सांगा कसे जगायचे मरत मरत जगायचे की जगत जगत मरायचे अशी व्यथा बळीराजाची झाली आहे.
संग्रामनगर प्रतिनिधी केदार लोहकरे तेज न्यूज
जागतिक पर्यावरण दिनी निसर्ग संवर्धनाचे संदेश दिले जात असतानाच निसर्गानेच रौद्ररूप धारण करून शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर अक्षरशःपाणी फेरले.माळशिरस तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्याने अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
बळीराजा वर्षभर शेतात कष्ट करून उन्हा-पावसाची तमा न बाळगता जपलेली केळीची हिरवीगार बाग काही क्षणांत आडवी झाल्याचे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या एका झटक्यात हिरावला गेला.कर्ज काढून,मोठा खर्च करून उभी केलेली पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक आणि मानसिक संकटात सापडले आहेत.
"पिकांमध्ये आमची स्वप्ने होती,मुलांच्या शिक्षणाची आशा होती,कर्ज फेडण्याची उमेद होती; पण या वादळाने सर्व काही उद्ध्वस्त केले," अशी व्यथा अनेक शेतकरी व्यक्त करीत आहेत.
पर्यावरण दिनी झाडांचे महत्त्व सांगितले जात असताना,त्याच दिवशी निसर्गाच्या या प्रकोपाने शेतकऱ्यांच्या आयुष्याची पानेच विस्कटून टाकली.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी,पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई द्यावी.अशी मागणी जोर धरत आहे.
"एका वादळाने केवळ केळीची झाडेच पाडली नाहीत तर शेतकऱ्यांच्या आशा,स्वप्ने आणि वर्षभराच्या कष्टांनाही जमीनदोस्त केले आहे,असे मत गणेशगाव येथील शेतकरी फकृद्दिन शेख यांनी व्यक्त केले.


