चोखा माझा जीव चोखा माझा भाव। कुलधर्म देव चोखा माझा॥
विशेष लेख
वारकरी संप्रदायाचा इतिहास मोठा क्रांतिकारी आहे. तेराव्या शतकात वारकरी चळवळ पुनरुज्जीवीत करण्याचे श्रेय सर्वप्रथम संत नामदेव-संत ज्ञानदेवादी संत प्रभावळीला जाते. या संत प्रभावळीत प्रामुख्याने संत सावतोबा, संत जनाबाई, संत ज्ञानदेव, संत नरहरी, मुक्ताई, संत गोरोबा, संत सेना, संत परिसा, संत विसोबा, संत बंका, संत जगमित्रनागा, सोयराबाई, निर्मळा, कान्होपात्रा आदि संतांची मांदियाळी पंढरीच्या वाळवंटात जमून मोठं क्रांतिकारी कार्य केले. वाळवंट केवळ भक्तीचे ठिकाण राहिले नसून वारकरी संप्रदायाच्या रुजवणूकीचे केंद्र झाले. संत जनाबाई आणि संत नामदेव भजन-कीर्तन करत अभंग लिहायला लागले. संत नामदेवांचा हा वसा-वारसा इतर संतांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अन्य संतांची मांदियाळी अभंग लेखनाला लागली.
संत नामदेवांच्या प्रभावळीतील अग्रगण्य नाव म्हणजे संत चोखोबाराय! चोखोबाराय विदर्भातील मेहूनपुरावरून पंढरपूरला स्थायिक झालेले श्री विठ्ठलाचे निष्ठावंत वारकरी! तेरावे शतक मोठे आव्हानात्मक असताना तत्कालीन समाजात वर्णव्यवस्था खोलवर रुतलेली होती. कर्मकांड, थोतांड, देवभोळेपणा इत्यादींनी थैमान घातले होते. देव आणि धर्माची भीती समाजमनात खोलवर रुजली होती. ब्राह्मणेत्तरांना वाचन, लेखन, भजन, कीर्तन, भाषण अधिकार नव्हता. याचा प्रत्यय स्वतः ज्ञानदेवादी भावंडांना सुद्धा आला होता. असे असले तरी संत जनाबाई, संत नामदेव आणि त्यांच्या घरातील सर्वजण अभंग लेखन करत होते. दुसरीकडे संत नामदेव वाळवंटात वारकरी मेळ्यात कीर्तन करायला लागले होते. संतांच्या मांदियाळीत अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या तत्कालीन महार जातीतील जन्मलेले संत चोखोबाराय प्रतिभावंत वारकरी होते. सगळे काही प्रतिबंध असतांना चोखोबाराय पांडुरंगाची भक्ती सोडत नव्हते. पांडुरंगाच्या मंदिरात प्रवेश निषिद्ध असतांना चोखोबाराय एकटे पडले होते. त्या वेळी संत नामदेव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. संत नामदेवादी संत मिळून चोखोबांच्या घरी जाऊन भजन-कीर्तन करू लागले. यातच चोखोबांनी लिहिलेले अभंग वाचून नामदेवराय आश्चर्य चकित झाले. नामदेव महाराजांना खूपच आनंद झाला आणि चोखोबांना लेखन करण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर नामदेव आणि चोखोबाराय दिवसभर भजन, कीर्तन, अभंगावर चर्चा करत बसत असत, याचा परिपाक असा झाला की; संत नामदेवांच्या कुटुंबाप्रमाणे संत चोखोबा महाराजांचे संपूर्ण कुटुंबच अभंग लेखनात डुंबून गेले. चोखोबांच्या धर्मपत्नी सोयराबाई, बहिण निर्मळा, मेव्हणा बंका आणि विशेष म्हणजे चोखोबांचे चिरंजीव कर्ममेळा असे सर्व घरच अभंग लिहायला लागले. संत नामदेव चोखोबाराय आणि कुटुंबियांचे गुरु झाले आणि सुरु झाला नवनिर्मिती आणि अभंग लेखनाचा इतिहास!
प्रतिभा कुणाची जागीर नाही. जीवापाड प्रेम करणाऱ्यावर प्रतिभा प्रेम ओसंडत असते. चोखोबाराय अस्पृश्य जातीतून आले असतांना सुद्धा आपल्या अभंगाद्वारे श्री विठ्ठलाप्रती आपली निस्सीम भक्ती प्रकट करत असले तरी त्यांच्या अभंगातून तत्कालीन समाज व्यवस्थेविरुद्ध काही महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित होतात. चोखोबाराय आपल्या
धिक् तो आचार धिक् तो विचार। धिक् तो संसार धिक् जन्म॥१॥
धिक् तें पठण धिक् तें पुराण। धिक् यज्ञ हवन केलें तेणें॥२॥
धिक् ब्रम्हाज्ञान वाउग्या ह्या गोष्टी । दया क्षमा पोटी शांति नाहीं॥३॥
धिक् ते आसन जटाभार माथा। वायांचि हे कंथा धरिली जेणें॥४॥
या अभंगांच्या जोडीला चोखोबा
कोण तो सोंवळा कोण तो वोंवळा। दोहींच्या वेगळा विठ्ठल माझा ॥१॥
कोणासी विटाळ कशाचा जाहला। मुळींचा संचला सोंवळाची ॥२॥
पांचाचा विटाळ येकचिये आंगा। सोंवळा तो जगामाजी कोण ॥३॥
चोखा म्हणे माझा विठ्ठल सोंवळा। अरूपें आगळा विटेवरी ॥४॥
अशा अभंगातून तत्कालीन व्यवस्थेवर सडेतोड भाष्य करतांना दिसतात. याच्या जोडीनेच त्यांचे "हीन याती माझी देवा", "भेदाभेद कर्म न कळे त्याचे वर्म" आदि अभंगातून व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे धाडस चोखोबा करतांना त्यांच्यातील प्रतिभा आणि भक्तीची शक्ती दृष्टीआड होत नाही. एकदा तर बडव्यांनी प्रचंड मारले असतांना चोखोबाराय असहायपणे "धाव घाली विठू आता नको चालू मंद" या अभंगातून आपली हतबलता व्यक्त होतात.
