मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज गणेश हिरवे
आषाढी वारी सोहळ्यादरम्यान दोस्त मुंबई या संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदादेखील अवयवदान व आरोग्य सेवा दिंडीचे आयोजन करण्यात आले असून ह्या दिंडीचा प्रस्थान सोहळा रविवार दिनांक १५ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता कामोठे येथील वेस्टर्न हिल्स हायस्कुलच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार प्रमोद चुंचुवार, दोस्त च्या अध्यक्षा डॉ वैशाली जवादे, कामोठे डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष व बालरोगतज्ज्ञ डॉ संतोष कानगुले, आरोग्य सेवेतील कक्ष अधिकारी, लेखक वैभव मोहन पाटील, तसेच पनवेल मनपाचे मा विरोधी पक्षनेते प्रीतम जनार्दन म्हात्रे, मनसेचे उरण येथील पदाधिकारी सतीश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कामोठे येथील धन्वंतरी भजनी मंडळाच्या सुमधूर भजनाने तसेच दीपप्रज्वलन आणि आरतीने करण्यात आली. त्यानंतर दोस्त चे संस्थापक डॉ कैलास जवादे यांनी संस्थेच्या कार्याचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडताना संस्थेची आजवरची वाटचाल व भविष्यातील नियोजनाविषयी माहिती दिली. त्यानंतर 'दोस्त'च्या कार्यकर्त्यांनी अवयवदान चळवळीतील दोन भन्नाट पथनाट्ये सादर करत अवयव दानाबाबत जनजागृती केली. गेल्या ११ वर्षांपासून 'दोस्त' संस्थेमार्फत ह्या आरोग्य दिंडीचे आयोजन करण्यात येत आहे.
या उपक्रमादरम्यान वारीमध्ये अवयवदानाबाबत जनजागृती आणि आरोग्यविषयक कार्यक्रम राबविण्यात येतात. यामध्ये कॅन्सर जनजागृती, लिव्हर किडनी व पचन संस्था आरोग्य कार्यक्रम, वैद्यकीय शिबीर, चरण सेवा, शस्त्रक्रिया सल्ला, फायब्रोस्कॅन तपासणी इत्यादी उपक्रम राबविण्यात येतात. यावेळी उपस्थित सर्वच मान्यवरांनी डॉ जवादे यांच्या कार्याचे कौतुक करत "दोस्त" संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कामोठे डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने दोस्त संस्थेसाठी आर्थिक मदतीचा धनादेशदेखील याप्रसंगी देऊन वारीतील आरोग्य सेवेस हातभार लावण्यात आला.
लेखक वैभव पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात आरोग्य दिंडीदरम्यान अवयवदानाबरोबरच संसर्गजन्य, असंसर्गजन्य आजार तसेच कोविड बाबत जनजागृती करण्याचा सल्ला संस्थेच्या उपस्थित विद्यार्थी- कार्यकर्त्यांना दिला. आरोग्य दिंडीसारखा एखादा उपक्रम सुरू करणे सोपे असते मात्र तो १० वर्षांपेक्षा अधिक काळ सातत्याने सुरू ठेवणे अवघड असल्याचे मत व्यक्त करत वैभव पाटील यांनी डॉक्टर, लेखक, कवी व समाज संवेदनशील कार्यकर्ता म्हणून डॉ जवादे यांचे स्थान समाजात फार मोठे असल्याचे मत व्यक्त केले. डॉक्टरी पेशा हा सध्या व्यावसायिक अधिक बनत चाललेला असून रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया करता करता त्यांच्या संवेदना कमी होत चाललेल्या असल्या तरी डॉ जवादे यांच्यासारखे वैद्यकीय क्षेत्रातील संवेदनशील स्वभावांचे डॉक्टर आजही गोरगरीब रुग्णांना समाजात रुग्णसेवा देत असल्याबद्दल पाटील यांनी समाधान व्यक्त केले. भाषणाच्या शेवटी वैभव पाटील यांनी अवयव दान जनजागृतीपर स्वलिखित कविता सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे व मनसेचे सतीश पाटील यांनीदेखील मनोगते सादर केली ज्यात त्यांनी 'दोस्त'च्या कार्याचे कौतुक करत त्यांना आवश्यक ते सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
जेष्ठ पत्रकार, गांधी विचाराचे अभ्यासक आणि संवेदनशील, समाजभान असलेले व्यक्तिमत्व प्रमोद चुंचुवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अवयवदानाबाबत अनुभव कथन करत अवयवदानाची ही चळवळ अधिक व्यापक होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. तसेच राजकीय पक्षांच्या तसेच लोकप्रतिनिधींच्या कार्यालयांमध्ये एखादा आरोग्य कक्ष स्थापन करण्याचादेखील त्यांनी सल्ला दिला. अवयवदानाबाबत जनजागृतीसाठी डॉ जवादे कुटुंबीय व त्यांची संपूर्ण टीम करत असलेले कार्य अत्यंत स्तुत्य व अनुकरणीय असून आषाढी वारीसारख्या केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात भव्य दिव्य समजल्या जाणाऱ्या सोहळ्यात सहकाऱ्यांना सोबत घेऊन ते काढत असलेल्या ह्या आरोग्य व अवयवदान दिंडीची परीणामकारकता दिवसेंदिवस वाढत जाणार असल्याचा विश्वास वैभव पाटील यांनी व्यक्त केला.
संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम नियोजन दोस्त चे जनसंपर्क अधिकारी श्रीकांत गावित यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ जवादे यांनी केले आणि पसायदानाने सोहळ्याची सांगता करण्यात आली.