"वटपौर्णिमा" विशेष लेख
मंगळवार दि. १० जून २०२५ वट पूजन मुहूर्त . वटपौर्णिमेच्या व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी सूर्योदयापासून दुपारी ०१:३० वाजेपर्यंत कधीही करू शकतात. वटपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तापासून पूजा विधीला सुरुवात करणे शुभ मानले जाते. पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ उत्तम आहे.
हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते. हिंदू धर्मातील स्त्रिया वडाची पूजा करतात. यामागे भाव असतो तो जन्मोजन्मी मला हाच पती मिळावा. या वर्षी हे व्रत १० जून रोजी मंगळवारी आहे.
वटपौर्णिमेचे व्रत सुरू होण्यामागील पूर्वपीठिका :- यमधर्माने सत्यवानाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी तीन दिवस शास्त्रचर्चा केली. त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले. ही चर्चा वटवृक्षाच्या झाडाखाली झाली; म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचे नाव जोडले गेले. सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे म्हणून स्त्रियांनी या व्रताची सुरुवात केली.
पूजा साहित्य:- 2 हिरव्या बांगड्या, शेंदुर, एक गळसरी, अत्तर, कापुर, पंचामृत, पुजेचे वस्त्र , विड्याचे पाने, सुपारी, पैसे, गुळ खोबरयाचा नैवेद्य, आंबे, दूर्वा, गहु, सती देवीचा फोट किंवा सुपारी इ.
व्रताचे विधान . ”
वटपौर्णिमा” वास्तविक हे व्रत ३ दिवसांचे आहे, ३ दिवस करणे होत नाही म्हणून स्त्रिया हे व्रत १ दिवस करतात . ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमेच्या वेळी हे व्रत करायचे असते . या व्रता करीता चतुर्दशी युक्त पौर्णिमा घ्यावी . चतुर्दशीस सूर्यास्तापूर्वी ३ मुहूर्त ( सुमारे १ तास ३६ मिनिटं) पौर्णिमा सुरु होत असेल तर ती दिवस योग्य आहे, तसे नसेल तर दुसऱ्या दिवशी हे व्रत करावे . याप्रमाणे चतुर्दशीस पौर्णिमा आली तर ती दुपारी केव्हातरी सुरु होते व पोर्णिमा सुरु झाल्याशिवाय पूजा कशी करावी आशी शंका येते. काही स्त्रिया तर पोर्णिमा सुरु झाल्या नंतर (दुपारी २ नंतरही ) वटपौर्णिमा पूजा करतात. तसे करणे योग्य नाही . सूर्योदयापासून मध्यान पर्यंत हाच पूजा काळ सांगितला असल्याने , त्या काली पोर्णिमा नसली तरी पूजा करणे सशास्त्र आहे , म्हणून अशा वेळी पोर्णिमा सुरु होण्याची वाट न पाहता सकाळी वट पूजन करावे .या वर्षी पौर्णिमा सकाळी ११ :३६ वाजता सुरू होते आहे.
। ब्रह्मानं सह सावित्रि सवित्रीम सत्यवतप्रियाम । धर्मराजं मुनिइंद्रच ध्यायामीच महातारुम।। वट मूले ब्रह्मसवित्रे नमः।। या नाम मंत्राने पूजा करावी ।
खाली सांगितलेल्या प्रार्थने प्रमाणे प्रपंचात आवश्यक असणारे सौभाग्य , मुले , नातवंड , धनधान्य ,आणि उभयतांना उत्तम आरोग्य मिळावे हा या व्रताचा हेतू आहे , व्रत वैकल्ये केल्यामुळे आत्मिक आनंद व संयम निर्माण होतो, तरी मन इप्सित सर्व कामना पूर्ण होण्यासाठी धर्म शास्त्रावर डोळस श्रद्धा ठेऊन या व्रताचे आचरण स्त्रियांनी करावे.
पूजा विधी - एका सुपारीवर गणपतीचे पूजन करावे गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. वटपूजन पतीसह पूर्ण कुटुंबाला दीर्घायुष्य लाभावे असा संकल्प करावा तसेच सतीमातेच्या सुपारीची हळद,कुंकू ,फूल वाहून पूजा करावी आंब्याचा नेवेद्य दाखवावा व गव्हाने ओटी भरावी. सावित्रीची प्रार्थना करावी वडाच्या झाडाला किंवा वटपौर्णिमेच्या कागदाला (वटपौर्णिमेचा कागद बाजारात मिळतो) तिहेरी दोरा बांधावा. सूत कापसाचे काढलेले असावे. पूजना नंतर कथा वाचावी.
वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व : वटवृक्ष हा शिवरूपी आहे. शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे, म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एकप्रकारे स्मरून, त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी, यासाठी ईश्वराची पूजा करणे. कर्माला शिवाची जोड असेल, तर शक्ती व शिव यांच्या संयुक्त क्रियेने व्यवहारातील कर्म साधना बनून त्याचा जिवाला फायदा होतो.
