पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आषाढी यात्रा कालावधीमध्ये वारकरी भाविकांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी डायल १०८ च्या एकूण १२० रुग्णवाहिका कार्यरत होत्या. त्यासाठी ईओसी (कंट्रोल रुम) कक्ष तयार करण्यात आले होते. त्याव्दारे पंढरपूरातील सर्व भाविकांना २४ तास मोफत सेवा दिली गेली. यात्रा कालावधीत गर्दी मोठ्या प्रमाणात असल्याने मोबाईल नेटवर्कला अडथळे वारंवार येत असल्यामुळे या वर्षी सेवा लवकरात लवकर मिळावी, यासाठी वॉकीटॉकीची सुविधा सर्व रुग्णवाहिकामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली होती. पंढरपूरात अद्यावत असणारी कंट्रोल रुम वॉकीटॉकी सुविधा, जिओ मॅपींग या सर्व गोष्टीमुळे १०८ रुग्णवाहिका वारकऱ्यांसाठी जीवनदायी ठरली.
आषाढी यात्रेत यावर्षी गंभीर स्वरुपाच्या १२४० रुग्णांना व किरकोळ आजार असणाऱ्या १५ हजार ४७६ रुग्णांना सेवा देण्यात आली. एकूण १६ हजार ७१६ रुग्णांनी १०८ या मोफत रुग्णवाहिका सेवा देण्यात आली.
आषाढी यात्रेचा सांगता समारोप दि. ११ जुलै २०२५ रोजी प्रांताधिकारी कार्यालय येथे करण्यात आला. वारीमध्ये काम करणाऱ्या सर्व डॉक्टर व पायलट व कंट्रोल रुममधील सर्व कर्मचाऱ्यांचा प्रशासनाकडून यथोचित सन्मान करण्यात आला.
या समारंभास प्रांताधिकारी सचिन इथापे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. दीपक धोत्रे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले,आय सी यु इन्चार्ज डॉ. महेश सुडके, डॉ. प्रसन्न भातलवंडे, पुणे विभाग प्रतिनिधी - डॉ. प्रियांक जावळे, सातारा जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र कदम, सांगली जिल्हा व्यवस्थापक कौस्तुभ घाटुळे, सोलापूर जिल्हा व्यवस्थापक अनिल काळे, तसेच सर्व एडीएम, इएमइसओ (डॉक्टर), पायलट कार्यक्रमास उपस्थित होते.