असे असले तरी चोखोबा हे एक प्रतिभासंपन्न वारकरी संत होते. त्यांच्या अभंगातून जीवनाचे मूलगामी तत्वज्ञान स्त्रवतांना दिसते. त्यांचे अनेक अभंग आजही आपल्याला समकालीन वाटतात. जसे
ऊंस डोंगा परी रस नव्हे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥१॥
कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥२॥
नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगें । काय भुललासी वरलिया रंगें ॥३॥
चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ॥४॥
हा अभंग वाचला की कुणीही अहंकारी माणूस क्षणार्धात नामोहरम झाल्याशिवाय राहणार नाही. चोखोबांच्या भक्ती आणि प्रतिभेने सर्वांनाच प्रभावीत केले आहे. प्रतिभावंत असले तरी ते महार असल्यामुळे चोखोबांना मंगळवेढा गावची वेस बांधण्यासाठी बळजबरीने नेण्यात आले आणि तिथे बांधकाम करतांना वेस पडून त्यात चोखोबांचा अंत झाला. एका प्रतिभावंत संताला वारकरी संप्रदाय मुकला. हे नामदेवांना कळल्याबरोबर त्यांना अत्यंत दुःख झाले. संतानी शोक व्यक्त करतांना आपण चोखोबांना अजरामर केले पाहिजे या न्यायाने संत नामदेव तत्काळ मंगळवेढ्याला गेले. चोखोबांच्या अस्थी पंढरपूरला आणून पांडुरंगाच्या समोर महाद्वारात विसर्जन करून तिथे एक दगड रोवला जो दगड आजही आपल्याला संत चोखोबा, संत नामदेवादी संतांची आठवण करून देत महाद्वारात उभा आहे. तेराव्या शतकात कडेकोट वर्णव्यवस्था असतांना ऐन महाद्वारात संत चोखोबारायांच्या अस्थी विसर्जन करून एक दगड रोवणे हे वारकरी संतांनी केलेले फार मोठे धाडस, क्रांतिकारी कार्य होते. हे करतांना नामदेवादी संतांना प्रचंड त्रास सहन करावा लागला असणार! असे असले तरी चोखोबा सर्व संतांना वंदनीय, पूजनीय असल्यामुळेच संत नामदेवांनी चोखोबांच्या स्मृती
चोखा माझा जीव चोखा माझा भाव। कुलधर्म देव चोखा माझा॥१॥
काय त्याची भक्ति काय त्याची शक्ति। मोही आलो व्यक्ति तयासाठी ॥२॥
माझ्या चोखियाचे करिती जे ध्यान। तया कधी विघ्न पडो नदी ॥३॥
नामदेवे अस्थि आणिल्या पारखोनी। घेत चक्रपाणी पितांबर ॥४॥
हा अभंग लिहून त्यांना अजरामर केले.
आज संत चोखोबाराय पुण्यतिथी निमित्ताने त्यांचा खडतर काळ आणि त्यातून त्यांनी केलेली अभंग निर्मिती ही आपल्यासाठी फार मोठी प्रेरक बाब आहे. संत आपल्या अलौकिक अभंगांनी आजही आपल्या सोबत असून त्यात चोखोबांचे अभंग मोठे रसाळ, लडिवाळ, भक्तीने ओतप्रोत आहेत. वर्तमानात तरुणांनी संत चोखोबाराय आणि विशेषतः त्यांचा मुलगा युवा संत कर्ममेळा यांचे क्रांतिकारी अभंग वाचून प्रेरणा घ्यावी! आज आपल्याला सर्व गोष्टी अनुकूल, उच्च शिक्षण, साधनांची दाटी असतांना सुद्धा आपण लिहित नाही याची खंत वाटते. आपण आपला भोवताल गद्य असो की पद्य. कोणत्यातरी स्वरुपात लिहून आपल्यासह आपला वर्तमान अजरामर करणे हे शिकलेल्या माणसाचे खरे लक्षण आहे. तेंव्हा चला, आपणही लिहून अक्षर रूपाने मागे राहूया! जय चोखोबाराय!
प्रा.डॉ.विठ्ठल खंडुजी जायभाये
कै.रमेश वरपुडकर महाविद्यालय, सोनपेठ
जि. परभणी (महाराष्ट्र)
मो. 9158064068
(टीप: लेखक हे व्याख्याता, कवी, किर्तनकार, समीक्षक, योग-प्राणायाम प्रशिक्षक आहत.)