पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
“आईचे वात्सल्य, स्नेह आणि आईत्वाचं महात्म्य यांची व्याप्ती ही अवकाशापेक्षाही विशाल आहे,” असे मत येथील मातृभक्त डॉ. मारुती नवसाबाई रामा टकले यांनी व्यक्त केले. ते येथील मार्मिक संवादच्या माध्यमातून महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या प्रांतातील कवी आणि कवयित्री यांच्या कवितांच्या 'वात्सल्यस्नेहाची अमृतधार आई...' या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाच्या प्रकाशन वेळी बोलत होते. पुढे बोलताना डॉ. मारुती टकले म्हणाले की “जगभरातील बहुतेक देशातील अनेक कवी आणि कवयित्री यांनी आपापल्या परीने आईची महती कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला असून आईची महती आणि महिमा ही खरोखरच अगाध आहे.”
'वात्सल्यस्नेहाची अमृतधार आई...' या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाच्या प्रकाशन वेळी व्यासपीठावर ॲड. मा. विजयकुमार कस्तुरे, ज्येष्ठ साहित्यिक नागेश सिंघन, ज्येष्ठ कवयित्री मा. शोभाताई माळवे, ज्येष्ठ कवयित्री मा. रत्नप्रभाताई पाटील आणि या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे संपादक व विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रकाशन सोहळ्यानिमित्त आईविषयीच्या कवितांचे कविसंमेलन पार पडले. यावेळी ॲड. मा. विजयकुमार कस्तुरे, मा. सचिन कुलकर्णी, मा. शोभाताई माळवे, मा. रत्नप्रभाताई पाटील, मा. डॉ. बबनराव महामुने, मा. शुभांगीताई दहिवाळ, मा. शिवाजीराव बागल, मा. सुप्रियाताई हिल्लाळ, मा. शिवाजीराव वाघमारे, मा. शैलजाताई सासवडे, मा. जैनुद्दीन मुलानी, मा. अंकुश पडघान, मा. संतोष रायबान, मा. दादासाहेब खरात, मा. सुरेखाताई कुलकर्णी, मा. नागेश सिंघन, कवी रवि सोनार आणि मा. रामलिंग हागवणे या मान्यवर कवींनी आणि कवयित्रींनी त्यांच्या आशयघन आणि सुश्राव्य अशा कविता सादर करून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
जागतिक मातृत्व दिनाच्या पार्श्वभूमीवर 'वात्सल्यस्नेहाची अमृतधार आई...' हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित झाल्यामुळे आणि आईविषयीच्या कवितांचे कविसंमेलन झाल्यामुळे पंढरपूर शहर आणि तालुक्यामध्ये प्रकाशक तसेच सर्व कवी आणि कवयित्री यांचे विशेष कौतुक होत आहे. तसेच वेगवेगळ्या दिनाचे औचित्य साधून वेगवेगळ्या विषयावर कविसंमेलन आयोजित करावे अशी अपेक्षाही यानिमित्ताने अनेक साहित्य रसिकांनी व्यक्त केली.


