महाशिवरात्र निमित्त शिखर शिंगणापूर येथील मंदिर परिचय
ओम नमः शिवाय..!!नुकताच झाला सोमवार शिव शंकराचा वार... मी कोल्हापुरात जेव्हा आले, त्याच्यानंतर कित्येक वर्षांनी मी आपल्या चंबुखडी जवळील शिंगणापूर या गावाबद्दल ऐकलं होतं. महाराष्ट्रात अनेक शिंगणापूर नावाची गाव आहेत हे देखील मला नंतरच कळलं. त्यापैकीच शनिशिंगणापूर हे एक गाव आणि दुसरे म्हणजे शिखर शिंगणापूर. !! तर आता महाशिवरात्र जवळ आलीच आहे. म्हणून मी आज शिखर शिंगणापूर येथील प्रसिद्ध अशा शिवशंकराच्या मंदिराबद्दल थोडेसे बोलण्याचे ठरवले आहे.
आमच्या कोल्हापूरच्या शेजारीच असलेल्या
सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यामध्ये दहिवडी गावापासून २० कि.मी. अंतरावर शिखर शिंगणापूर वसले आहे. फलटणपासून आग्नेय दिशेला सुमारे ३७ किमी. एवढे अंतर आहे. इथे असलेल्या डोंगराला *शंभू महादेवाचा डोंगर* म्हणतात. या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर गाव आहे. हा डोंगर म्हणजे सह्याद्रीचाच एक फाटा असल्याने डोंगरावर दाट झाडी आहे. महादेवाचे हे मंदिर याच डोंगरावर समुद्र सपाटी पासून १,०५० मीटर उंचीवर आहे. मंदिरात जायला जवळपास ४०० पायऱ्या चढून जावे लागते. त्यापुढे आणखी थोडे चढून गेल्यावर खडकेश्वर मंदिर आहे.
शिखर शिंगणापूर देवस्थान हे शिंगणापूरच्या डोंगरावर वसलेले असून मंदिर अतिशय पुरातन आहे. ऐतिहासिक आणि पौराणिक पार्श्वभूमी लाभलेले हे ठिकाण आहे. हे मंदिर मोठ्या मोठ्या दगडी शिळांमध्ये घडवलेले आहे.
शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव म्हणजे महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव दोन्हीही यादव कुळातील सिंधण राजाने वसवले आहेत, असे म्हटले जाते.
मंदिराचा एकूण परिसर अंदाजे एक एकर एवढा आहे. मंदिरात जाण्या साठी पायऱ्या चढाव्या लागतात. परंतु आता रस्त्याचे काम झाले असल्याने गाड्या थेट देवळाजवळ जातात. हे मंदिर यादव काळात बांधले गेले असून परिसराचे नाव "शिंगणापूर "हे नाव यादव राजा "शृंगारपुर" यांच्या नावावरून देण्यात आले आहे.
पूर्वीच्या पायऱ्यांच्या रस्त्यावरून मंदिराकडे येताना एक भरभक्कम वेस लागते. ही वेस छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या वेळी बांधली असून तिला *जिजाऊ वेस* असेही म्हणतात. वेशीतून आत येताना एक अतिशय सुंदर आणि तेवढाच भक्कम दरवाजा लागतो. त्याला *शेंडगे दरवाजा* म्हणतात. शिखर शिंगणापूरचे दर्शन घेताना त्याच्या सभोवतालच्या निसर्गाची व तेथील अनमोल इतिहासाची जाणीव होते
शेंडगे दरवाजा ओलांडल्यानंतर आपण मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहचतो. मंदिराला दगडी तटबंदी
आहे आणि या मंदिराच्या आवारात पाच मोठे नंदी आहेत. तेथेच आपल्याला दीपमाळ पाहायला मिळते. डाव्या हाताला नगारखाना आहे.
मंदिराच्या बाहेरील नंदी दगडाचा असून त्यावर आता पत्रा बसविला आहे. नंदीचा मंडप शंभर कमळांचा बनविला आहे. येथेच पंच नंदीचे दर्शन आपल्याला घडते. पूर्वी येथे एकच नंदी होता नंतर कोणा एका भक्ताने आपला नवस फेडण्यासाठी चार नंदी अर्पण केले.
नंदीच्या समोर एक भला मोठा अष्टकोन कोरलेला आपणाला दिसतो. या अष्टकोनातच छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभू राजांचे शुद्धीकरण करून घेतले होते.
नंदीच्या दर्शनानंतर आपण मुख्य मंदिराकडे निघतो. मंदिराच्या पायरी वर आपल्याला नतमस्तक पार्वती दिसते. लोटांगण घातलेल्या पार्वतीचे शिल्प चांदी मध्ये कोरलेले असून अतिशय देखणे आहे, शंकराला शरण गेलेली पार्वती यात दिसते. त्यापुढे कासवाचे दर्शन घेऊन आपण मुख्य मंदिरात प्रवेश करतो.
