पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथे अल्पसंख्यांक विकास समितीच्या वतीने “भारतीय संविधानातील अल्पसंख्यांक अधिकार तरतुदी” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. सुशीलकुमार शिंदे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पदव्युत्तर पदवी विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. बाळासाहेब बळवंत हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अल्पसंख्यांक विकास समितीचे नोडल ऑफिसर प्रा. डॉ. दत्तात्रय डांगे यांनी केले.
मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व स्वीकारल्यामुळे भारतातील लोकशाही समरस व सहिष्णू बनली आहे. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत देशाच्या लोकशाही व्यवस्थेचे सार दडलेले आहे. भारताने धार्मिक राष्ट्राचा स्वीकार न करता धर्मनिरपेक्ष लोकशाहीचा स्वीकार केल्यामुळे देशात सामाजिक एकात्मता, बंधुता व शांतता टिकून आहे.
धर्माधिष्ठित लोकशाही स्वीकारलेल्या काही देशांमध्ये लष्करी राजवट प्रस्थापित झाल्याचे दिसून येते; मात्र भारतीय संविधानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे आणि लोकशाही मूल्यांवरील विश्वासामुळे भारतात आजपर्यंत लष्करी सत्ता प्रस्थापित होऊ शकली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारतामध्ये विविध धर्म, जाती, भाषा व संस्कृतींचा संगम असून धार्मिक व भाषिक सलोखा ही भारतीय संस्कृतीची मूलभूत वैशिष्ट्ये असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय संविधानाने अल्पसंख्यांकांच्या धार्मिक, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कांचे संरक्षण केले असून कलम 14, 15 व 16 अंतर्गत सर्व नागरिकांना समान संधी देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. समान नागरी कायदा लागू झाल्यास सर्व धर्मांतील स्त्रियांना अधिक न्याय व समानता मिळू शकते, असे मतही त्यांनी मांडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात प्रा. डॉ. बाळासाहेब बळवंत म्हणाले की, दंगलीमुळे देशाच्या आर्थिक व सामाजिक संपत्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. भारतीय संविधानाने जगातील विविध राष्ट्रांच्या कायद्यांचा अभ्यास करून आदर्श मूल्यांचा स्वीकार केल्यामुळे ते जगातील एक सर्वोत्तम व आदर्श संविधान ठरले आहे. स्त्री शिक्षणाला प्राधान्य देणे हे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सविता उपपल्ली यांनी केले. कार्यक्रमास प्रा. डॉ. दादासाहेब हाके, प्रा. सुलताना मुलाली, प्रा. सारिका मुळूक, प्रा. डॉ. सुमय्या पठाण, प्रा. डॉ. शैलेंद्र सोनवले, प्रा. गणेश भाकरे आदी प्राध्यापक उपस्थित होते. बी.ए., बी.कॉम. व बी.एस्सी. शाखेतील 69 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उपस्थिती नोंदविली.
कार्यक्रमाच्या शेवटी अल्पसंख्यांक विकास समितीचे चेअरमन प्रा. रियाज शेख यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल माने व ओंकार नेहतराव यांनी परिश्रम घेतले.

