पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
प्रवाशांना स्वच्छ,सुरक्षित, सुस्थितीत बसमधून प्रवास एवढीच त्यांची माफक अपेक्षा आहे. त्यासाठी नवीन लालपरी बसेस प्राधान्याने उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतने परिवहन मंत्र्यांकडे केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली, एलसीडी स्क्रीन, सार्वजनिक घोषणा प्रणाली इत्यादी अनेक सुविधा असणाऱ्या बस लवकरच पुरविल्या जातील अशी घोषणा नुकतीच परिवहन मंत्र्यांनी केली आहे. तथापि अशा सर्व सुविधायुक्त अद्यावत बसेस येतील तेव्हा येऊ द्या. तत्पुर्वी लालपरी बसेसची जास्त गरज आहे.
अनेक वर्षांपासून प्रवासी नादुरुस्त बसमधून प्रवास करीत आहेत. त्यासाठी नविन लालपरी बसेस लवकरात लवकर सर्व आगारास मिळण्यासाठी ज्याठिकाणी बांधणी चालू असेल तेथे वेगाने काम कसे होईल यासाठी विशेष प्रयत्न आवश्यक आहेत. सध्याच्या गतीने प्रत्येक आगाराला नवीन बस मिळणार असतील तर यापुढेही अनेक वर्षे मोडकळीस आलेल्या बसमधूनच प्रवास करणे प्रवाशांच्या नशिबी आहे असे दिसून येते.
७७ वा वर्धापनदिन साजरा करीत असताना वर्धापनदिनाची भेट म्हणून तरी राज्यातील सर्व आगारापर्यत नवीन लालपरी बसेस पोहोचणे, तसे नियोजन होणे अपेक्षित होते. तथापि कित्येक आगार अनेक वर्षांपासून अद्यापही लालपरीच्या प्रतिक्षेत आहेत ही वस्तुस्थिती आहे.
त्याचप्रमाणे मोडकळीस आलेल्या शिवशाही बस वातानुकुलित बसचे भाडे आकारणी करून अजूनही मार्गावर धावत नाहीत तर बंद पडत हळूहळू चालतात. ही प्रवाशांची एकप्रकारे थट्टा आहे. त्याचबरोबर पंढरपूर येथील ई बस चार्जिंग स्टेशन तयार असुन अद्यापही ई बसच्या प्रतिक्षेत आहे.सोलापूर शिवाय जिल्ह्यातील इतर आगारापर्यत ई बस पोहोचलेली नाही. महामंडळाने गांभीर्याने, तातडीने किमान नवीन लालपरी बसेस सर्व आगारापर्यत पोहोचतील याचे नियोजन प्रत्यक्षात आणावे. महामंडळ प्राधान्याने कार्यवाही करेल अशी अपेक्षा ग्राहक पंचायतीचे प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरते,सदस्य सुभाष सरदेशमुख, जिल्हा संघटक दीपक इरकल,जिल्हा सचिव सुहास निकते,जिल्हा महिला प्रमुख सौ. माधुरी परदेशी,जिल्हा सदस्य अण्णा ऐतवाडकर,पांडुरंग अल्लापूरकर यांनी व्यक्त केली आहे.