११८ वर्षे पूर्ण करणारी नामदेव समाजोन्नती परिषदेची वाटचाल आणि गौरवशाली इतिहास
आज दिनांक ३ एप्रिल २०२५ रोजी आपल्या नामदेव समाजोन्नती परिषदेस ११८ वर्षे पूर्ण होऊन आपण ११९ व्या वर्षात पदार्पण करीत आहोत. संस्थेच्या सर्व सदस्य, पदाधिकारी, कार्यकारिणी आणि हितचिंतक समाज बंधू आणि भगिनींचे मी मनापासून अभिनंदन करीत आहे.
सन १९०७ आपल्या समाजातील मुलांनी उच्च शिक्षण घेऊन सामाजिक उन्नती करावी अशी संकल्पना सांगली जिल्ह्यातील आष्टा या गावातील एक शिक्षक वै. रामचंद्र बोधे गुरुजी यांनी मांडली आणि नामदेव समाजोन्नती परिषदेची स्थापना पुणे,मुंबई कोल्हापूर येथील समाजाचे प्रमुख एकत्र येऊन झाली आणि परिषदेचे कामकाज सुरू झाले. सुरुवातीला दरवर्षी आपले अधिवेशन भरत असे. हळू हळू परिषदेचा विस्तार होऊ लागला.
लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगातून बाहेर आलेनंतर परिषदेने त्यांचा जाहीर सत्कार केलेली आपली पहिलीच ज्ञाती संस्था होती, असे म्हणतात.
सन १९२५ साली म्हणजेच बरोबर १०० वर्षापूर्वी पंढरपूर येथील परिषदेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष पुण्यातील सुप्रसिद्ध डॉ संजीव खुर्द यांचे आजोबा कै खुर्द होते. त्यांनी सर्वप्रथम पंढरपूर येथील केशवराज मंदिराचे जीर्णोद्धार करण्यात यावा आणि नामदेव समाजोन्नती परिषदेने पुढाकार घेऊन कार्य करावे असा ठराव मांडला. म्हणजेच नामदेव समाजोन्नती परिषद आणि केशवराज संस्था त्या काळापासून एकत्र हातात हात घालून कार्य करीत आहेत. सन १९३९ साली खऱ्या अर्थाने पंढरपूर येथील केशवराज मंदिरचा कामकाजास सुरुवात झाली. महाराष्ट्रातील कित्येक दानशूर व्यक्तींनी भरघोस मदत करून आजचे टोलेजंग वस्तू उभी करण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. सन १९४२ साली त्याकाळी परिषदेकडे ८४००० हजार रुपयांचा निधी होता. लिहिताना विशेष आनंद होत आहे की १९३५ ते १९५५ या दरम्यान दरवर्षी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नामदेव समाजोन्नती परिषदेच्या प्रत्येक अधिवेशनात वाढत गेलेला आहे. सन ६०/७० च्या दरम्यान परिषदेचे एक अधिवेशन उस्मानाबाद(धाराशिव) जिल्ह्यातील कळंब या ठिकाणी पण झालेले आहे. सन १९६८/६९ साली परिषदेच्या हीरक महोत्सव निमित्त सविस्तर,सखोल,संशोधन करून अभ्यासपूर्ण असा श्री संत नामदेव दर्शन नावाचा एक मोठा ग्रंथ नामदेव समाजोन्नती परिषदेने प्रकाशित केलेला आहे.
१९८२ साली तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या उपस्थित अमृत महोत्सवी वर्षात विविध कार्यक्रम पुणे येथील रमणबाग शाळेत पार पडले होते. डॉ. वि मा बाचल सर यांनी १९८९ साली घटनेची फेर दुरुस्ती करण्यात आली.१९९२ च्या सुमारास सातारा जिल्ह्यातील वाई येथे परिषदेच्या अर्ध अधिवेशनात कै नारायणराव बगाडे यांचेवर अविश्वासाचा ठराव येऊन सुरेशअण्णा वीर यांची अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. पुढील ८ वर्षे अस्थायी समिती मार्फत कामकाज चालू होते. सन १९९४ मधे परिषदेच्या कार्यकारिणीत वै ठाकसेन पोरे अध्यक्ष असलेल्या पुणे शहर शाखेत माझी नियुक्ती सहसचिव, म्हणून झाली होती. १९९९ मधे विविध गट एकत्र येऊन समझोता करण्यात आला आणि सर्वानुमते कै सुधीर पिसे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आपले सुवर्ण महोत्सवी ५० वे अधिवेशन इस्लामपूर येथे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडले. २००७ साली मी पुणे शहर अध्यक्ष असताना पुण्यातील सर्व प्रमुख मंडळी यांना एकत्र करून आम्ही तत्कालीन संरक्षण मंत्री मान शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत शताब्दी महोत्सव पार पाडले.त्यावेळचे परिषदेचे मुख्य विश्वस्त तु पा मिरजकर, जेष्ठ बाळासाहेब बाकरे, डॉ. वि मा बाचल सर यांच्यासारख्या जेष्ठ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली परिषदेची पहिली वास्तू १०८९,सदाशिव पेठ,आनंदी गोपाळ, बाजीराव रस्ता येथे परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष सुधीर पिसे, आजचे अध्यक्ष श्री संजय नेवासकर, डॉ अजय फुटाणे आणि इतर सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी महाराष्ट्रातून निधी गोळा करून रु २९ लाखांस खरेदी केली. त्यावेळी परिषदे मार्फत सर्व निधी रुपये १२ लाख जागेसाठी वर्ग करण्यात आला.
सन २०१२/१३ च्या दरम्यान ओबीसी आरक्षण मधून शिंपी जात मान. सुप्रीम कोर्टाने रद्द केली , त्यावेळी नामदेव समाजोन्नती परिषदेने पुढाकार घेऊन राज्य मागास आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार मार्फत पुन्हा आरक्षण देण्यास भाग पाडले.हा सुधीरजी पिसे यांच्या काळातील एक महत्वाचा निर्णय झाला होता.
सन २०१४ साली नाशिक येथे ५३ व्या अधिवेशनात परिषदे मार्फत पंढरपूर येथे श्री संत नामदेव महाराज यांचे भव्य दिव्य आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. तेव्हापासून परिषद आणि सर्व पदाधिकारी यांनी पाहिलेल्या स्वप्नांची लवकरच पूर्तता होईल असे दिसत आहे.
सन २०२० मधे अचानक आपले सुधीरदादा पिसे आपल्याला सोडून गेले त्यानंतर २०२१ मधे नाशिक विभागाचे उपाध्यक्ष कै संजीव जी तुपसाखरे यांच्यावर अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. परंतु नियतीने त्यांना पण आपल्यापासून अल्पावधीतच दूर नेले, आणि पुणे विभागाचे उपाध्यक्ष संजय नेवासकर यांची सप्टेंबर २०२३ मधे नियुक्ती करण्यात आली.
मान. संजय नेवासकर हे सध्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत असून त्यांची कारकीर्द दैदीप्यमान व्हावी हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. सर्वसमाज बांधवांना याप्रसंगी शुभेच्छा व्यक्त करतो.
धन्यवाद.
डॉ. अजय फुटाणे, सरचिटणीस,
नामदेव समाजोन्नती परिषद.
(ता. क. हा परिषदेचा धावता आढावा घेतला असून सर्वांचा नामोल्लेख करणे शक्य नाही तसेच काही बाबी निसटून गेल्या असण्याची शक्यता आहे. काही चुकले असेल तर क्षमस्व.)