पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
पुण्यामध्ये महायुतीमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. आधी गुंड निलेश घायवळ प्रकरणावरून शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना लक्ष करत आरोपांची राळ उठवली होती. त्यानंतर जैन बोर्डिंग जमिनीसंदर्भात रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार टीका सुरूच ठेवली आहे. जैन बोर्डिंगची जमीन मुरलीधर मोहोळ यांनी हडप केल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केल्यानंतर पुण्यात महायुतीमध्ये संघर्ष टोकाला गेल्याचं चित्र आहे. रवींद्र धंगेकर यांनी महायुतीच्या नेत्यांवर आरोप सुरूच ठेवल्यानंतर आता धंगेकर यांच्यावर शिवसेनेकडून कारवाई करण्यात येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
धंगेकरांच्या टीकेनंतर पुणे शहरातील भाजपच्या काही नेत्यांनी त्यांची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबतची युती वाचवण्यासाठी रवींद्र धंगेकर यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. महायुतीमध्ये दंगा नको, असे एकनाथ शिंदे यांनी रविंद्र धंगेकर यांना पुण्यात जाहीरपणे सांगितले होते. तरीही धंगेकरांनी भाजपा नेत्यांना टार्गेट करणे थांबवले नाही. धंगेकर हे महायुतीमध्ये बेबनाव निर्माण करण्यासाठी काँग्रेसने पाठवलेले हस्तक असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत त्यांना हँडल करत आहेत असा दावा पुणे भाजपकडून करण्यात आला आहे.
भाजपच्या या दाव्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "शिवसेना हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. पक्षप्रमुख एकनाथराव शिंदे साहेबांनी अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्या शिवसैनिकावर आजपर्यंत कारवाई केलेली नाही. अन्यायाविरोधात लढण्यासाठी त्यांचं नेहमी पाठबळ राहील, असा मला विश्वास आहे. पुन्हा एकदा सांगतो, भगवान महावीरांचे मंदिर आणि जैन बोर्डिंगची जागा लुटण्याचा व्यवहार रद्द होऊन भगवान महावीरांच्या मूर्तीवरील कर्जाचा बोजा चढवणाऱ्या व्यक्तीविरोधात कारवाई होत नाही, तोपर्यंत माझा हा लढा सुरूच राहील. तुम्ही कितीही कट कारस्थाने केली आणि त्याची मला आयुष्यात काहीही किंमत मोजावी लागली तरी सुद्धा हा रवी धंगेकर मागे हटणार नाही. सोबत आहेत पुणेकर, लढत राहील धंगेकर," असं रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून म्हटलं आहे.
"माझी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना विनंती आहे की, समाजात कुठलीही चुकीची घटना घडत असताना जर ती आपल्या निदर्शनास आली तर एक जागृत पुणेकर म्हणून त्या घटनेवर व्यक्त व्हा. खरा कार्यकर्ता तोच असतो, जो चांगलं वाईट ओळखून त्यावर व्यक्त होतो आणि ते घडण्यापासून आपल्या शहराला वाचवतो. आज आपण सर्वजण जे काही आहोत ते या शहरातील लोकांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे. त्यामुळे युतीधर्म किंवा आघाडीधर्म पाळण्याअगोदर सर्वात अगोदर पुणेकरधर्म पाळा, नाहीतर येणाऱ्या पिढ्या विचारतील ते लुटत होते तेव्हा तुम्ही काय करत होता...? सर्वप्रथम आपण पुणेकर आहोत, नंतर पक्ष, युती-आघाडी, गट-तट," असं देखील धंगेकर म्हणाले आहेत.
दरम्यान, रवींद्र धंगेकर यांच्या आक्रमक भूमिकेनंतर आणि एकनाथ शिंदे यांच्या तंबीनंतर देखील पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यामधील टोकाला गेलेला संघर्ष काही कमी होण्याचं नाव घेत नाही. गेल्या काही दिवसांपासून फ्रंट फूटला येऊन भाजपवर टीका करणारे रवींद्र धंगेकर हे एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यानंतरही भाजपवर टीका करण्याचं थांबवत नसल्याने आता याचा परिणाम थेट राज्यातील महायुतीवर होणार का? की रवींद्र धंगेकर यांच्यावर शिवसेना कारवाई करणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.