न बघणारा मात्र फेअर अँड लवली साठी कोणत्याही भावाची शहानिशा न करता डोळे मिटून घेणारा. शेतमालाचे भाव वाढले की हा वर्ग बोंब ठोकणार. त्यातुन शेतमालाचे भाव इतर निविष्ठांच्या तुलनेत वाढलेच नाही.
उत्पादन आधारीत बाजारभाव हे शेतकऱ्यांसाठी एक स्वप्नच राहिले. परिणामत: कृषी उत्पादनात विक्रम करणारा, देशाला अन्न दारिद्र्यातुन बाहेर काढणारा शेतकरी दरिद्रीच राहिला.
सततच्या आर्थिक विवंचनेत आंब्याची, मोहाची झाडं आरामशीनच्या घश्यात गेली.शेंदरी, लाडू, शहद्या, शेप्या, नारळी, तेल्या, कागद्या, केळ्या, दोडी, गोटी, आमट्या, खाऱ्या,दाडक्या ह्या आंब्याच्या जाती काळाच्या आड जाऊन कुठून तरी कलमी, बदाम अशा जाती बाजारात दिसायला लागल्या.
आंब्याच्या, मोहाच्या, डिंकाच्या, तेंदुच्या, चाराच्या (चारोळी),बिब्याच्या, मधाच्या,जंगली मशरुमच्या स्वरुपात आणखी किती तरी आधाराचे दोर कचाकच कापल्या गेले.
एका माती नाला बांधासाठी, पांदण रस्ताच्या दुरुस्ती साठी दहा रुपयांची वर्गनी न देणारा आमचा पठ्ठ्या गावातल्या मंदीर बांधकामासाठी सढळ हस्ते मदत करता झाला.
हे सर्व नियोजनबध्द पद्धतीने घडत गेले.
*निदान आपल्या पिढीने*
*यातून आता तरी बोध घेऊन*
* आपल्याच मुलाबाळांचं भवितव्य सुरक्षित करावे*
*अजुनही वेळ गेलेली नाही.*
*नाहीतर आपल्याच*
*समोर आपलाच अंधार*
नक्की विचार करा.
सुजलाम, सुफलाम अशा या देशाचे आणि जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांचे हात बळकट करु या. यां गावाच्या एकत्रित विकासात सहभागी होऊन गाव जलसंधारण आणि सुजलाम करूयात
💧 💧धन्यवाद.
लेख आपणास आवडला तर शेतकरी मित्रांना, नातेवाईक, नोकरी करणारे यांना पाठवा हि विनंती

