पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
यंदा मान्सून राज्यात वेळेवर दाखल होणार असल्याची माहिती आहे. हवामान विभागाने मान्सून वेळेवर दाखल होणार असल्याची माहिती याआधीच दिली आहे. असं असलं तरी मान्सून पूर्व आलेल्या पावसानंतर लगेच शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची घाई करु नये, असं आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आलं आहे.
राज्यभरात 29 मे पासून मान्सपूर्व पाऊस पडणार असल्याचा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे हवमान शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कैलास डाखेरे यांनी म्हटलं आहे. राज्यात मान्सून वेळेत दाखल होण्याची शक्यता आहे. पण शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरण्यांची घाई करु नये, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
डॉ. कैलास डाखेरे नेमकं काय म्हणाले ?
गेल्यावर्षी परिस्थिती फार वेगळी होती. 15 मे ते 30 मे या कालखंडात फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात पाऊस झाला होता. यावर्षी तशा प्रकारची परिस्थिती नाहीय. शेतकऱ्यांना एवढंच आवाहन करतो की, साधारण 75 ते 100 मिमी पाऊस पडल्याशिवाय पेरण्या करु नये, असं आवाहन डॉ. कैलास डाखेरे यांनी केलं.


