पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा दि. 06 जुलै 2025 रोजी साजरा होत असून, यात्रा कालावधी 26 जून ते 10 जुलै 2025 असा आहे. या यात्रेत येणाऱ्या शेकडो दिंड्यांना वास्तव्यासाठी भक्तीसागर (65 एकर) येथे जागा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या ठिकाणी मोफत प्लॉटस भाविकांना तंबू, राहुट्या उभारुन वास्तव्य करण्यासाठी देण्यात येत आहेत. प्रथम येणाऱ्या पालखी, दिंडी धारकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून, दि.16 जून पासून प्लॉट नोंदणी सुरु करण्यात आली आहे. संबधितांनी भक्तीसागर येथे आगाऊ प्लॉटची मागणी नोंदवावी, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आले आहे.
आषाढी यात्रेला येणाऱ्या पालखी सोहळ्या सोबत येणाऱ्या दिंड्यांमधील भाविकांच्या निवाऱ्याची सोय भक्तीसागर (65 एकर) येथे करण्यात आलेली आहे. या ठिकाणी भाविकांना निवाऱ्यासोबत पिण्याचे शुद्ध पाणी, शौचालय, वीज कनेक्शन, अन्नपदार्थ शिजवण्यासाठी गॅस वितरण, पोलीस संरक्षण, प्रथमोपचार केंद्र आदी सुविधा या ठिकाणी दिल्या जातात. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी होते. या ठिकाणी एकूण 497 प्लॉट्स भाविकांना निवाऱ्यासाठी दिले जातात. या ठिकाणी भाविकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपत्कालीन मदत केंद्र स्थापन करण्यात येते.
येथे प्रशासकीय यंत्रणा सुसज्ज व सुरळीतपणे काम करण्यासाठी तहसीलदार सचिन मुळीक यांची सेक्टर मॅनेजर म्हणून नियुक्ती केली आहे.भाविकांना प्लॉटस वाटप करणे, अडीअडचणी सोडवणे, आपत्कालीन प्रतिसाद केंद्र व त्यावर नियुक्त सेक्टर मॅनेजर व त्याचे अधिनस्त कर्मचारी कार्यान्वित असणार आहेत.
दिंडी, पालखी समवेत येणाऱ्या भाविकांना भक्तीसागर 65 एकर येथे प्लॉटसचे वाटप करण्यात येणार आहे. आषाढी एकदशीच्या सोहळ्या अगोदर दिंडी, पालखीतील भाविकांने प्लॉटसाठी मागणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
या ठिकाणी भाविकांना मुलभूत सेवासुविधा पुरवण्यात येणार असून आपत्कालीन प्रतिसाद केंद्रातून भाविकांना सेवा देण्यात येणार आहे. यासाठी नायब तहसिलदार सुधाकर धाईंजे (मो.क्र.9767248210), तसेच ग्राम महसूल अधिकारी दादासाहेब पाटोळे (मो.क्र.9970109919), प्रमोद खंडागळे (मो.क्र. 9657290403) तसेच वैभव कट्टे (मो.क्र.9665076066) यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.