यादव कालीन असलेले हे मंदिर हेमाडपंती बांधकामाची साक्ष देते. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करताना मूळ मंदिराच्या सौंदर्यात कमीपणा येणार नाही याची काळजी घेतली होती. हे मंदिर बाराव्या शतकातील असूनही आज देखील भक्कम आहे.
मंदिरा बाहेर दोन दीपमाळा आहेत, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधल्या आहेत. यातील एक दीपमाळ महाराजांनी आपल्या सेविकेच्या नावाने बांधली असून त्यांचे नाव "विरू बाई" होते.
प्रत्येक मंदिरात श्री गणेशाला स्थान असते. तसेच येथेही गाभाऱ्या बाहेर गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. या गणपतीच्या मंदिराचे वैशिष्ट्य महणजे येथे दोन फिरते दगडी खांब आहेत. पुरातन शिल्पकलेचा अप्रतिम व अद्भुत असा अनोखा नमुना येथे पाहायला मिळतो. सभा मंडपाच्या एका भिंतीवर कालीया मर्दनाचे सुंदर शिल्प कोरलेले दिसते.
मंदिराला चार प्रवेशद्वारे आहेत. एक मुख्य प्रवेशद्वार असून तीन उप प्रवेशद्वारे आहेत. दक्षिण दिशेकडील प्रवेशद्वारातून बाली मंदिराचे दर्शन घडते.
हे मंदिर दोन भागात विभागले गेले आहे. मूळ गाभारा आणि बाहेरचा सभा मंडप. सभा मंडपाचा आकार चांदणी प्रमाणे म्हणजे तारकाकृती आहे. मंडपाला भिंतीचा आधार नसून तो बारा भक्कम खांबांवर बांधला गेला आहे. सध्या अनेक लहान खांब आधारासाठी बांधले आहेत. संपूर्ण मंदिराच्या खांबांवर पुराणातील अनेक कथा शिल्प रुपात कोरलेल्या आहेत. एका शिल्पात स्त्री शिकार करताना दाखवली आहे. तसेच कुत्र्यांचा वापर शिकारी साठी केला गेलेला दाखवला आहे. एका शिल्पात पुरुषाने बंदूक वापरताना कोरलेला आहे. काही खांब हे फुल-वेलीच्या नक्षीत कोरलेले आहेत.
ब्राह्मण हा मंदिरातील मुख्य पुजारी असून देवाच्या नित्य पूजेचे काम ते पाहतात. गुरवांना नंदीच्या पूजेचा मान दिला आहे. कोळी समाजाचे लोक देवाच्या अंगाऱ्याची व्यवस्था पाहतात. जंगम लोक देवाच्या नैवेद्याची तयारी करतात.
पाकशाळा महादेवाच्या मंदिराखाली असून जंगम तेथेच राहतात. गाशी जमातीतील लोक नगारखान्याची व्यवस्था पाहतात. सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र आणणारे ठिकाण म्हणजे शंभू महादेवाचे मंदिर. .
महादेवाच्या गाभाऱ्यात दोन शिवलिंगे असून त्यापैकी एक शंकर व एक पार्वतीचे आहे. लिंगावर अनेक लेप लाऊन आता ते गुळगुळीत झाले आहे. शिंगणापुरचे हे शिवलिंग स्वयंभू आहे असे म्हटले जाते.
शिखर शिंगणापूर मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम म्हणजे
सकाळी ६.०० वाजता काकड आरती करून देवाला उठवले जाते. दुपारी १२.०० वाजता देवाची आरती होते. रात्री ८.०० वाजता सांज आरती करून मंदिर बंद केले जाते. प्रत्येक आरती नंतर जंगमाने केलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. देवाच्या झोपण्या साठी ब्राह्मण देवाच्या शयनाची पूर्ण तयारी करतो. शयना साठी गादीवर व्याघ्रांबर घातले जाते. देवाच्या उशाला पाण्याचा तांबा, दोन पानाचे विडे हे सर्व ठेवले जाते.
देवस्थानाचे वर्षभराचे कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडले जातात. येथील महाशिवरात्री ही तर शंकराच्या भक्तांसाठी मोठी पर्वणी असते. महाशिवरात्रीला शंकराला बेल वाहण्याचा मोठा कार्यक्रम असतो. महाशिवरात्रीचा महोत्सव पाच दिवस चालतो. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम असतो.
दर अमावास्येला शिखर शिंगणापूरची वारी असते. अनेक
भक्तगण अमावास्येला महादेवाचे दर्शन करून मग
गुप्तलिंगाला भेट देऊन आपापल्या घरी परततात.
