पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
"आजच्या युगात केवळ गुणपत्रके महत्त्वाची नाहीत, तर विद्यार्थ्यांनी कौशल्ये विकसित करणे आवश्यक आहे. समाज आणि उद्योग क्षेत्राला उत्तम तंत्रज्ञानाची जाण असलेले तज्ञ हवे आहेत. विद्यार्थ्यांनी नोकरीच्या शोधात वेळ घालवण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यावर भर द्यावा. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांच्या यशामध्ये अडथळे निर्माण होत आहेत, त्यामुळे वेळेचा योग्य उपयोग करावा." असे प्रतिपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ विजय फुलारी यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरदचंद्र पवार महाविद्यालय, लोणंदचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे हे होते.
यावेळी आमदार अभिजीतआबा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "ब्रँडेड वस्तू वापरण्यापेक्षा आपण स्वतःच ब्रँड बनावे. शिक्षणामुळे डोळसपणा आणि व्यवहारिक ज्ञान मिळाले पाहिजे. करिअरवर लक्ष केंद्रित करून अमर्यादित संधींमध्ये वाटचाल करणे गरजेचे आहे.”
प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना आवाहन करताना सांगितले की, "फक्त एका विषयात पदवी घेऊन भागणार नाही, तर विविध क्षेत्रांमध्ये कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. नोकरी मागणारे न होता नोकरी देणारे बना."
या कार्यक्रमात राष्ट्रीय, राज्यस्तरीय, विद्यापीठस्तरीय व विभागीय विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी झालेल्या स्पर्धांतील विजेत्या संघांचा देखील गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत प्रा. डॉ. बाळासाहेब बळवंत यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. अमर कांबळे यांनी करून दिला. कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य आमदार अभिजीत आबा पाटील, डॉ. जे. जी. जाधव, जी. बी. धायगुडे, डॉ. राजेंद्र जाधव, उपप्राचार्य डॉ तुकाराम अनंतकवळस, उपप्राचार्य डॉ राजेश कवडे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. प्रशांत नलावडे आणि प्रा अनिल परमार यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमर कांबळे व डॉ. प्रशांत नलावडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. उमेश साळुंखे यांनी मानले. प्रा. अनिल परमार, प्रा. विठ्ठल फुले आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.