पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राष्ट्रीय सेवा योजना, प्राध्यापक प्रबोधिनी व समारंभ समिती यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमांतर्गत “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक प्रवास” या विषयावर प्रा. डॉ. अमर कांबळे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. यापुर्वी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधित ग्रंथाचे प्रदर्शन भरविण्यात आले. याचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. समाधान माने होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रबोधिनीचे चेअरमन डॉ. उमेश साळुंखे यांनी केले, तर प्रमुख वक्त्यांचा परिचय समारंभ समितीचे चेअरमन डॉ. दत्तात्रय डांगे यांनी करून दिला. कार्यक्रमास कला विभागाचे अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत उपस्थित होते.
प्रा. डॉ. अमर कांबळे यांनी आपल्या भाषणात डॉ. आंबेडकरांच्या बालपणातील संस्कार, शैक्षणिक संघर्ष, आणि सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी उचललेल्या पावलांचा आढावा घेतला. त्यांनी डॉ. आंबेडकरांचे कार्य हे समाज, शिक्षण, कायदे, अर्थकारण, राज्यघटना, स्त्री सक्षमीकरण आणि कृषी-औद्योगिक धोरण यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले. तसेच सयाजीराव गायकवाड आणि शाहू महाराज यांच्या योगदानाचा ही त्यांनी विशेष उल्लेख केला.
अध्यक्षीय भाषणात डॉ. समाधान माने यांनी डॉ. आंबेडकर यांच्या चळवळीची तुलना मार्टिन ल्युथर यांच्याशी करत, नव्या समाजनिर्मितीसाठी आंबेडकरी विचारसरणीचे महत्त्व अधोरेखित केले. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा डॉ. आंबेडकरांचा मूलमंत्र आजच्या तरुण पिढीसाठी मार्गदर्शक ठरतो, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी स्वाती मनगिणी यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. दत्तात्रय चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभिजीत जाधव, ओंकार नेहतराव, अमोल माने, तानाजी खरात, अशोक भडकुंबे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विविध विभागांचे प्रमुख, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.