आषाढी वारीला नियमित जाणाऱ्या वारकऱ्याप्रमाणे भक्तगण महादेवाच्या वारीला जातात.
शिवलिंगाचे दर्शन घेऊन मंदिराला फेरी मारतांना महादेवाच्या मंदिरा मागे अनेक लहान देवळे दिसतात. एका देवळात प्रचंड मोठी घंटा दिसते. ही घंटा पंच धातूची असून पोर्तुगीज चर्च मधून आणली असावी असा अंदाज आहे. काहींच्या मते ही घंटा ब्रिटिशांनीच या मंदिराला दिली होती. अर्थात याबद्दल तज्ञ लोक नक्कीच काहीतरी खुलासा करतील अशी अपेक्षा. या घंटेवर रोमन अक्षरात सतराशे वीस असे लिहिले आहे
शिंगणापूरच्या डोंगरावरून एक तलाव दिसतो.
शंभू महादेव हे भोसले घराण्याचे कुलदैवत असल्याने मालोजीराजे भोसले आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे भाविकांचे होणारे हाल पाहून मालोजी राजांनी येथे इ.स. १६०० साली एक मोठे तळे येथे बांधले, त्यास *पुष्करतीर्थ* असे म्हणत; त्यालाच आता *शिवतीर्थ* म्हणतात
शंभू महादेवाच्या मंदिराजवळ डोंगराच्या खाली अमृतेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर *बाली महादेवाचे मंदिर* म्हणून प्रसिद्ध आहे. हेही मंदिर जुन्या दगडी बांधकामाची साक्ष देते. बाली महादेवाच्या मंदिरात आपल्याला शंकराच्या पिंडीत गायीचे खुर उमटलेले दिसतात.
शिखर शिंगणापूरच्या डोंगरावर शिव पार्वतीचे लग्न विष्णूने लावून दिले होते अशी पौराणिक कथा आहे. शिव आणि हरी हे वेगळे नसून एकच आहेत आणि भक्तांनी भेद विसरून जावे हा संदेश येथे देण्यात आला आहे. याच संदेशाचे रूपक असणारे शिल्प शिंगणापूरच्या मंदिरातील खांबा वर दिसते. त्यात एक हत्ती आणि नंदी आहे. हत्तीचे शरीर झाकले तर नंदी दिसतो जो शंकराचे वाहन आहे आणि नंदीचे शरीर झाकले तर हत्ती दिसतो जो विष्णूचे वाहन आहे.
पश्चिमेकडील प्रवेशद्वारातून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मृती स्थळ पाहायला मिळते. मंदिराच्या दक्षिण दिशेला सुमारे शंभर यार्डावर दुसऱ्या टेकडी वर दगडी बांधकाम आढळून येते. येथे तीन स्मारके आहेत. एका ओळीत असणारी ही स्मारके दक्षिणेकडे तोंड करून आणि पूर्व पश्चिम अशी विस्तारलेली आहेत. पश्चिमे कडील स्मारक हे छत्रपती शिवाजी महाराजांचे असून, मधले शहाजी महाराज आणि पूर्वेकडील छत्रपती संभाजी महाराजांचे आहे. ऑगस्ट सोळाशे एकोण्याशी मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाने हत्या केली. त्यानंतर सातारा येथे गादीवर आलेल्या छत्रपती शाहू महाराजांनी या स्मारकाची बांधणी केली.
पूर्वीचे देऊळ जीर्ण झाल्या मुळे इ.स.१७३५ मध्ये साताऱ्याच्या शाहू महाराजांनी सध्याचे देऊळ बांधले. १९७८ मध्ये त्याचाही जीर्णोद्धार झाला. दक्षिणेतील रामस्वामी नावाच्या एका स्थापत्यतज्ज्ञाकडून शिखराची व मंदिराची डागडुजी करून त्यांना आकर्षक रंग देण्यात आला आहे.
आजही महाराष्ट्राशिवाय कर्नाटकातून अनेक भक्तजन शिंगणापूर यात्रेला येतात. ते लोक या महादेवाला आपले कुलदैवत मानतात.
शिंगणापूर देवस्थान हे भोसले राजघराण्याचे खाजगी संस्थानाच्या ताब्यात असून महादेवाच्या सेवेचा मान पाच वेगवेगळ्या जमातींना दिलेला आहे.
छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र पादस्पर्शाने पावन झालेले हे तीर्थ क्षेत्र आहे. हे असे तीर्थक्षेत्र पाहण्यासाठी आपण नक्कीच यायला हवे.
या मंदिराबद्दल व परिसराबद्दल अधिक काही माहिती असेल तर ती जाणकार लोकांनी या मंचावर जरूर सादर करावी ही विनंती.
ओम नमः शिवाय..!!!
(चूकभूल देणेघेणे)
©️®️ राजश्री (पूजा), कोल्हापूर