अन्यथा ग्राहक आयोगाकडे दाद मागणार
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सध्या जिल्ह्यात/राज्यात धावत असलेल्या शिवशाही बसेसची स्थिती अत्यंत खराब असल्याने त्याची भाडे आकारणी साध्या बसप्रमाणे करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने राज्य परिवहन महामंडळा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे केली असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
वातानुकुलित आराम बस म्हणून शिवशाही राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सेवेत दाखल केली. काही दिवस तिची चांगली सेवा मिळाली. परंतु मागील वर्षभरापासून तीची अवस्था अत्यंत गंभीर व खराब झाली आहे. अनेक बसेसमध्ये वातानुकुलिन व्यवस्था चांगली नाही, चालक केबीन व प्रवासी बैठक व्यवस्था यामध्ये पार्टीशन नाही,मोडलेले सीट,तुटके हॅंडरेस्ट,अनेक ठिकाणी मागील हॅंडल नाहीत.मोबाईल चार्जिंग पॉईंट, नाईट लॅंप चालू नाहीत. बस रस्त्यावर बंद पडण्याचे प्रमाण जास्त,संथ गतीने धाव,इंजिनचा मोठा आवाज,अशा असंख्य त्रुटी असुनही आराम बस म्हणून लठ्ठदराने प्रवाशांच्या सेवेत आहेत. या सर्व बाबी प्रवाशांच्या सेवेतील त्रुटी आहेत. त्यामुळे अशा बसेसची तिकीट आकारणी तात्काळ साध्या दराने करावी अशी मागणी मार्च महिन्यामध्ये विभाग नियंत्रक यांचेमार्फत करुनही अद्याप कार्यवाही झालेली नाही.
त्यामुळे अशा बसमधून प्रवास केलेल्या सर्व प्रवाशांना जादा दराने आकारणी केलेले प्रवास भाडे परत मिळण्यासाठी गाहक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात येईल तरी महामंडळाने तातडीने त्रुटी असलेल्या शिवशाही बसचे प्रवास भाडे आकारणी सामान्य दराने करावी अशी मागणी ग्राहक पंचायतीचे प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरते, सदस्य सुभाष सरदेशमुख, जिल्हा संघटक दीपक इरकल, जिल्हा सचिव सुहास निकते सौ.माधुरी परदेशी यांनी पत्राद्वारे केली आहे.