वटवृक्षाला सूत गुंडाळण्याचे महत्त्व : वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदावर असणार्या सुप्त लहरी शिवतत्त्व आकृष्ट करून वायुमंडलात प्रक्षेपित करतात. ज्या वेळी वटवृक्षाच्या खोडाला सुती धाग्याने गुंडाळले जाते, त्या वेळी जिवाच्या भावाप्रमाणे खोडातील शिवतत्त्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात. सुती धाग्यातील पृथ्वी व आप या तत्त्वांच्या संयोगामुळे या लहरी जिवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात.
वडाच्या पूजनामध्ये पाच फळे का अर्पण करावीत ? : फळे ही मधुररसाची, म्हणजेच आपतत्त्वाची दर्शक असल्याने फळांच्या समुच्चयाकडे आकृष्ट व प्रक्षेपित होणार्या देवतांच्या लहरी कमी कालावधीत जिवाच्या देहातील कोषांपर्यंत झिरपू शकतात.
सूत गुंडाळताना या मंत्राचा उच्चार करावा.
अवैधव्यं च सौभाग्यं देहि त्वं मम सुव्रते।
पुत्रान् पौत्रांश्च सौख्यं च गृहाणाध्र्यं नमोस्तुते।।
वटवृक्षाला पाणी अर्पण करताना या मंत्राचा उच्चार करावा
वट सिंचामि ते मूलं सलिलैरमृतोपमै:।
यथा शाखाप्रशाखाभिर्वृद्धोसि त्वं महीतले।
तथा पुत्रैश्च पौत्रैस्च सम्पन्नं कुरु मां सदा।।
पतिव्रता स्री कशी असावी याचा सावित्री हा आदर्श मानला जातो. खालील मन्त्र म्हणून वडास नमस्कार करावा.
मंत्र
सावित्री ब्रम्हा वादिनी सर्वदा प्रिय भाषिणी।
तेन सत्येनमां पाहि दुःखसंसार सागरात।।
अवियोगि यथा देव सवित्र्या सहीतस्य ते।
अवियोग तथास्माकं भूयात् जन्म जन्मनि।।"
वडास नमस्कार करावा व प्रार्थना करावी
प्रार्थना :- हे पवित्र वटवृक्षा तुझे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी तुझा विस्तारही खूप होतो. तुझे पूजन करून मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व संतती -संपत्ती मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे', तसेच मला अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी.
"काय आहे ७ जन्माचे रहस्य?"
सात जन्म हाच पती मिळवा मुळात या सात जन्म मागणीत पुढच्या जन्माचा संबंधच नाही. तो होणार का नाही? माहित नाही. माणसाचा मिळेल का? माहित नाही. हीच पुन्हा ओळखायची कशी? अशा निरर्थक बाबी आपल्या शास्त्रात नाहीत.
मग काय आहे सात जन्म? मागणीचे रहस्य ही एक शुद्ध जीवशास्त्रीय भूमिका आहे.
आपले शरीरविज्ञान असे सांगते की आपल्या शरीरात काही पेशी मरतात काही नवीन जन्माला येतात. शरीर सतत बदलत असते आणि तरीही ते आपल्याला अखंड वाटत असंते.
आपल्या शरीरातील एकूण एक(सर्व) पेशी बदलायला काळ १२ वर्षे. कालावधी लागतो म्हणून आपण म्हणतो तप करायचे ते १२ वर्षे. बारा वर्षे झाली की एक तप पूर्ण होते.
दर १२ वर्षांनी आपले शरीर पूर्ण बदलत असते. जणू एक नवा जन्मच होतो.असे बारा वर्षाप्रमाणे सात जन्म म्हणजे १२ × ७ = ८४.
पूर्वी लग्न होत १६ व्या वर्षी होत असत त्यावेळी ती नवविवाहिता प्रार्थना करायची की सात जन्म हाच पती भेटो अर्थात पती १६ + ८४ = १०० वर्षे जगो !!! साधारण मनुष्याचे आयुष्यमान १०० वर्षांचे मानले गेले आहे
म्हणजेच पतीच्या शातवर्षं पूर्ण आयुष्याची कामना करणे म्हणजे सात जन्म.पुढच्या जन्माचा काहीही संबंध नाही.
(हिंदूंच्या प्रत्येक सण रुढी प्रथा परंपरा यावर विनोद केले जातात वट पौर्णिमा सुध्दा त्यातून सुटत नाही आणि हे विनोद अभागी , अज्ञानी हिंदूच मोठ्या उत्साहाने फॉरवर्ड करीत असतात पण कुणीही या परंपरा मागील संदेश जाणून घेण्याचा प्रयत्न करीत नाहीत )
वट सावित्री कथा
जेष्ठ पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात.
अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली.
सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच माहित असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला.
पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला. व जंगलात येऊन नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली.
सत्यवानाचा मृत्यू जेंव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेंव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागली. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासू सासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेंव्हा त्या वचनबध्द झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व सावित्री व्रत आचरतात.
स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा दुसऱ्या दिवशी सकाळी १० नंतर सोडावा. वडास हळदी कूकु वाहून आंबे पैसे वडापुढे ठेऊन नमस्कार करावा. वडाला तिन प्रदक्षिणा घालाव्यात. पाच सुवासिनींची आंबे व गव्हाने ओटी भरावी.