समाजाच्या प्रगतीसाठी उत्तरदायित्वाची भावना आवश्यक-व्यवस्थापकीय संचालक रवींद्रनाथ गुमास्ते
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
'आज आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहोत. ही प्रगती सहज होत नसते. त्यासाठी विविध समाज घटकांमध्ये आपण समाजासाठी काय देणं लागतो याची जाणीव महत्त्वाची असते. आज याच भावनेतून किर्लोस्कर कंपनीच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रयत्नांतील सातत्य या फार महत्त्वपूर्ण बाबी आहेत. आज इंजिनिअरिंग क्षेत्रात विद्यार्थ्यांंना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यांचा विकास करून उत्तम करिअर घडवले पाहिजे.’ असे प्रतिपादन किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज् लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्रनाथ गुमास्ते यांनी केले.
स्वेरीमध्ये सी.एस.आर. अंतर्गत ‘किर्लोस्कर वसुंधरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’ चे थाटात उदघाटन करण्यात आले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज् लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्रनाथ गुमास्ते हे मार्गदर्शन करत होते. ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांच्या संगीत शिक्षण संस्थेतील बाल वारकऱ्यांनी सादर केलेल्या भजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)चे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी मान्यवरांचे वारकरी पंचा, टोपी, गोपीचंदन व बुक्क्याचा टिळा लावून स्वागत केले. यावेळी प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे म्हणाले की, ‘स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात किर्लोस्कर समूहाचे कार्य अतुलनीय आहे. शेतकऱ्यांसाठी नांगर बनवण्यापासून ते औद्योगिक उत्पादन करेपर्यंत आज १७ विविध प्रकारच्या प्लांट मधून निर्मिती केली जात आहे. त्यांचे उद्योग व सामाजिक योगदान अनमोल आहे.’ अशा भाषेत डॉ.रोंगे यांनी किर्लोस्कर समूहाचा गौरव केला. यावेळी सोलापूर आणि सांगलीमध्ये २५ वर्षांपासून कार्य करत असलेल्या ‘अस्तित्व’ या संस्थेला संस्था विभागात ‘किर्लोस्कर वसुंधरा पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. यावेळी जितेंद्र गडहिरे यांनी महाराष्ट्रात विविध भागात काम सुरू असलेल्या ‘अस्तित्व’ संस्थेची वाटचाल सांगितली. यासाठी विविध व्यक्ती व संस्था मदत उपलब्ध करून देतात. ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे यांना त्यांच्या पर्यावरण संदर्भातील कार्यासाठी पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कक्षाचे उपविभागीय अधिकारी निखिल मोरे म्हणाले की, ‘पर्यावरण हा एक अत्यंत अवघड विषय असून पर्यावरण रक्षण हे धनुष्य उचलण्यासारखे आहे. ते एकट्या-दुकट्याचे काम नसून एक शिवधनुष्य आहे जे सर्वांनी उचलले पाहिजे. वारी काळात केलेली स्वच्छता, सेवेकरी आणि ग्राउंड ला काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा हा पुरस्कार आहे. असे म्हणून पुरस्काराचा सन्मान केला. यावेळी दत्तात्रय गायकवाड लिखित 'पंढरीची वारी' व पर्यावरण तज्ञ डॉ. सचिन पुणेकर लिखित ‘सुवर्ण पिंपळ’ व ‘बीज प्रसार’ या पुस्तकांचे अनावरण करण्यात आले.
जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे दहावे वंशज ह. भ. प. श्री शिवाजीराव मोरे यांनी निर्मलवारी व हरितवारी या दोन संकल्पना दोन वारकऱ्यांसाठी वारी कशी सुकर केली व यातून पर्यावरणासाठी पर्यावरण रक्षणासाठी कशी मदत झाली आणि या उपक्रमाकरिता लोक एकत्र कसे आले याबद्दल मनोगत व्यक्त केले. ऋषिकेश कुलकर्णी यांनी स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग श्री मोरे महाराज व पंढरपूर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने वारीपथावर शंभर देशी झाडांची लागवड केली व या उपक्रमास वसुंधरा उपक्रमास सुरुवात केली असे सांगितले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड, सोलापूरचे वरिष्ठ व्यवस्थापक (एच. आर.) ऋषिकेश कुलकर्णी व त्यांच्या संपूर्ण टीमचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी कमला गुमास्ते, पर्यावरण तज्ञ डॉ. सचिन पुणेकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कक्षाचे उपविभागीय अधिकारी निखिल मोरे, सुवर्ण भांगुरकर, वृक्षप्रेमी ग्रुपचे ॲड. सुनील वाळूजकर, अनंत जाधव, अमित राठोड, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, सर्व अधिष्ठाता, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रा. ए. ए. मोटे, सर्व विभागप्रमुख, इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रथम वर्ष अभियांत्रीकीचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.