पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात पुण्याचे कौस्तुभ गणबोटे यांचा देखील मृत्यू झालाय. त्यांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी आज भेट दिली. यावेळी कौस्तुभ गणबोटे यांची पत्नी भावूक झाली होती. त्यांनी पवार यांच्यासमोर अंगावर काटा आणणारा पहलगाम हल्ल्याचा अनुभव सांगितला आहे.
कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी म्हणाल्या की, आम्हाला बऱ्याच लोकांनी मदत केली. सैन्य दलाची देखील मदत झाली, पण ती उशिरा झाली. तोपर्यंत हे गेले होते. माझ्या समोर गोळ्या घातल्या. तुम्ही अजान वाचा म्हणून सांगत होते. आम्ही तिथं असलेल्या सगळ्या महिलांनी मोठ्या-मोठ्या अजान म्हटले, पण त्यांनी आमच्या माणसांना मारून टाकले.
तिथे गेटवर एक मुस्लिम होता. तो म्हणत होता, तुम्ही कशाला निरपराध लोकांना मारता त्यांनी काय चुकी केली आहे? त्याला सुद्धा पुढे करून गोळ्या घातल्या. आम्ही तिथं घोड्यावर बसून गेलो, तरी आम्हाला भीती वाटत होती. आम्ही पळत सुटलो तिथून तर चिखलात गुडघ्याइतके पाय खाली रुतत होते.
आमचे घोड्यावाले मुस्लिम होते, पण ते खूप चांगले होते. ते आम्हाला हल्ला झाल्यानंतर घ्यायला आले. त्यांचा मित्र बाजूला होता, त्याला बोलावून घेतले आणि म्हणाला ‘अजान पढता है क्या, पढता है क्या कुछ?’ त्यांचे बोलणं ऐकून आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या. आम्ही सगळे ‘अल्लाह हू अकबर’ म्हणायला लागलो.
दरम्यान पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचे पार्थिव आज पुण्यात आणण्यात आले. नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अश्रूंनी श्रद्धांजली वाहिली. तेव्हा विमानतळावर मोठी शोककळा पसरली. लष्कर आणि पोलिस अधिकाऱ्यांनीही सैनिकांना त्यांच्या सन्मानार्थ सलामी दिली.