छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी तेज न्यूज
छत्रपती संभाजीनगर येथील ‘स्त्री शक्ती मंच’तर्फे एप्रिल २०२६ मध्ये ‘स्त्री: संघर्ष ते स्वराज्य’ या नावाने चौथा विशेषांक प्रकाशित होत आहे. या अंकात महाराष्ट्र राज्यातील विविध भागांतील सुमारे १०० साहित्यिकांचे लेखन समाविष्ट करण्यात आले आहे.
‘स्वराज्य’ हा शब्द ऐतिहासिक संदर्भाऐवजी स्त्रीने आपल्या आयुष्यातील अन्याय, आव्हाने आणि संकटांना सामोरे जात स्वतःचे स्वकर्तृत्व घडविण्याच्या अर्थाने मांडण्यात आला आहे. संपादक चंद्रकांत तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या अंकात राज्यभरातील कार्यकारी संपादक महिलांचे मोलाचे योगदान लाभले आहे.
यात माजलगाव तालुक्यातून कार्यकारी संपादक म्हणून सारिका बेद्रे यांचे मोलाचे योगदान या अंकासाठी लाभले आहे. महिलांच्या सक्षमीकरण, बळकटीकरण आणि त्यांच्या साहित्याला व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हे सलग चौथे वर्ष आहे.
प्रेरणादायी लेख, कथा आणि अनुभवांनी समृद्ध असा हा विशेषांक स्त्रीशक्तीचा आत्मविश्वास अधोरेखित करणारा ठरणार असून, प्रकाशनापूर्वीच वाचकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

