लाखो वारकरी भाविक भक्तांपर्यंत पोहचली मदत व पुनर्वसन विभागाची वारी
पंढरपुर प्रतिनिधी तेज न्यूज
आषाढी वारीनिमित्त दरवर्षी लाखो वारकरी भाविक भक्त संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पायी वारीमध्ये सहभागी होत असतात. याच पायी वारीत मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने पहिल्यांदाच प्रचार व प्रसिद्धी अभियान वारी उपक्रम राबविला असून तो यशस्वीपणे पार पडला. पालखी मुक्कामी वारकरी मनोरंजन व प्रबोधनात्मक पद्धतीने जनजगृती करण्यात आली. त्यास वारकरी व भाविक भक्तांनी भरभरुन प्रतिसाद दिली.
मदत व पुनर्वसन कॅबिनेट मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या संकल्पनेतून विभागाच्या विविध योजनांच्या प्रचार व प्रसिद्धीकरीता हे अभियान राबविण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर व पंढरपुर यात्रा कालावधीमध्ये दि. 27 जुन ते 10 जुलै 2025 दरम्यान हे प्रचार व प्रसिद्धी अभियान संपन्न झाले. या प्रचार व प्रसिद्धी अभियान वारीत विविध लोककलांचा समावेश करण्यात आला होता.
किर्तन, पारंपारिक वासुदेव, भारुड, पथनाट्य, चित्ररथ व एलईडी व्हॅन्स याव्दारे विभागाने राबविलेले निर्णय आणि योजनांची प्रसिद्धी करण्यात आली. दोन्ही पालखी मार्गांवर 100 हून अधिक कलाकारांनी या अभियानात सहभाग घेऊन जनजागृती केली. या कलाकारांनी मदत व पुनर्वसन विभागाचे निर्णय व काम वारीमध्ये प्रभावी मांडले. तसेच पालखी विसावा व पालखी तळ आणि पंढरपुर शहराच्या विविध प्रवेशद्वारांवर योजनांची माहिती देणारे क्लेक्स लावण्यात आले होते. सेल्फी पॅांईंट व माहितीपत्रकांच्या माध्यमातून वारीत सहभागी झालेल्या शेतकरी बांधव व नागरिकांपर्यंत विभागाची माहिती पोहचविण्यात आली. विभागाच्या योजना व निर्णय यावर आधारित माहितीपट, छोट्या फिल्म्स व जिंगल्स यांचेही एलईडी व्हॅन्सच्या माध्यमातून वारीत प्रसारण करण्यात आले.
विभागाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी सोशल मिडियाचा प्रभावी वापर करण्यात आला. सोशल मिडियावर प्रचंड प्रतिसाद मिळाला असून काही व्हिडिओज मिलियन लोकांनी पाहिले. लोणंद येथे उभारण्यात आलेले स्वागतपर भव्य व आकर्षक कटआऊट सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले आहे.
तसेच ईसबावी येथील झिप हॅाटेलसमोर विभागाने वारीतील वारक-यांचे स्वागत करण्यासाठी व्यासपीठ उभारण्यात आले होते. याठिकाणी वारकरी बांधवांना विभागाच्या वतीने दोन दिवस भाविक भक्तांना मोफत हजारो पाणी बॅाटल्सचे वाटप करण्यात आले होते. लोणंद येथे मोफत जेवण व पाणी वाटप करण्यात आले. पंढरपुर यात्रा कालावधीत हे अभियान एसटी स्टँन्ड, रेल्वे स्टेशन, चंद्रभागा वाळवंट, गोपाळपुर व ६५ एकर आदी परिसरात सुरु ठेवण्यात आले होते.
मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रचार व प्रसिद्धी अभियानाची सुरुवात विभागाचे मंत्री मकरंद आबा पाटील व सह सचिव संजय इंगळे यांच्या हस्ते लोणंद येथे करण्यात आली होती.