नवी मुंबई प्रतिनिधी सुभाष हांडे देशमुख तेज न्यूज
नेरुळ येथील ज्येष्ठ नागरिक संघ, नेरुळ, अखिल भारतीय वरिष्ठ महासंघ तसेच महाराष्ट्र वरिष्ठ नागरिक महासंघ या तिन्ही संघाच्या संयुक्त विद्यमाने नेरुळ येथील शनिमंदिरच्या परिसरातील उद्यानात दिनांक ५ जून रोजी, जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.
या कार्यक्रमास नगरसेविका मीराताई पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. वृक्षारोपण त्यांच्या हस्ते तसेच ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दि. ना. चापके यांच्या हस्ते झाले.
उपस्थितांशी संवाद साधताना सौ. मीराताई पाटील म्हणाल्या की वृक्ष हे आपल्या जीवनाचे श्वास आहेत. आज आपण लावलेले रोप हे उद्याच्या पिढीसाठी अमूल्य ठेवा ठरेल यात शंका नाही. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे.
या कार्यक्रमा प्रसंगी नेरुळ जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विकास साठे तसेच माजी अध्यक्ष अरविंद वाळवेकर, सचिव अजय माढेकर, कोषाध्यक्ष दीपक दिघे, डॉक्टर डफळ तसेच डॉक्टर जे. अंकुशराव इत्यादी मान्यवर व परिसरातील ज्येष्ठ नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते.
मान्यवरांनी उपस्थितांशी संवाद साधताना आपल्या भाषणात पृथ्वीचे वाढत चाललेले तापमान आणि लहरी निसर्ग याच्यावर चिंता व्यक्त केली आणि वृक्षारोपणाची गरज अधिक अधोरेखित केली.या कार्यक्रमाप्रसंगी झाडे लावा आणि झाडे जगवा ही प्रतिज्ञा व संदेश दिला गेला.
अत्यंत उत्साही वातावरणात जागतिक पर्यावरण दिन ज्येष्ठ नागरिकांनी झाडे लावून साजरा केला. याबद्दल उपस्थित मान्यवरांनी संघाच्या कार्याचे कौतुक केले.

